NCP Leader Jayant Patil On Vishalgad Illegal Encroachment  Sarkarnama
महाराष्ट्र

Vishalgad News : शिवप्रेमी नावाखाली दंगल..., विशाळगडावरील हिंसाचारावर जयंत पाटलांनी सुनावलं; म्हणाले, "खुद्द शिवाजी महाराजांना…"

Jagdish Patil

Vishalgad Illegal Encroachment : विशाळगड परिसरात अतिक्रमण काढण्याच्या नावाखाली झालेल्या हिंसाचाराच्या घटनेमुळे जिल्ह्यासह राज्यातील वातावरण तणावपूर्ण बनलं आहे. या ठिकाणी झालेला हिंसाचार दुर्दैवी असल्याचं विरोधक म्हणत आहेत.

शिवाय या ठिकाणची परिस्थिती हाताळण्यात प्रशासन कमी पडल्याचा आरोप काँग्रेस नेते सतेज पाटील (Satej Patil) यांनी केला आहे. अतिक्रमण चुकीच्या पद्धतीने काढल्याचंही काही नेते म्हणत आहेत. मात्र, आपण केलेल्या कारवाईचा आपणाला आनंद असल्याचं संभाजीराजे छत्रपती यांनी म्हटलं आहे.

एकीकडे संभाजीराजे छत्रपती (Sambhaji Raje Chhatrapati) यांनी आपल्या कृतीचं समर्थन केलं आहे. तर दुसरीकडे कोल्हापूरचे खासदार शाहू महाराज छत्रपती (Shahu Maharaj) यांनी मंगळवारी विशाळगडाला भेट देऊन तेथील परिस्थितीची पाहणी केली.

यावेळी स्थानिकांनी आपल्या व्यथा शाहू महाराजांसमोर मांडल्या. अशातच आता राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी देखील विशाळगड परिसरात झालेल्या हिंसाचाराचा निषेध केला आहे.

शिवप्रेमींच्या नावाखाली हिंसाचार व दंगल करण्याची कृती खुद्द छत्रपती शिवाजी महाराजांना देखील आवडली नसती, अशा शब्दात पाटील यांनी विशाळगडावरील नासधूस आणि तोडफोडीच्या घटनेचा निषेध नोंदवला आहे. जयंत पाटील (Jayant Patil) यांनी याबाबत एक पोस्ट एक्सवर शेअर केली आहे.

यामध्ये त्यांनी लिहिलं आहे की, "विशाळगडावरील बेकायदेशीर अतिक्रमण सनदशीर मार्गाने हटवण्याच्या प्रशासनाच्या कृतीला आमचे पूर्ण समर्थन आहे. मात्र, विशाळगडाला प्रचंड पाऊस असल्याकारणाने हे अतिक्रमण पावसाळ्यानंतर काढणे मानवतावादी दृष्टिकोनातून अधिक योग्य ठरले असते. मात्र, विशाळगडाच्या पायथ्यापासून दोन किलोमीटर अंतरावरील गजापूर या मुस्लीम बहुल वाडीतील घरांत घुसून नासधूस करणे आणि तेथील धार्मिक स्थळाचीही तोडफोड करण्याच्या काही समाज कटंकांच्या कृतीचा आम्ही कडक शब्दांत निषेध करतो.

शिवप्रेमी नावाखाली हिंसाचार व दंगल करण्याची कृती खुद्द छत्रपती शिवाजी महाराजांना देखील आवडली नसती. गजापुर येथील मुस्लिम बांधवांना लक्ष्य करत थेट हल्ला करण्यात आला आहे. या राज्यातील नागरिकांच्या जिविताचे व मालमत्तेचे रक्षण करण्यात हे सरकार असमर्थ ठरत आहे अशी टीका करत असताना अशा हल्लेखोरांवर कडक अजामीनपात्र कलमे लावून या हल्ल्यात विस्थापित झालेल्यांचे पुनवर्सन करण्यासाठी सरकारने त्वरित कार्यवाही करावी." अशी मागणी पाटील यांनी केली.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT