Mithi River News Sarkarnama
महाराष्ट्र

Mithi River News : `मिठी`, चा चिखल कुणाकुणाच्या अंगावर ? एकदा सोक्षमोक्ष लावाच..

सरकारनामा ब्युुरो

Monsoon News : मिठी नदीतील गाळ उपसा, खोलीकरण, सौदर्यीकरण आणि या भागातील लोकांच्या पुनर्वसनाचा प्रश्न या विषायवर भाजपचे आमदार प्रसाद लाड यांनी सभागृहात लक्षवेधी मांडली. (Mithi River News) यावर ठाकरे गटाचे आमदार अॅड. अनिल परब, काॅंग्रेसचे भाई जगताप, शेकापचे जयंत पाटील, भाजपचे प्रवीण दरेकर या सर्वांनी आक्रमक भूमिका मांडली.

महापालिका आणि एमएमआरडीएच्या भांडणात या भागातील लोकांचे पुनर्वसन रखडले. गाळ काढल्याच्या आणि तो नेऊन टाकल्याच्या बोगस पावत्या तयार करून कोट्यावधींचा भ्रष्टाचार केला जातोय असा आरोप आमदारांनी सभागृहात केला. यात सत्ताधारी आणि विरोधकांनी एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप केले. यावर अॅड. अनिल परब (Anil Parab) यांनी मिठी नदीचा चिखल कुणाकुणाच्या अंगावर उडाला आहे, कुणाच्या खिशात गेला आहे? याचा एकदा सोक्षमोक्ष लावाच, अशी मागणी सभागृहात केली.

अगदी २००५ ते आताच्या २०२३ पर्यंतची चौकशी करा. मग त्यात जी नावे समोर येतील, त्यानंतर ही चौकशीच गुंडाळली जाईल, असा टोला देखील परब यांनी भाजपच्या आमदारांना लगावला. (Monsoon Session) मिठी नदीतील गाळ आणि खोलीकरण, सौदर्यीकरण, रखडेलेले पुनर्वसन या मुद्यावर दोन्ही बाजूंचे आमदार आक्रमक झाल्याचे पहायला मिळाले. एमएमआरडीएने नेमलेले कंत्राटदार भ्रष्टाचार करतात, त्यांना पाठीशी का घातले जाते? असा आरोप परबांनी केला तेव्हा मंत्री उदय सामंत (Uday Samant) आणि त्यांच्यात खडांजगी झाली.

या प्रकरणाची उचस्तरीय चौकशी केली जाईल, असे सामंत यांनी स्पष्ट केले. मिठी नदीच्या साफसफाईवर हजारो कोटी खर्च झालेत, ते कुठे झाले हे कळाले पाहिजे. २०२२ साली किती टन गाळ काढला हे सांगितले, पण हा गाळ कुठे टाकला. आपल्याकडे तो टाकण्यासाठी जागाच नाही. नदी पात्रावरील अतिक्रमण, तेथील रहिवाशांचे स्थलांतर कधी केले जाईल? असा मुद्दा भाई जगताप यांनी उपस्थितीत केला.

यावर भिवंडी येथे गाळ टाकण्यास कंत्राटदाराला सांगितले आहे. आसपासच्या गावात गाळ टाकला जात असल्याच्या नोंदी आहेत, पण याबद्दल अनेक तक्रारी असल्याने याची उच्चस्तरीय चौकशी केली जाईल, असे सामंत यांनी उत्तरात स्पष्ट केले. सतरा वर्षापासून मिठी नदी गोड होण्याऐवजी कडू होत आहे. गाळ काढण्याच्या बोगस पावत्या दाखवून कामात मोठा भ्रष्टाचार केला जात आहे. याची चौकशी झाली की हातमिळवणी कोणाची हे लक्षात येईल.

भिवंडीला गाड्याच जात नाही, खोटे रेकाॅर्ड तयार केले गेले आहे. खोलीकरण, सौदर्यीकरणाचे काय झाले? किती खर्च केले? याची एसआयटी चौकशी करा, अशी मागणी प्रवीण दरेकर यांनी केली. सौदर्यीकरणासाठी एजन्सी नेमली आहे. डीपीआर तयार करण्याचे काम सुरू, महापालिकेकडे हा आराखडा सादर करण्यात आला असून काही दिवसांतच सौदर्यीकरणाचे काम करणार असल्याचे सामंत यांनी सांगितले. २००५ मध्ये पूर आल्यापासून मिठी नदीवर खरे काम सुरू झाले २०१३ पर्यंत महापालिका हे काम करत होती. नंतर यात एमएमआरएडी आली. २००५ ते आतापर्यंतची सविस्तर चौकशी करा, कोणाच्या खिशात चिखल गेला येवू द्या समोर. पुनर्वसनाचे काम रखडले, दोनदा चाव्या वाटल्या पण घरे मिळाली नाहीत. ९१ लोकांना मागच्या वर्षी उद्धव ठाकरेंच्या हस्ते घराच्या चाव्या दिल्याचे परब यांनी सांगितले.

मिठी नदीच्या भागातील लोकांच्या पुनर्वसनाचे काम एमएमआरडीचेच आहे. त्यामुळे २००५ पासून ते २०२३ पर्यंतच्या कामाची सविस्तर चौकशी करा, जे सापडतील त्यांच्यावर ईडी, सीबीआयची कारवाई, करा अशी मागणी परब यांनी केली. सॅटलाईटद्वारे गाळ किती काढला, खोली किती केली याची माहिती मिळू शकते. ती आपण घेणार का? असा प्रश्न जयंत पाटील यांनी उपस्थितीत केला. यावर माहिती पटलावर ठेवण्यात येईल असे सांगतांनाच लाड यांनी पुन्हा उपप्रश्न उपस्थितीत करत एसआयटी चौकशीची मागणी केली. त्यावर मंत्री सांत यांनी याची एसआयटी चौकशी करण्याची घोषणा सभागृहात केली.

Edited By : Jagdish Pansare

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT