Raju Shetti
Raju Shetti Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Nagar News : दिवाळीपूर्वी पहिली उचल जमा करा; 'स्वाभिमानी' आंदोलनाच्या तयारीत

राजेंद्र त्रिमुखे

Ahmednagar:नगर जिल्ह्यासह राज्यातील ऊस गळीत हंगाम एव्हाना सुरू झाला आहे. ऊस मोळी गव्हाणीत टाकण्याचे आणि त्यानंतर पहिल्या साखरेच्या पोत्याचे पूजन कार्यक्रम साखर कारखानास्थळी नेते मंडळी करत आहेत. यानिमित्ताने एकीकडे राजकीय आरोप ही नेते मंडळी या कार्यक्रमात करत असली तरी ऊस उत्पादक शेतकऱ्यांना त्यात रस नसून आपण ज्या कारखान्याला ऊस देणार आहोत, तो कारखाना आपल्याला प्रतिटन किती भाव देणार असून, पहिली उचल किती असणार आहे याकडे आहे.

अशात काही अजित पवार, बाळासाहेब थोरात, राधाकृष्ण विखे आदींचे कारखाने इतरांपेक्षा 3 हजार रुपयांच्या आसपास प्रतिटन भाव घोषित करत असताना अनेक कारखान्यांनी 2600-2700 रुपये असा भाव देताना पहिली उचल कमी ठेवली आहे. त्यामुळे अशा कारखान्यांना ऊस देणाऱ्या शेतकऱ्यांत नाराजीची भावना असून, या नाराजीला स्वाभिमानी शेतकरी संघटनेने आंदोलनाचे स्वरूप देण्याचा इशारा दिला आहे.

याबाबत स्वाभिमानाच्या नगर जिल्ह्यातील कार्यकर्त्यांनी सर्व कारखानदार आणि प्रशासनाला पत्र दिले असून त्यात गत हंगामात साखर कारखानदारांना साखरेसह इतर उपपदार्थापासून प्रतिटन 5400 रुपये इतके उत्पन्न मिळाले आहे. यंदाही साखरेला चांगला भाव मिळणार आहे. त्यामुळे यंदाच्या गळीत हंगामासाठी उसाला प्रतिटन पहिली उचल 3100/- रुपये मिळावी व मागील हंगामातील साखरेतील व उपपदार्थांमधील वाढलेल्या दराचा फरक म्हणून 300/-रुपये दिवाळीच्या सणासाठी शेतकऱ्यांच्या खात्यावरती वर्ग करावे असे स्पष्ट केले आहे.

या प्रमुख मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटना व ऊस उत्पादक शेतकरी गेल्या दोन महिन्यांपासून कारखानदार व प्रशासनास वारंवार पाठपुरावा करत आहे. परंतु ऊस कारखानदार यांनी मौन बाळगणे पसंत केल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये मोठा रोस निर्माण झालेला आल्याचे स्वाभिमानीने म्हटले आहे.

चालू गाळपसाठी जाणाऱ्या उसाचा भाव जाहीर न केल्यामुळे मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांमध्ये असंतोष आहे. चालू हंगामातील उसाची पहिली उचल 3100 रुपये 10 नोव्हेंबर च्या हात जाहीर न केल्यास स्वाभिमानी शेतकरी संघटना व ऊस उत्पादक शेतकरी बुधवार, दिनांक 15 /11 /2023 पासून ऊसतोड व वाहतूक बंद करतील व कारखानदारानेही ऊस तोड वाहतूक बंद ठेवावी, अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने पत्राद्वारे सर्व कारखानदार व प्रशासनाला कळविली आहे.

सलग दोन वर्षांपासून उसाची मोठ्या प्रमाणात लागवड झाल्यामुळे कारखानदारांना मोठा लाभ झालेला आहे. त्यातच साखर, मळी, इथेनॉल, मॉलिसिस व वीज यांचे दर वाढलेले आहेत. यामधून मोठ्या प्रमाणात कारखानदारांना लाभ झालेला आहे. पण शेतकऱ्यांना लाभापासून वंचित ठेवले गेलेले आहे.

या सर्व गोष्टीमुळे स्वाभिमानी शेतकरी संघटना व ऊस उत्पादक शेतकरी यांनी हा निर्णय घेतला आहे, तसेच आपल्या हक्काचे दाम मिळवण्यासाठी सर्व शेतकऱ्यांनी या आंदोलनात सहभागी व्हावे व आपली ऊस तोडणी बंद ठेवावी, असे आवाहन करण्यात आले आहे.

स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे पक्ष जिल्हाध्यक्ष रावसाहेब लवांडे, मच्छिंद्रआरले जिल्हा सरचिटणीस बाळासाहेब फटांगडे, तालुका अध्यक्ष अशोक भोसले, तालुका पक्ष अध्यक्ष प्रशांत भराट, शहराध्यक्ष अमोल देवढे, युवक अध्यक्ष हरिभाऊ कबाडी, दादासाहेब पाचरणे, विकास साबळे नानासाहेब कातकडे नारायण पायघन, अंबादास भागवत उपस्थित होते.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT