Pradnya Satav, Nana Patole  Sarkarnama
मराठवाडा

Pradnya Satav : प्रज्ञा सातव विधान परिषदेसाठी पुन्हा इच्छुक, पटोले म्हणतात हायकंमाड निर्णय घेईल...

Jagdish Pansare

Congress Politics : विधान परिषदेच्या अकरा जागांसाठी महायुती, महाविकास आघाडीकडून उमेदवार ठरवले जात आहेत. भाजपने पाच उमेदवारांची नावे जाहीर करत बाजी मारली. महायुतीतील शिंदे गट, अजित पवार यांनी अद्याप आपले पत्ते उघडलेले नाहीत. तर महाविकास आघाडीत काँग्रेसच्या वाट्याला येणाऱ्या एकमेव जागेसाठी आमदार प्रज्ञा सातव या पुन्हा इच्छुक असल्याची माहिती आहे.

या संदर्भात माध्यमांनी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांना विचारले तेव्हा उमेदवारी संदर्भात हायकंमाड निर्णय घेईल असे सांगत त्यांनी यावर अधिक बोलणे टाळले. काँग्रेसचे दिवंगत विधान परिषदेचे आमदार शरद रणपिसे यांच्या रिक्त जागेवर प्रज्ञा सातव यांची बिनविरोध निवड करण्यात आली होती. कोरोना संसर्गामुळे काँग्रेसचे राज्यसभेतील खासदार राजीव सातव यांचे अचानक निधन झाल्यानंतर राहुल गांधी यांनी प्रज्ञा सातव यांना विधानपरिषदेवर संधी दिली होती.

काँग्रेस नेते राहुल गांधी व त्यांच्या कुटुंबाशी राजीव सातव यांचे जिव्हाळ्याचे संबंध होते. राष्ट्रीय युवक काँग्रेसची मोठी जबाबदारी राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी राजीव सातव यांच्यावर सोपवली होती. याशिवाय राज्यसभेवर निवड, गुजरात विधानसभा निवडणुकीची (Vidhansabha) जबाबदारी, राष्ट्रीय कार्यकारणीत स्थान देत राहुल गांधी यांनी राजीव सातव यांच्यावर मोठा विश्वास दाखवला होता.

सातव यांनी आपल्या कामातून तो सार्थ ठरवला. अचानक कोरोनासारख्या आजाराने राजीव सातव यांना ग्रासले आणि यातच त्यांची प्राणज्योत मालवली. या दुःखद घटनेनंतर गांधी कुटुंबाने सातव कुटुंबाची संपूर्ण काळजी घेतली. काँग्रेसचे शरद रणपिसे यांचे आकस्मिक निधन झाल्यामुळे रिक्त झालेल्या विधान परिषदेच्या जागेवर प्रज्ञा सातव यांची नोव्हेंबर 2021 मध्ये बिनविरोध निवड झाली होती.

त्यांचा कार्यकाळ पुर्ण झाल्यामुळे प्रज्ञा सातव (Pradnya Satav) निवृत्त झाल्या आहेत. विधान परिषदेत काम करण्यासाठी प्रज्ञा सातव यांना पुरेसा कार्यकाळ मिळाला नाही. त्यामुळे काँग्रेसकडून विधान परिषदेवर पुन्हा संधी मिळावी, अशी त्यांची इच्छा आहे. आता पक्षश्रेष्ठी त्यांना एकमेव जागेवर पुन्हा संधी देतात? की आगामी विधानसभा डोळ्यासमोर ठेवून नव्या चेहऱ्याला संधी देतात हे लवकरच स्पष्ट होईल.

ठाकरेंच्या खासदाराने केलेल्या तक्रारीने अडचण..

नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत हिंगोली मतदारसंघातून शिवसेना ठाकरे गटाचे नागेश पाटील आष्टीकर हे लाखांच्यावर मताधिक्याने विजयी झाले. यानंतरही त्यांनी काँग्रेसच्या आमदार प्रज्ञा सातव यांनी वंचित आघाडीच्या उमेदवाराचे काम केल्याचा आरोप व तशी लेखी तक्रार काँग्रेसचे सचिव वेणु गोपाल यांच्याकडे केली. प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष नाना पटोले यांनी या तक्रारीची दखल घेतली आहे.

खासदार आष्टीकर यांनी केलेल्या तक्रारीची शहानिशा आणि चौकशी केली जाईल. त्यात तथ्य आढळले तर निश्चित कारवाई करू, असे पटोले यांनी स्पष्ट केले. ऐन विधान परिषद (Vidhan Parishad) निवडणुकीच्या वेळी प्रज्ञा सातव यांची ठाकरे गटाच्या खासदाराने काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांकडे तक्रार केल्याने त्यांच्या अडचणी वाढल्या आहेत. या पार्श्वभूमीवर सातव यांना काँग्रेसकडून पुन्हा संधी मिळते का? हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

दरम्यान, विधानपरिषदेवर काँग्रेस मुस्लिम उमेदवार देण्याची शक्यता असल्याचे सुत्रांनी सांगितले आहे. लोकसभा निवडणुकीत काँग्रेसने महाराष्ट्रात एकही मुस्लिम उमेदवार दिला नव्हता, यामुळे नाराज असलेल्या मुस्लिम समाजाला खूष करण्यासाठी आणि आगामी विधानसभा निवडणुका पाहता अशी शक्यता अधिक असल्याचे बोलले जाते.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT