Dr. Sujay Vikhe Patil & Sangram Jagtap
Dr. Sujay Vikhe Patil & Sangram Jagtap Paresh Kapse
पश्चिम महाराष्ट्र

नामांतरावरून सुजय विखेंनी सुनावले मुख्यमंत्र्यांना खडे बोल : म्हणाले...

सरकारनामा ब्युरो

अहमदनगर - अहमदनगर शहरातील उड्डाणपुलावर छत्रपती शिवाजी महाराज यांचा चरित्रपट खासदार डॉ. सुजय विखे पाटील व आमदार संग्राम जगताप यांच्या संकल्पनेतून सकार होणार आहे. या कामाचा प्रारंभ आज करण्यात आला. त्यानंतर आयोजित पत्रकार परिषदेत खासदार डॉ. सुजय विखे पाटील ( Dr. Sujay Vikhe Patil ) यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व महाविकास आघाडीवर टीका केली. ( After the renaming, Sujay Vikhen told the Chief Minister to throw stones: said ... )

खासदार डॉ. सुजय विखे पाटील म्हणाले, राज्यात सभांचा खेळ झाला आहे. मनसेची सभा झाली की तिथे शिवसेनेची सभा होते. राज ठाकरे पुण्यात गेले की मुख्यमंत्री त्यांच्या मागे पळणार. राज ठाकरे सिंधुदुर्गला गेले की मुख्यमंत्री त्यांच्या मागे सिंधुदुर्गला पळणार. हाच उद्देश महाविकास आघाडी सरकारचा होता. शिवसेनेचा मुख्यमंत्री असूनही त्यांना विकासकामांपेक्षा दुसऱ्या कामांत गुंतवून ठेवणे. ते त्यातच भरकटत चालले आहेत. याचे मला दुःख वाटते. मुख्यमंत्र्यांनी या गोष्टीत न पडता, त्याचा पक्ष निधीच्या बाबतीत त्यांचे आमदार एवढे अस्वस्थ का यासाठी जास्तीत जास्त वेळ देणे आवश्यक असल्याचा टोला खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनी लगावला.

अहमदनगर व औरंगाबादच्या नामांतराबाबत त्यांनी सांगितले की, मी नामांतरावर विश्वास ठेवणारा माणूस नाही. काही जण पराभूत झाले की नावात थोडा बदल करतात. त्यातून समाजात काही बदल होणार नाही. औरंगाबाद मराठवाडा हा दुष्काळी भाग आहे. आज औरंगाबादला प्यायला पाणी नाही. मुख्यमंत्र्यांनी संभाजीनगर नाव घोषित करण्यापेक्षा औरंगाबाद शहराला 24 तास पाणीपुरवठा होईल अशी 500 कोटीची घोषणा करतो, हे औरंगाबादच्या जनतेसाठी जास्त आवश्यक आहे. औरंगाबादचे संभाजीनगर व्हावे ही नागरिकांची मागणी असेलही मात्र त्या शहरातील पाणी हे औरंगाबादच्या नागरिकांसाठी जास्त महत्त्वाचे आहे, असे मला वाटते.

संभाजीनगर नाव झाल्यावर 24 तास पाणी मिळत असेल आनंदाची गोष्ट आहे पण संभाजीनगर झाल्यावरही आठ दिवस पाण्यासाठी नागरिकांना थांबावे लागत असेल तर संभाजीनगर नाव करून अर्थ काय? आज लोकांना मूलभूत गोष्टींची अवश्यकता आहे, म्हणून अहमदनगर जिल्ह्याचे नामांतर झाले नाही तर मी, आमदार संग्राम जगताप व संपूर्ण महापालिका प्रयत्नातून पाच महिन्या नंतर अहमदनगर शहराला 24 तास पिण्याचे पाणी देऊ. नाव बदला अथवा बदलू नका आम्हा पाणी देणे गरजेचे आहे. मुख्यमंत्र्यांनी औरंगाबाद व मराठवाड्याच्या पाणी व विकासावर बोलावे. या नावाच्या वादात त्यांना अडकविण्याचा प्रयत्न कोणी करत असेल त्यांनी विकासावर लक्ष केंद्रीत करावे. तरच त्यांचा उर्वरित मुख्यमंत्रीपदाचा कार्यकाळ चांगल्या कामासाठी लक्षात राहिल, यासाठी त्यांनी प्रयत्न करावा, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.

राज्यसभेच्या निवडणुकीबाबत...

राज्यसभेच्या महाराष्ट्रतील सहा जागांच्या निवडणुकी बाबत ते म्हणाले, अस्वस्थता ही महाविकास आघाडीत आहे. हे लपून राहिलेले नाही. विशेषतः शिवसेनेमध्ये आहे. काँग्रेसने आधीच आपली नाराजी वरिष्ठांकडे जाहीर केली आहे. शिवसेनेत असलेली अस्वस्थता ही त्यांच्या आमदारांनी बोलून दाखविली आहे. तुमचे मतदान असूनही ते विरोधात का जात आहे. ग्रामपंचायत व सोसायटी निवडणुकांसारखी नाराजी नेत्यांपर्यंत पोचविण्यासाठी निश्चित या पद्धतीचा प्रयोग होणार. यश भाजपला मिळणार. सध्या पावसाळा आहे राज्यात आणखी एखादे राजकीय वादळ आले तर मला माहिती नाही. नैसर्गिक वादळा बाबत मी सांगू शकत नाही मात्र राजकीय वादळा बाबत सांगू शकतो.

या राज्य सरकारमध्ये मोठ्या प्रमाणात अस्थैर्य आहे. एकमेकांना पक्षाबाबत विश्वास नाही. म्हणून स्थिर सरकार असणे आवश्यक आहे. कोरोनाची चौथी लाट येण्याची शक्यता आहे. राज्यात स्थिर सरकार येणे आवश्यक आहे. त्या दृष्टीने स्थिर सरकार व राज्यातील शेतकऱ्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी पुढाकार व निर्णय घेण्याची क्षमता या सरकारमध्ये दिसली नाही. उत्तरप्रदेशमध्ये योगी आदित्यनाथ ज्या पद्धतीने निर्णय घेतात. प्रत्येक मुद्द्यावर समाज हिताचे निर्णय घेतात. त्यापद्धतीने निर्णय राज्य सरकारने घ्यावेत, अशी कोपरखळीही त्यांनी महाविकास आघाडीला लगावली.

काश्मीरमधील पंडितांवरील हल्ले

अतिरेक्यांनी त्यांची मानसिकता बदलत काश्मिरी पंडितांना लक्ष्य केले ही दुर्दैवी बाब आहे. 370वे कलम काढल्यावर काश्मीरचा मोठ्या प्रमाणात विकास झाला आहे. अतिरेक्यांकडून लक्ष्य करून हत्या करण्याचे प्रमाण मागील एका महिन्यापासून वाढली आहे. एखादा नवा डाव आल्यावर त्यातून मार्ग काढण्यासाठी काही कालावधी लागतो. अचानक असे होईल हे केंद्र सरकारलाही अपेक्षित नव्हते. एका महिन्यात क्रुर क्रुत्य करणाऱ्या अतिरेक्यापैकी 80 टक्के अतिरेक्यांना मारलेही आहे. शिवसेनेने काश्मिरी पंडितांबाबत जी सहानुभूती दाखविली त्याच्या 50 टक्के सहानुभूती तुम्ही महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या बाबत दाखवावी, असा टोलाही खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनी लगावला.

या पत्रकार परिषदेला आमदार संग्राम जगताप, उपमहापौर गणेश भोसले, माजी महापौर बाबासाहेब वाकळे, अॅड. धनंजय जाधव, अजय चितळे, निखील वारे, भाजपचे शहर जिल्हाध्यक्ष महेंद्र गंधे आदी उपस्थित होते.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT