Vivek Bhimnawar first reaction on MPSC controversy Sarkarnama
महाराष्ट्र

MPSC chairman : राहुल गांधींच्या स्टेजवर MPSC तील घोटाळ्याचा मुद्दा गाजला; राजीनाम्याची मागणी होताच अध्यक्ष म्हणाले, पेपर आधीच फुटला...

Vivek Bhimnawar first reaction on MPSC controversy : राहुल गांधींच्या कार्यक्रमात MPSC घोटाळा आणि पेपरफुटीचा मुद्दा गाजला. अध्यक्षांच्या राजीनाम्याची मागणी होताच विवेक भीमनवार यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...

Rashmi Mane

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या अन्न व औषध प्रशासन विभागातील 'ड्रग्ज इन्स्पेक्टर' (औषध निरीक्षक) भरती परीक्षेच्या पेपर फुटीच्या प्रकरणावरून राज्यातील राजकीय वातावरण तापले आहे. या प्रकरणाची जबाबदारी स्वीकारून MPSC अध्यक्ष विवेक भीमनवार यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी विरोधकांसह विविध विद्यार्थी संघटनांकडून करण्यात येत आहे.

पुण्यात झालेल्या 'छात्रों की गूंज' या कार्यक्रमात खासदार राहुल गांधी यांच्या उपस्थितीत एका विद्यार्थिनीने या घोटाळ्याचा पर्दाफाश केला होता, ज्यानंतर आयोगाला ही परीक्षा रद्द करावी लागली. राज्यातील अनेक ठिकाणी त्यांच्या राजीनाम्यासाठी आंदोलनेही सुरू आहेत. वाढत्या विरोधाच्या पार्श्वभूमीवर विवेक भीमनवार यांनी प्रथमच सविस्तर भूमिका मांडली आहे.

औषध निरीक्षक परीक्षेच्या प्रश्नपत्रिका फुटीचे प्रकरण जानेवारी 2026 मध्ये घडल्याचे त्यांच्या निवेदनात नमूद करण्यात आले आहे. दरम्यान, विवेक भीमनवार यांनी MPSC अध्यक्षपदाची शपथ 18 फेब्रुवारी 2026 रोजी घेतली, तर 3 मार्च 2026 रोजी त्यांनी प्रत्यक्ष पदभार स्वीकारला. त्यामुळे प्रश्नपत्रिका फुटीची घटना आपल्या अध्यक्षपदाचा कार्यभार स्वीकारण्यापूर्वीची असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे.

या प्रकरणात आयोगाने तक्रार दाखल केली असून पोलिसांकडून तपास सुरू असल्याचेही भीमनवार यांनी सांगितले. भविष्यात अशा घटनांची पुनरावृत्ती होऊ नये यासाठी आयोगाने अंतर्गत उच्चस्तरीय समिती स्थापन केली आहे. परीक्षा प्रक्रियेतील आवश्यक सुधारणा सुचवण्यासाठी शासनानेही स्वतंत्र उच्चस्तरीय समिती स्थापन केल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

अध्यक्षपदाची जबाबदारी स्वीकारल्यानंतर परीक्षा आणि भरती प्रक्रियेतील पारदर्शकता, सुरक्षितता आणि विश्वासार्हता वाढवण्यावर आपला भर असल्याचे भीमनवार यांनी म्हटले आहे. उमेदवारांना समान आणि न्याय्य संधी मिळणे ही आपली घटनात्मक जबाबदारी असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

राजीनाम्याच्या मागणीवर प्रतिक्रिया देताना त्यांनी म्हटले, "कोणत्याही गंभीर आरोपाचे मूल्यांकन हे वस्तुस्थिती, अधिकृत नोंदी आणि पुराव्यांच्या आधारेच झाले पाहिजे."तसेच राजकीय आरोप-प्रत्यारोपांपासून हा विषय दूर ठेवण्याचे आवाहनही त्यांनी केले. "सार्वजनिक भरतीसारख्या अत्यंत महत्त्वाच्या विषयांमध्ये लाखो तरुण उमेदवारांचे भवितव्य गुंतलेले आहे. त्यामुळे अशा विषयांचे वैयक्तिक आरोप किंवा राजकीय वादामध्ये रूपांतर होऊ नये," असे भीमनवार यांनी स्पष्ट केले. आता MPSC अध्यक्षांच्या या स्पष्टीकरणानंतर विरोधक आणि विद्यार्थी संघटना काय भूमिका घेतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT