CM Shinde Dasara Rally News Sarkarnama
मराठवाडा

CM Shinde Dasara Rally: मुख्यमंत्र्यांच्या मेळाव्यासाठी लोक जाईनात, दोनशेपैकी साठ बस रद्द; ज्या गेल्या त्याही रिकाम्या

Jagdish Pansare

Marathwada Political News : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थीतीत मुंबईच्या आझाद मैदानावर होणाऱ्या उद्याच्या दसरा मेळाव्याला लोकांचा अल्प प्रतिसाद मिळत आहे. (Dasara Rally News) राज्याचे पणन व अल्पसंख्याक मंत्री अब्दुल सत्तार यांनी सिल्लोड-सोयगाव मतदारसंघातून २५ हजार लोक नेण्याचा दावा केला होता. प्रत्यक्षात लोक मेळाव्याला जाण्यास उत्सूक नसल्याने दोनशे पैकी ६० बस रद्द करण्याची वेळ सत्तारांवर आली.

उर्वरित १४० बसेसही जेमतेम अर्ध्या भरल्या. उद्या सकाळी लोक आझाद मैदानात पोहचले पाहिजे त्यामुळे या अर्ध्या भरलेल्या बसेसच मुंबईकडे रवाना करण्यात आल्या आहेत. गर्दी जमवण्यात हातखंडा असलेल्या अब्दुल सत्तार (Abdul Sattar) यांना यावेळी मात्र त्यात अपयश आले आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अब्दुल सत्तार यांच्यावर दसरा मेळाव्याला गर्दी जमवण्याची मोठी जबाबदारी दिली होती.

गेल्या दसरा मेळाव्याला मुंबईत सर्वाधिक गर्दी ही अब्दुल सत्तार यांच्या सिल्लोड-सोयगांव मतदारसंघातूनच झाली होती. (Eknath Shinde) त्यामुळे यदांही तशीच किंवा त्यापेक्षा जास्त गर्दी सत्तार यांच्याकडूनच केली जाईल, अशी अपेक्षा होती. (Shivsena) परंतु मराठा आरक्षणासाठी पेटलेले आंदोलन, त्यात मनोज जरांगे पाटील यांनी मंत्री, आमदार, खासदारांना गावबंदीची केलेली घोषणा याचा मोठा फटका अब्दुल सत्तार यांना बसल्याचे दिसून आले.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

समाज माध्यमांवरही राजकीय नेत्यांच्या सभा, मेळाव्याला मराठा बांधवांनी जाऊ नये, असे आवाहन मोठ्या प्रमाणात करण्यात आले होते. त्याचा परिणामही सत्तार यांनी केलेल्या बसेस रिकाम्या जाण्यात झाला आहे. सत्तार यांनी दरवेळी प्रमाणे यंत्रणा कामाला लावली, दसरा मेळाव्यासाठी येणाऱ्या सर्वांची योग्य ती सोय करण्यात आली होती. सिल्लोड येथील अब्दुल सत्तार यांच्या संपर्क कार्यालयासमोरील मैदानात सकळी दहावाजेपासून शेकडो बसेस दसरा मेळाव्याचे बॅनर आणि भगवे झेंडे लावून तैनात करण्यात आल्या होत्या.

पण मुंबईला रवाना होण्याचीवेळ झाली तरी लोक येत नसल्यामुळे अखेर ६० बस रद्द करण्यात आल्या. सिल्लोड आणि जिल्ह्यातील इतर ठिकाणाहून अशा एकूण १४० बसेस मुंबईकडे रवाना करण्यात आल्याची माहिती आहे. परंतु या बसेसही पुर्ण भरल्या नाहीत. अब्दुल सत्तार यांच्याकडून दसरा मेळाव्यासाठी दोनशे बस बूक करण्यात आल्या होत्या. प्रत्यक्षात आज १४० मुंबईकडे रवाना करण्यात आल्या. या सर्व गाड्यांच्या चालकांना लाॅगशीट तयार करून देण्यात आले असून ते रवाना झाले असल्याची माहिती विभाग नियंत्रक सचिन क्षीरसागर यांनी दिली आहे.

Edited By : Jagdish Pansare

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT