Vrushaliraje Bhosale, Dr. Rajendra Patil
Vrushaliraje Bhosale, Dr. Rajendra Patil sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

अजिंक्यतारा किल्ला राज्य संरक्षित करावा; वृषालीराजेंचे मंत्री राजेंद्र पाटलांना निवेदन

सरकारनामा ब्यूरो

सातारा : साताऱ्यातील अजिंक्यातारा किल्ल्याला पुरातन इतिहास आहे, परंतु काळाच्या ओघात त्याच्याकडे दुर्लक्ष झाले आहे. हा किल्ला पुरातत्व विभागाच्या राज्य संरक्षित किल्ल्यामध्ये येत नसल्यामुळे दुर्लक्षित झाला आहे. हा किल्ला राज्य संरक्षित किल्ला म्हणून घोषित करावा यासाठी लवकरच सांस्कृतिक, महसूल, वनविभाग, नगरविकास विभागाची संयुक्त बैठक मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासोबत घेऊन निर्णय घेतला जाईल, अशी ग्वाही सांस्कृतिक कार्य राज्यमंत्री डॉ. राजेंद्र पाटील (येड्रावकर) यांनी दिली.

शाहुनगरी फाऊंडेशनच्या संस्थापक अध्यक्षा वृषालीराजे भोसले यांनी पुढाकार घेत राज्यमंत्री डॉ. राजेंद्र पाटील यांना निवेदन दिले होते. त्याची दखल घेत राज्यमंत्री डॉ. राजेंद्र पाटील यांनी पुढाकार घेतला आहे. सातारा ही ऐतिहासिक वारसा लाभलेली नगरी मराठयांची चौथी राजधानी असलेल्या अजिंक्यतारा किल्ला शिलाहार वंशीय भोज राजा (दुसरा) याने इ.स. 1190 मध्ये बांधला. पुढे हा किल्ला बहामनी सत्तेकडे आणि मग विजापूरच्या आदिलशहाकडे गेला.

इ.स. 1580 मध्ये पहिल्या आदिलशहाची पत्नी चाँदबीबी या किल्ल्यावर कैदेत होत्या. स्वराज्याचा विस्तार होत असताना 27 जुलै 1673 मध्ये हा किल्ला छत्रपती शिवाजी महाराजांच्या हाती आला. या किल्ल्यावर शिवरायांना अंगी ज्वर आल्याने दोन महिने विश्रांती घ्यावी लागली होती. छत्रपती शिवाजी महाराजांच्या मृत्यूनंतर इ.स. 1700 मध्ये हा किल्ला मोगलांच्या ताब्यात गेला. त्यानंतर ताराराणीच्या सैन्याने पुन्हा किल्ला जिंकला. परंतु लवकरच मोगलांनी त्याचा ताबा घेतला.

शाहू महाराज मोगलांच्या सुटकेतून साताराला आल्यानंतर 1708 मध्ये अजिंक्यतारा आपल्या ताब्यात घेतला. दुस-या शाहूंच्या निधनानंतर हा किल्ला 11 फेब्रुवारी 1818 मध्ये इंग्रजांकडे गेला. छत्रपती शिवाजी महाराजांच्या वास्तव्याने पुनीत झालेल्या अशा या ऐतिहासिक किल्ल्याचे संवर्धन करणे अत्यंत आवश्यक आहे. परंतु हा किल्ला पुरातत्व विभागाच्या राज्य संरक्षित किल्ल्यामध्ये येत नसल्यामुळे दुर्लक्षित झाला आहे व त्यामुळे त्याचे संवर्धन होत नाही.

तरी हा किल्ला राज्य संरक्षित स्मारक किल्ला म्हणून जाहीर करण्याबाबत कार्यवाही करावी त्याकरिता लागणारे सहकार्य करण्यास आम्ही तयार आहोत, अशा प्रकारचे निवेदन शाहुनगरी फाऊंडेशनच्या संस्थापक अध्यक्षा वृषालीराजे भोसले यांनी सांस्कृतिक कार्य राज्यमंत्री डॉ. राजेंद्र पाटील (येड्रावकर) यांना दिले होते. त्याची दखल घेऊन त्यांनी तातडीने या प्रश्नाची माहिती घेतली.

त्याप्रमाणे याप्रश्नी सांस्कृतिक, महसूल, वनविभाग, नगरविकास विभागांचे मंत्री, विभागप्रमुख आणि संबंधित प्रमुख अधिका-यांची संयुक्त बैठक लवकरच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासमवेत घेऊन हा प्रश्न तातडीने निकाली काढणार असल्याची माहिती त्यांनी शाहुनगरी फाऊंडेशनच्या संस्थापक अध्यक्षा वृषालीराजे भोसले यांना दूरध्वनीव्दारे दिली. त्यामुळे गेली अनेक वर्षे प्रलंबित असलेला हा प्रश्न लवकरच मार्गी लागणार आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT