Ameya Khopkar- Gulabrao Patil  Sarkarnama
महाराष्ट्र

'असे नेते मिळाले हेच आपलं दुर्दैव'; मनसेचा शिवसेनेवर पलटवार

सरकारनामा ब्युरो

मुंबई : अतिवृष्टी (Heavy Rain) आणि गुलाब चक्रीवादळामुळे (Gulab cyclone) मराठवाड्यासह (Marathwada) राज्यातील अनेक भागातील शेतपिकांचे (Crops) प्रचंड नुकसान झाले आहे. हे नुकसान पाहता राज्यात ओला दुष्काळ (Wet drought) जाहीर करा, अशी मागणी काल मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी राज्यातील महाविकास आघाडी सरकारकडे (Mahavikas Aaghadi) केली. त्या मागणीवर राज्याचे पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील (Gulabrao Patil) यांनी टीका केली. राज ठाकरेंनी मागणी केली म्हणजे मोठं काम केलं नाही, असा टोला गुलाबराव पाटील यांनी लगावला.

आता या टिकेला मनसे नेते अमेय खोपकरांनी ट्विट करत गुलाबराव पाटलांवर निशाणा साधला आहे. '' गुलाब चक्रीवादळामुळे समजलं की गुलाबरावांच्या डोक्यात किती दुष्काळ आहे ते.राजसाहेब यांनी केलेली मागणी सध्याच्या परिस्थितीत अतिशय योग्य आहे.पण संवेदनाहीन गुलाब ना शेतकऱ्यांचं नुकसान कसं दिसणार? भ्रष्टाचाराचा महापूर आणि अकलेचा दुष्काळ,असले नेते आपल्याला मिळाले हेच तर आपलं दुर्दैव आहे.'' असे म्हणत अमेय खोपकरांनी गुलाबराव पाटलांवर पलटवार केला आहे.

दरम्यान, मराठवाड्यासह राज्यातील अतिवृष्टी आणि चक्रीवादळामुळे झालेले नुकसान पाहता राज्यात ओला दुष्काळ जाहीर करावा आणि प्रत्येक नुकसानग्रस्ताला प्रत्येकी 50 हजार रुपये आर्थिक मदत दिली जावी, अशी मागणी राज ठाकरे यांनी केली होती. त्या मागणीवर मंत्री गुलाबराव पाटील यांनी नाशिक दौऱ्यावर असताना उत्तर दिले.

'राज ठाकरे यांनी मागणी केली हे मान्य आहे. पण त्यांनी मागणी केली म्हणजे काही मोठं काम केलं नाही. राजकारण करू नका. मागणी करणं सोपं आहे. पण निर्णय पंचनाम्यानंतरच घेतला जाईल. प्रत्येक जिल्ह्याची परिस्थिती पाहून ओला दुष्काळ जाहीर केला जाईल, '' असंही त्यांनी सांगितलं.

गुलाब चक्रीवादळामुळे राज्यातील किनापट्टी भागासह अनेक जिल्ह्यांना चांगलाच फटका बसला आहे. गुलाब चक्रीवादळामुळे मराठवाड्याच दोन दिवसांत १० पैकी ७ जिल्ह्यांत १७० ते १८० मिमी पावसाची नोंद करण्यात आली आहे. शेतपिकांसह जमीनींचेही प्रचंड नुकसान झाले आहे. गुलाब चक्रीवादळामुळे मराठवाड्यात सर्वाधिक नुकसान झाले आहे. सोयाबीन, कापूस, तूर, मूग, उडीद, आदी पिके 100 टक्के पाण्याखाली गेली आहेत. तर फळबागांही उद्ध्वस्त झाल्या आहेत. तर जळगाव जिल्ह्यात 3500 हेक्टरवरील केळीच्या बागा उद्धवस्त झाल्या आहेत. घरं आणि शेतजमिनीचंही अतोनात नुकसान झालं आहे.

तर दूसरीकडे राज्याचे मदत आणि पुनर्वसनमंत्री विजय वडेट्टीवार यांनीदेखील याबाबत माहिती दिली आहे. "अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीचा आढावा घेण्यासाठी मुख्यमंत्री मराठवाड्याचा पाहणी दाैरा करणार आहेत. गुलाब चक्रीवादळ आणि अतिवृष्टीने राज्यात सुमारे ७ ते ८ हजार कोटींचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. यासाठी पुढील आठवड्यातील राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत दुष्काळ जाहीर करण्याबाबत चर्चा केली जाईल,''असंही वडेट्टीवार यांनी म्हटल आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT