Raju Sheety In Beed
Raju Sheety In Beed Sarkarnama
मराठवाडा

पीक विमा कंपन्यांच्या दरोड्याला केंद्र आणि राज्यातील मंत्र्यांचे पाठबळ?

सरकारनामा ब्यूरो

बीड ः शेतकरी अस्मानी संकटात असतांना शेतकऱ्यांना विमा मिळत नाही. त्यामुळे या विमा कंपनीच्या दरोड्याला कुणाचे पाठबळ आहे? मला वाटतंय केंद्र अन राज्य सरकारमधील मंत्र्यांना देखील कंपनीकडून हिस्सा जात असेल, असा गंभीर आरोप स्वाभीमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी केला. बीडच्या बनसारोळा येथे आयोजित ऊस परिषदेत ते बोलत होते. यावेळी रविकांत तुपकर यांची देखील उपस्थिती होती.

स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे सर्वेसर्वा खासदार राजू शेट्टी दोन दिवसांपासून बीड जिल्हा दौऱ्यावर आहेत. ते नुकसानग्रस्त भागात जाऊन शेतकऱ्याशी संवाद साधत आहेत. यावेळी त्यांनी बनसारोळा येथे ऊस परिषद देखील घेतली. अतिवृष्टीने शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. राज्य सरकार मात्र मश्गुल आहे, सगळी व्यवस्था शेतकऱ्यांच्या विरोधात आहे.

निसर्गाने थैमान घातले असतांना राज्यकर्ते आणखी नुकसान करत आहेत. परदेशी सोयाबीन खरेदी केली म्हणून दर खाली आला, त्याला सरकारचे धोरण जबाबदार असल्याचा घणाघात राजू शेट्टी यांनी केला. सरकारने आता काही तरी विचार करून सोयाबीन उत्पादकांना बाजारातून दर तरी मिळून द्यावा. शेतकऱ्यांसाठी काही मेहरबानी करण्यापेक्षा परदेशी सोयाबीन, पेंड आयात करायला नव्हती पाहिजे.

यामध्ये अदानी-अंबानी यांना फायदा झालाय. हे सर्व सरकारच्या आशीर्वादाने रचलले, कृत्रिमरित्या केलेले कट कारस्थान असल्याचा आरोप देखील त्यांनी केला. या संदर्भात लवकरच लातूरला सोयाबिन परिषद घेऊन भांडाफोड करणार आहे. अस्मानी आणि सुलतानी असे दोन्ही संकट मराठवाड्यातील शेतकऱ्यांसमोर आहे. राज्य सरकार मधील मंत्री बारशाला जातात, मात्र विदर्भ मराठवाड्यात फिरकत नाहीत.

तर शेकडो शेतकरी वाचले असते

मुख्यंत्र्यांची अशी अवस्था झाली आहे की, शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडणार नाही, आणि काही देणारही नाही, असा टोला देखील शेट्टी यांनी ठाकरेंना लगावला. तिजोरीत पैसा नाही असे ते सांगतात, जर तिजोरीत पैसा नाही तर आम्ही दरोडे टाकावे का? सरकारी अधिकारी कर्मचाऱ्यांनी दीड वर्ष बसून खाल्लं तरी महागाई भत्ता दिला. शेतकऱ्यांना मदत केली असती तर शेकडो शेतकरी वाचले असते.

सरकारी अधिकाऱ्याचे लाड खूप झाले, विमा कंपन्यासोबत राहून हे अधिकारी लुबाडणूक करत करत आहेत. विमा कंपनीला विमा भरलेला असतांना उंबरठा उत्पन्न कारण दाखवत विमा नाकारला जातोय. त्यात विमा कंपनी वाल्यांनी १० हजार कोटी कमावल्याचा दावा करतांनाच केंद्रीय मंत्री आणि राज्यातील मंत्र्यांना किती पैशे जातात याचा हिस्सा शोधावा लागेल असेही शेट्टी म्हणाले.

या विमा कंपनीच्या दरोड्याला कुणाचे पाठबळ ? त्यामुळं आता हे थांबल नाही तर हजारो शेतकरी घेऊन विमा कंपनीचे कार्यालय फोडू. इथून पुढे आम्ही गप्प बसणार नाही, असा निर्वाणीचा इशारा देखील शेट्टी यांनी यावेळी दिला.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT