Thane News : राज्यात सध्या 29 महापालिकांचा रणसंग्राम सुरू आहे.या निवडणुकीसाठी सर्वच राजकीय पक्षांनी पूर्ण ताकद पणाला लावली आहे. काही तासांतच आता महापालिका निवडणुकांच्या प्रचाराच्या तोफा थंडावणार आहे.या निवडणुकीत काही ठिकाणी नगरसेवकांची बिनविरोध निवड झाली.याच निवडीवरुन आरोप-प्रत्यारोपांनी राजकारण तापलं आहे.अशातच आता राज ठाकरेंच्या कट्टर नेत्यानं मोठं पाऊल उचललं आहे.
मनसे नेते अविनाश जाधव (Avinash Jadhav) यांनी मुंबई उच्च न्यायालयात बिनविरोध निवडून आलेल्या नगरसेवकांच्या विरोधात याचिका दाखल केली आहे. राज्यातील महापालिका निवडणुकांसाठीचा प्रचाराचा मंगळवारी (ता.13 जानेवारी)अंतिम दिवस आहे. पण आता महापालिका निवडणुकांतील बिनविरोध नगरसेवकांचा मुद्दा तापण्याची शक्यता आहे.
मुंबई उच्च न्यायालयात मनसे नेते अविनाश जाधव यांनी बिनविरोध निवडी संदर्भात दाखल केलेल्या याचिकेवर बुधवारी (ता.14) बिनविरोध संदर्भातील याचिकेवर तातडीची सुनावणी होणार आहे. ही सुनावणी उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायमूर्तींच्या खंडपीठासमोर होणार आहे. मनसे नेते अविनाश जाधव यांनी बिनविरोधचा मुद्दा तापवताना न्यायालयाचा दरवाजा ठोठावल्यामुळे आता बिनविरोधचा गुलाल उधळलेल्या उमेदवारांची धडधड वाढली आहे.
मनसे नेते अविनाश जाधव यांनी मुंबई उच्च न्यायालयात दाखल केलेल्या याचिकेत बिनविरोध निवडून आलेल्या नगरसेवकांच्या निवडीला स्थगिती देण्यात यावी अशी मागणी केली आहे. तसेच जोपर्यंत सुनावणी पूर्ण होत नाही तोवर नगरसेवकांच्या बिनविरोध निवडीला स्थगिती कायम ठेवण्यात यावी,असाही उल्लेख या याचिकेत करण्यात आल्याची माहिती समोर येत आहे.
राज्यात एकीकडे महापालिका निवडणुकांमध्ये बिनविरोध नगरसेवक निवडीचा मुद्दा चांगलाच तापला आहे. विरोधकांनी महायुतीतील भाजप,शिवसेना,राष्ट्रवादी काँग्रेसच्या बिनविरोध निवडीवर आक्षेप घेतला आहे. महापालिका निवडणुकीत उमेदवारांवर अर्ज माघारी घेण्यासाठी दबाव आणला जात असल्याचा आरोप विरोधकांकडून केला जात आहे. कोट्यवधी रुपयांच्या ऑफर विरोधातल्या उमेदवारांना दिल्या जात असल्याचा दावा नेतेमंडळींकडून करण्यात येत आहे. यामुळे राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.
महायुतीतील सर्वात मोठा पक्ष असलेला भाजप निवडणुका बिनविरोध करण्यात सर्वात पुढे आहे. भाजपचे आतापर्यंत तब्बल 44 उमेदवार बिनविरोध विजयी झाले आहेत. त्यानंतर एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेचे 22 नगरसेवकांची बिनविरोध निवड झाली आहे. यात अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे 2, मालेगावमधून 1 आणि एक अपक्ष उमेदवाराचाही बिनविरोध निवड झालेल्यांमध्ये समावेश आहे.
मुंबई उच्च न्यायालयात (Mumbai High Court) होत असलेल्या सुनावणीकडे आता सर्वच राजकीय पक्षांसह बिनविरोध निवडून आलेल्या उमेदवारांचं लक्ष लागलेलं आहे. या सुनावणीत मुंबई उच्च न्यायालयाने मनसेचे याचिका ग्राह्य धरली, तर सर्व बिनविरोध निवडून आलेल्या नगरसेवकांच्या निवडीला स्थगिती मिळू शकते.
यापूर्वी निवडणुकांमध्ये बिनविरोध निवडी होत होत्या.पण यंदाच्या निवडणुकीत मोठ्या प्रमाणात नगरसेवकांची बिनविरोध निवड होत असल्यानं विरोधकांसह मतदारांमध्येही संशयाचं वातावरण आहे. यंदाच्या निवडणुकीत उमेदवारांना धमक्यांची,अमिषांच्या जाहीर तक्रारी केल्याचं दिसून आलं आहे.अर्ज भरू न देणं,माघारीसाठी दबाव टाकणं याबाबत अनेक तक्रारी समोर आल्या आहेत.
महत्वाची बाब म्हणजे राज्यात जवळपास महापालिका निवडणुकीत तब्बल 68 नगरसेवक मतदानाआधीच निवडून आले आहेत.यात बिनविरोध निवड झालेल्या उमेदवारांविरोधात कोणी उमेदवारच समोर आला नसल्याचा किंवा अर्ज दाखल केल्यानंतर उमेदवारी मागे घेण्यासारखी कारणं समोर आली आहे. तसेच काही ठिकाणी संबंधित उमेदवारांना धमक्यांसह अमिषे दिले गेल्याचा आरोपही करण्यात आले आहेत. याविषयीच्या काही तक्रारी थेट निवडणूक आयोगापर्यंत पोहोचल्या आहेत. पण त्यावर आजवर कोणतीही कारवाई करण्यात आलेली नाही.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.