Cm Uddhav Thackeray- Sambhajipatil Nilangekar
Cm Uddhav Thackeray- Sambhajipatil Nilangekar Sarkarnama
मराठवाडा

आम्हीच सरकारला ७२ तासांचे अल्टीमेटम देतो ; शेतकऱ्यांना मदत द्या, अन्यथा..

सरकारनामा ब्युरो

लातूर ः पीक विम्यासाठी ७२ तासांमध्ये आॅनलाईन अर्ज भरण्याचा अल्टीमेटम राज्य सरकार शेतकऱ्यांना देत आहे. राज्य सरकार शेतकऱ्यांमुळे आहे, शेतकरी सरकारमुळे नाही, याचा विसर बहुदा सत्ताधाऱ्यांना पडला आहे. त्यामुळे आता शेतकऱ्यांच्या वतीने आम्हीच सरकारला ७२ तासांचे अल्टीमेटम देत आहोत. ७२ तासात शेतकऱ्यांना मदत, विशेष पॅकेज, नुकसान भरपाई बाबत निर्णय घेतला नाही, तर ७२ शेतकरी ७२ तासांचे अन्नत्याग आंदोलन करतील, असा इशारा भाजपचे आमदार माजी मंत्री संभाजी पाटील निलंगकेर यांनी दिला.

शेतकऱ्यांसह आपल्या मागण्याचे निवेदन त्यांनी आज लातूर येथे उपविभागीय अधिकाऱ्यांना दिले, तसेच ७२ तासांचा अल्टीमेटम देखील दिला. गेल्या आठवड्यात मराठवाड्यात झालेल्या अतिवृष्टीने लातूर जिल्ह्याला मोठा फटका बसला आहे. विशेषतः सोयाबीन पीकाचे प्रचंड नुकसान झाले आहे. नदीकाठच्या शेतजमीनींचे कायमस्वरुपी नूकसान झाले आहे. अशा शेतकऱ्यांना तातडीने नुकसान भरपाई, मदत, पॅकेज देण्याची गरज आहे.

मात्र राज्य सरकार शेतकऱ्यांनाच अल्टीमेटम देत असल्याचा आरोप निलंगेकर यांनी केला. आपल्या निवदेनात निलंगेकर म्हणाले, लातूर जिल्ह्यातील सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना हेक्टरी ७५ हजार रुपये मदत राज्य सरकारने तातडीने द्यावी. पीक विमा कंपन्यांसोबत चुकीचे करार आणि धोरण आखल्यामुळे अनेक शेतकऱ्यांना यापासून वंचित राहावे लागत आहे. ७२ तासांत आॅनलाईन माहिती भरण्याचे आदेश राज्य सरकारने शेतकऱ्यांना दिले आहेत.

जिल्ह्यातील संपुर्ण यंत्रणा, इंटरनेट सुविधा डबघाईस आलेली असतांना कुठलाही शेतकरी आॅनलाईन माहिती भरू शकत नाही. तरी देखील राज्य सरकार अशी भूमिका कशी घेऊ शकते? असा सवाल देखील निलंगेकर यांनी उपस्थित केला.

अतिवृष्टीमुळे नदीकाठच्या जमीनींचे कधीही भरून न निघणारे नुकसान झाले आहे. त्यांना राज्य सरकारकडून विशेष पॅकेज अंतर्गत मदत देण्याची गरज आहे. या संदर्भात राज्य सरकारने ७२ तासांत निर्णय घ्यावा, अन्यथा लातूरच्या शिवाजी चौकात ७२ शेतकरी ७२ तासांसाठी अन्नत्याग आंदोलन करतील, असा इशाराही निलंगेकर यांनी दिला.

पालकमंत्र्यांचे फोटो सेशन

पालकमंत्र्यांचे जिल्ह्यातील शेतकरी, सामान्य नागरिकांकडे अजिबात लक्ष नाही, ते कायम मुंबईत असतात, तेव्हा आम्हाला कायमस्वरुपी पालकमंत्री द्या, अशी मागणी आम्ही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली होती. त्यानंतर पालकमंत्री जिल्ह्यात चार-पाच तासांसाठी आले. रस्त्यालगतच्या काही शेतात जाऊन पाहणी केली. फोटो सेशन केले आणि निघून गेले, अशी टीका देखील निलंगेकर यांनी अमित देशमुख यांच्यावर केली.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT