MPSC introduces major changes in examination process: महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षा पद्धतीत पारदर्शकता, अचूकता आणि वेग आणण्यासाठी राज्य सरकारने तीन मोठे बदल प्रस्तावित केले आहेत.
विधानपरिषदेत नियम २६० अन्वये झालेल्या चर्चेला उत्तर देताना भाजप नेते आशिष शेलार यांनी या महत्त्वपूर्ण सुधारणांची अधिकृत घोषणा केली. हे बदल म्हणजे विद्यार्थ्यांवर लादलेली नवी पद्धत नसून, परीक्षा प्रक्रियेचे 'सुसूत्रीकरण' करण्याचा सरकारचा प्रामाणिक प्रयत्न असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
आता परीक्षा कॉम्प्युटर बेस्ड टेस्ट
गट 'क' संयुक्त पूर्व परीक्षा आता ऑनलाईन होणार आहे. गट 'क' संवर्गाची संयुक्त पूर्व परीक्षा आता पारंपरिक ओएमआर (OMR - ऑप्टिकल मार्क रेकग्निशन) म्हणजेच गोल किंवा बबल करण्याच्या पद्धतीऐवजी 'कॉम्प्युटर बेस्ड टेस्ट' (CBT) द्वारे ऑनलाईन घेतली जाईल.
पूर्व परीक्षा वर्षातून दोन वेळा
गट 'अ', गट 'ब' (राजपत्रित व अराजपत्रित) आणि गट 'क' या संवर्गांच्या पूर्व परीक्षा आता वर्षातून दोन किंवा त्यापेक्षा जास्त वेळा आयोजित केल्या जातील. यामुळे विद्यार्थ्यांना एकाच वर्षात परीक्षा देण्याच्या अधिक संधी मिळतील.
मुख्य परीक्षेतून वैकल्पिक विषय वगळले
महाराष्ट्र नागरी सेवा गट 'अ' आणि गट 'ब' मुख्य परीक्षांसाठी २०२७ पासून 'वैकल्पिक विषय' पूर्णपणे वगळण्यात आले आहेत.
आशिष शेलार यांनी या निर्णयामागची पार्श्वभूमी स्पष्ट करताना सांगितले की, "५ मे २०२६ च्या शासन निर्णयानुसार आता बहुतांश पदभरती एमपीएससीकडे वर्ग करण्यात आली आहे. पूर्वी वर्षाला ६ ते ७ हजार पदांची भरती व्हायची, ती आता ५० ते ६० हजार प्रतिवर्ष इतकी वाढणार आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणावर ऑफलाईन परीक्षा घेण्यासाठी दर शनिवार-रविवारी शाळा, महाविद्यालये मिळणे कठीण होते."
तसेच, २५ जून २०२६ रोजी प्रसिद्ध झालेल्या अवघ्या २,६१९ पदांच्या गट 'क' परीक्षेसाठी ४ लाखांपेक्षा जास्त अर्ज आले आहेत. यावरून वाढती व्याप्ती लक्षात घेऊन तंत्रज्ञानाचा वापर करणे अनिवार्य झाले आहे.
ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना ऑनलाईन परीक्षेची अडचण येईल का, या शंकेचे निरसन करताना शेलार म्हणाले की, राज्यातील ग्रामीण भागातील मुले आज जेईई, कॅट , नीट आणि बँकिंगच्या परीक्षा ऑनलाईन म्हणजे सीबीटी (CBT) पद्धतीनेच देतात. रेल्वे आणि एसएससीच्या परीक्षा कोट्यवधी मुले याच पद्धतीने देत आहेत. केरळ, तेलंगणा, कर्नाटक यांसारख्या अनेक राज्यांनी ही पद्धत आधीच स्वीकारली आहे.
परीक्षेतील गुण समानीकरणाच्या पद्धतीला सर्वोच्च न्यायालयानेही मान्यता दिली असून, विद्यार्थ्यांच्या उत्तरपत्रिका त्यांच्या डिजिटल अकाउंटवर अपलोड केल्या जातील, ज्यामुळे प्रक्रियेत पूर्ण पारदर्शकता येईल. स्पर्धा परीक्षा देणाऱ्या उमेदवाराला त्याच वर्षात परीक्षा देऊन, त्याच वर्षात नियुक्ती मिळवून देणे हेच या सुधारणांचे मुख्य उद्दिष्ट असल्याचे त्यांनी सांगितले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.