Controversy
Controversy Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकासाठी बोलविलेल्या विशेष ग्रामसभेत खडाजंगी

विलास कुलकर्णी

राहुरी ( जि. अहमदनगर ) - राहुरी तालुक्यातील टाकळीमिया येथे बुधवारी (ता. 2) छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकासाठी बोलविलेल्या विशेष ग्रामसभेत जोरदार खडाजंगी झाली. वाद-विवाद विकोपाला गेला. एका महिलेने थेट पोलिस ठाणे गाठत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष (उत्तर) रवींद्र मोरे यांच्यासह पाच जणांविरुद्ध विनयभंग, शिवीगाळ लाथाबुक्क्यांनी मारहाण केल्याचा गुन्हा नोंदविला. या प्रकरणामुळे आज राहुरी तालुक्यातील वातावरण तापले होते. ( A quarrel broke out in a special gram sabha called for the memorial of Chhatrapati Shivaji Maharaj )

महिलेने दाखल केलेल्या गुन्ह्यात रवींद्र बापुराव मोरे, सचिन भाऊसाहेब करपे, सुरेश ज्ञानदेव तोडमल, उमेश रावसाहेब कवाणे, बाळासाहेब शिंदे (सर्वजण रा. टाकळीमिया) यांचा आरोपीत समावेश आहे. बुधवारी (ता. 2) सकाळी साडेदहा वाजता टाकळीमिया ग्रामपंचायत कार्यालयासमोर‌ ग्रामसभा बोलविण्यात आली. अध्यक्षस्थानी सरपंच विश्वनाथ निकम होते.‌ गावात छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकासाठी जागा निश्चिती करून, लोकवर्गणी गोळा करण्याचा विषय होता.

रिपब्लिकन (आठवले गट) पक्षाच्या महिला कार्यकर्त्याने सभेत बोलतांना "छत्रपती शिवाजी महाराज यांचे स्मारक व्हावे. त्यास आमचा विरोध नाही. परंतु, इतरही महापुरुष आहेत. डॉ. बाबासाहेब आंबेडकर, अण्णाभाऊ साठे यांचेही पुतळे उभारावेत." असे सांगितले. त्यानंतर वादाला तोंड फुटले. तो वाद पोलिस ठाण्यात पोचला. गुन्हा दाखल झाल्यावर गावात तणावाचे वातावरण पसरले.

पोलिस ठाण्यावर मोर्चा

टाकळीमियाँ येथे बुधवारी ( ता. 2 ) ग्रामसभेत विनयभंग, मारहाण केल्याच्या एका महिलेच्या तक्रारीवरुन, गावातील पाच प्रतिष्ठीत नागरिकांवर दाखल केलेला गुन्हा खोटा आहे. त्याची शहानिशा करुन, त्वरीत गुन्हा मागे घ्यावा. या मागणीसाठी शेकडो नागरिकांनी काल (गुरुवारी) राहुरी पोलिस ठाण्यावर मोर्चा काढला. आरोपींना अटक केली नाही. येत्या तीन दिवसांत पुरावे गोळा करुन, सोक्षमोक्ष लावतो. कुणावरही अन्याय होणार नाही. असे अश्वासन पोलिस निरीक्षक प्रताप दराडे यांनी मोर्चेकऱ्यांना दिले. राहुरी पंचायत समितीचे माजी सभापती सुरेश निमसे, डॉ. तनपुरे कारखान्याचे माजी उपाध्यक्ष शामराव निमसे, माजी संचालक शिवशंकर करपे यांनी मोर्चाचे नेतृत्व केले.  देवळाली प्रवराचे माजी नगराध्यक्ष सत्यजित कदम, बाजार समितीचे संचालक दत्तात्रेय कवाणे, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रकाश देठे, संभाजी ब्रिगेडचे मच्छिंद्र गुंड, टाकळीमियाँचे सरपंच विश्वनाथ निकम, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्यांसह महिलांनी मोर्चात भाग घेतला. पाऊण तास मोर्चेकरी पोलिस ठाण्याच्या आवारात ठाण मांडून बसले.

त्या महिलेच्या पतीवर रस्ता लुटीचा गुन्हा

टाकळीमियाँ येथे दुचाकीवरुन घरी चाललेल्या दोन जणांना बुधवारी रात्री पावणेदहा वाजता रस्त्यात अडवून चाकुचा धाक दाखवून रोख पंचवीस हजार रुपये लुटण्यात आले. याप्रकरणी दोन जणांविरुद्ध राहुरी पोलिस ठाण्यात जबरी चोरीचा गुन्हा नोंदविण्यात आला आहे. बुधवारी ग्रामसभेत महापुरुषाच्या पुतळ्यावरुन झालेल्या वादानंतर पाच जणांविरुद्ध पोलिस ठाण्यात विनयभंग, मारहाणीचा गुन्हा दाखल केलेल्या महिलेच्या पतीचा आरोपीमध्ये समावेश आहे.

ग्रामसभेत वाद झाला. मात्र महिलेचा विनयभंग, शिवीगाळ, मारहाणीचा प्रकार घडला नाही. खोटा गुन्हा दाखल केल्याच्या निषेधार्थ काल (गुरुवारी) टाकळीमिया गावात कडकडीत बंद ठेवून, गुन्हा मागे घेण्याच्या मागणीसाठी राहुरी पोलीस ठाण्यावर मोर्चा काढण्यात आला.

- रवींद्र मोरे, जिल्हाध्यक्ष (उत्तर) स्वाभिमानी शेतकरी संघटना.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT