Dr.Bhagwat Karad-Chandrakant Khaire
Dr.Bhagwat Karad-Chandrakant Khaire Sarkarnama
मराठवाडा

Aurangabad : हो आम्हीही सत्तेत होतो, पण महापालिकेवर खैरेंचाच रिमोट कंट्रोल होता..

सरकारनामा ब्युरो

औरंगाबाद : शहरातील पाणी प्रश्न गंभीर बनला असतांना महाविकास आघाडी सरकार पाणी योजने संदर्भात चालढकल करत आहे. (Bjp) शहरातील ज्या १७ पाण्याच्या टाक्यांचे भुमीपूजन झाले त्याची अवस्था आज काय आहे हे पहा. एवढेच कशाला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ज्या ठिकाणी पाण्याच्या टाकीचे भुमीपूजन केले तिथे तरी काम झाले आहे का? असा सवाल करत केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डाॅ.भागवत कराड (Dr.Bhagwat Karad) यांनी शिवसेनेवर टीका केली.

पाणी प्रश्नाला भाजप देखील जबाबदार असल्याचा आरोप आमच्यावर केला जातो. कारण महापालिकेत आम्ही देखील पंचवीस वर्ष सत्तेत होतो. हो आम्ही सत्तेत होतो, पण महापालिकेवर शिवसेनेच्या चंद्रकांत खैरे (Chandrakant Khaire) यांचाच रिमोट कंट्रोल चालायचा, त्यामुळे महत्वाच्या विषयात आम्हाला नेहमी डावलले जायचे, असे सांगत पाण्याची आज शहरात जी बिकट अवस्था आहे त्याला शिवसेनाच (Shivsena) जबाबदार असल्याचे कराड यांनी ठणकावून सांगितले.

राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत उद्या (ता.२३) शहरात भाजपच्या वतीने महापालिकेवर जल आक्रोश मोर्चा काढण्यात येणार आहे. या मोर्चा संदर्भात माहिती देण्यासाठी आयोजित पत्रकार परिषदेत डाॅ. कराड यांनी नव्या पाणी योजनेची अवस्था आणि चिघळलेला पाणी प्रश्न याला शिवसेनाच कशी जबाबदार आहे हे सांगितले. कराड म्हणाले, देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असतांना त्यांनी शहरासाठी १६८० कोटींची पाणी योजना मंजुर केली.

आमदार अतुल सावे यांनी महापालिकेची आर्थिक स्थिती पाहता एक रुपयाही भरावा लागू नये, योजनेसाठी संपुर्ण निधी राज्य सरकारने द्यावा, अशी मागणी केली आणि ती मंजुरही झाली. पण राज्यात सत्तांतर झाले आणि या महाविकास आघाडी सरकारने आधीची योजना बदलली आणि महापालिकेला ६०० कोटी रुपये भरायला सांगितले. त्यामुळे आता ही योजना रखडली आहे.

जु्न्या पाण्याच्या टाक्यापैकी काही टाक्यांना कनेक्शनच नाही, तर आता नव्याने होणाऱ्या एकूण टाक्यापैकी १७ टाक्यांचे काम हे संथ आणि अर्धवट आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भुमीपूजन केलेल्या टाकीचे काम देखील रेंगाळले आहे. या पाणी योजनेसाठी केंद्राकडून लागणाऱ्या परवानगीसाठी अद्याप महापालिकेने राज्याकडे आणि राज्य सरकारने केंद्राकडे अर्ज केलेला नाही. मी पाठपुरावा करत आहे, पण राज्य सरकार काहीच हालचाल करत नाहीये.

नवी पाईप लाईन जुन्या पैठण रोडवरून टाकणार की मग नव्या राष्ट्रीय महामार्गावरून हे देखील स्पष्ट नाही. मग योजना वेगाने कशी पुर्ण होणार ? असा सवाल देखील कराड यांनी केला. या सगळ्या विषयाचा जाब विचारण्यासाठी भाजपचा हा जल आक्रोश मोर्चा आहे. भाजप पंचवीस वर्ष सत्तेत होती असा प्रश्न केला जातो.

आम्हालाही मान्य आहे आम्ही महापालिकेत शिवसेनेसोबत २५ वर्ष सत्तेत होतो, आमचेही महापौर झाले. पण शिवसेनेने नेहमी सभागृह नेता हे महत्वाचे पद कायम आपल्याकडे ठेवले. शिवसेनेचे तत्कालीन खासदार चंद्रकांत खैरे यांचा महापालिकेवर रिमोट कंट्रोल चालायचा. ते सांगतिल तेच विषय सभागृह नेता सभागृहात मांडायचा.

अशा परिस्थीतीत देखील आमच्या नगरसेवकांनी वेळोवेळी पाण्यााठी आंदोलने केली. गेल्या सहा महिन्यांपासून आम्ही सातत्याने आंदोलन करत आहोत, असेही कराड यांनी यावेळी सांगितले. आमचे उपमहापौर विजय औताडे यांनी पाणी प्रश्नावरच राजीनामा दिला होता, असा दावा देखील कराड यांनी केला. तेव्हा पत्रकारांनीच त्यांचा हा दावा खोडून काढला.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT