Raosaheb Danve on Kalyan Kale Sarkarnama
मराठवाडा

BJP Leader Raosaheb Danve News : खासदार कल्याण काळेंवर टीका करणार नाही, दानवे असं का म्हणाले ?

Jagdish Pansare

Jalna BJP-Congress Politics News : निवडणुकीत एकदा पराभव झाला की, विजयी आणि पराभूत उमेदवारांची तोंड विरुद्ध दिशेला पहायला मिळतात. मी इतकी वर्ष मतदारसंघात विकासकामे केली ? आता निवडून आलेले महाशय काय दिवे लावतात पाहू ? अशी टीका पराभूत नेते आणि त्यांचे समर्थक करायला लागतात. पण सलग पाच वेळा लोकसभेच्या जालना मतदारसंघातून निवडून आलेले आणि सहाव्या निवडणुकीत पराभूत झालेले माजी रेल्वे राज्यमंत्री भाजप नेते रावसाहेब दानवे यांनी मात्र आपण खासदार कल्याण काळे यांच्यावर टीका करणार नाही, अशी भूमिका घेतली आहे.

मला जनतेने पराभूत केले, कोणा नेत्यामुळे माझा पराभव झालेला नाही. तीसवर्ष खासदार म्हणून मी जालना लोकसभा मतदारसंघात केलेली कामे लोकांसमोर आहे. (Raosaheb Danve) पण यावेळी त्यांना वाटले की आता हे नको, म्हणून त्यांनी मला थांबवले. मी जनतेचा कौल मान्य केला आहे, माझ्या हजारो कोटींच्या तुलनेत नव्याने निवडून आलेले खासदार मतदारसंघात किती विकासकामे करतात? किती निधी आणतात? हे मी पाहणार आहे. पण करायची म्हणून टीका करणार नाही, पुढील वर्षभर मी नव्या खासदारांच्या विरोधात बोलणार नाही, त्यांच्यावर टीका करणार नाही.

मला वाटत कोणत्याही नव्याने निवडून आलेल्या लोकप्रतिनिधीला वेळ दिला गेला पाहिजे. कल्याण काळे हे नुकतेच खासदार म्हणून निवडून आले आहेत. मतदारसंघातील विकासकामांसाठी त्यांना वेळ दिला पाहिजे, सहा-महिने वर्षभर या जिल्ह्याचा माजी खासदार म्हणून माझेही बारकाईने लक्ष राहणार आहे. पण निवडणुकीत पराभूत झालो म्हणून आकस बुद्धीने काळे यांच्यावर मी कुठलीही टीका करणार नाही. वर्षभर त्यांच्या कामाचे मुल्यमापन करूनच त्यांच्याबद्दलचे मत आणि भूमिका ठरवेन, असे रावसाहेब दानवे म्हणाले.

नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत रावसाहेब दानवे यांचा जालना मतदारसंघातून काँग्रेस-महाविकास आघाडीचे डाॅ. कल्याण काळे यांनी पराभव केला. (Jalna) 1 लाख 9 हजारांच्या मताधिक्याने पराभव झाल्यानंतरही रावसाहेब दानवे यांनी काळे यांना वर्षभर वेळ देत त्यांच्यावर टीका करणार नसल्याचे सांगितले. दानवे यांच्या या भूमिकेची जिल्ह्यात चर्चा होत आहे.

एकीकडे दानवे नवनिर्वाचित खासदार यांच्यावर टीका करणार नाही, असे सांगत आहेत, तर दुसरीकडे त्यांचे समर्थक मात्र दानवे यांच्या पराभवामुळे जालना जिल्ह्याचे आणि मराठवाड्याचे मोठे नुकसान झाल्याचा दावा करत आहेत. लोकसभा निवडणुकीचा निकाल लागण्यापुर्वी काँग्रेसच्या कल्याण काळे यांनी मतदारसंघात आभार दौरा केला होता. निकालानंतरही त्यांनी मतदारांचे आभार मानण्यासाठी महिनाभर मतदारसंघ पिंजून काढला होता. आता जालना मतदारसंघासाठी खासदार म्हणून काळे काय करतात? याकडे त्यांच्या विरोधकांचे लक्ष तर असणार आहेच? पण मतदारांनाही याची उत्सूकता असणार आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT