राज्यात दिवसेंदिवस उष्णतेचा तडाखा वाढत असल्याने नागरिकांच्या नजरा आता मान्सूनकडे लागल्या आहेत. मात्र यंदा पावसाबाबतची परिस्थिती चिंताजनक असल्याचे संकेत विविध हवामान अहवालांतून मिळत आहेत. महाराष्ट्रासह देशातील अनेक भागांमध्ये मान्सूनची गती मंदावल्याने शेतकरी, नागरिक आणि प्रशासनाची चिंता वाढली आहे.
भारतीय हवामान विभागाच्या आकडेवारीनुसार, 4 जून ते 18 जून या कालावधीत देशात केवळ 42.6 मिमी पावसाची नोंद झाली आहे. साधारणपणे याच काळात 72.2 मिमी पर्जन्य अपेक्षित असतो. त्यामुळे देशभरात पावसाची मोठी तूट निर्माण झाल्याचे चित्र दिसत आहे. महाराष्ट्राच्या दक्षिण भागात मान्सून पोहोचला असला तरी त्याची पुढील वाटचाल संथ झाली आहे.
हवामान तज्ज्ञांच्या मते, प्रशांत महासागरात सक्रिय होत असलेल्या ‘एल निनो’मुळे मान्सूनवर परिणाम होण्याची शक्यता वाढली आहे. समुद्राच्या पृष्ठभागावरील तापमान वाढल्यामुळे वातावरणातील वाऱ्यांच्या हालचाली बदलतात आणि त्याचा परिणाम भारताकडे येणाऱ्या आर्द्र वाऱ्यांवर होतो. परिणामी पावसाचे प्रमाण कमी होण्याची शक्यता निर्माण होते.
एल निनो (El Niño) ही एक जागतिक हवामान प्रणाली आहे, ज्यामध्ये मध्य आणि पूर्व-उष्णकटिबंधीय पॅसिफिक महासागरातील समुद्राचे तापमान सामान्य तापमानापेक्षा जास्त वाढते. ही घटना दर २ ते ७ वर्षांनी उद्भवते आणि जगभरातील हवामानावर, विशेषतः मान्सूनवर तीव्र परिणाम करते
यंदा सुरुवातीला एल निनोचा प्रभाव उशिरा जाणवेल, असा अंदाज व्यक्त करण्यात आला होता. मात्र तो अपेक्षेपेक्षा लवकर सक्रिय झाल्याने अनेक भागांमध्ये पाऊस कमी पडत असल्याचे दिसून येत आहे. हवामान संस्थांच्या अंदाजानुसार जुलै आणि ऑगस्ट महिन्यांत एल निनो अधिक प्रभावी होऊ शकतो.
IMD ने यंदाच्या मान्सून हंगामात सरासरीपेक्षा कमी पावसाचा अंदाज व्यक्त केला आहे. संपूर्ण हंगामातील पर्जन्यमान हे दीर्घकालीन सरासरीच्या सुमारे 90 ते 92 टक्क्यांदरम्यान राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे काही भागांमध्ये दुष्काळसदृश परिस्थिती निर्माण होण्याची भीती व्यक्त होत आहे.
कमी पावसाचा सर्वाधिक फटका शेती क्षेत्राला बसू शकतो. भात, सोयाबीन, कापूस, मका आणि कडधान्यांच्या उत्पादनावर परिणाम होण्याची शक्यता आहे. पाणीटंचाई, जलाशयांतील घटता साठा आणि पशुधनासाठी चाऱ्याची कमतरता यासारख्या समस्या देखील वाढू शकतात. त्याचबरोबर कृषी उत्पादन घटल्यास भाजीपाला, धान्य आणि कडधान्यांच्या किमती वाढून महागाईचा दबाव वाढण्याची शक्यता आहे.
तज्ज्ञांच्या मते, जुलै ते नोव्हेंबर हा कालावधी अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे. पुढील काही महिने मान्सूनची स्थिती, एल निनोची तीव्रता आणि इतर हवामान घटक यावर देशातील पावसाचे चित्र अवलंबून राहणार आहे. त्यामुळे शेतकरी, प्रशासन आणि नागरिकांनी परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवण्याची गरज निर्माण झाली आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.