Ajit Pawar-sushilkumar shinde-Vijay Singh Mohite Patil
Ajit Pawar-sushilkumar shinde-Vijay Singh Mohite Patil  Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्रीपद मिळूनही सोलापूरची पाण्याची काय अवस्था? : अजितदादांचा शिंदे-मोहितेंना टोला

सरकारनामा ब्यूरो

बारामती : ज्या सोलापूर (solapur) जिल्ह्यातील नेत्यांना मुख्यमंत्रीपद आणि उपमुख्यमंत्रीपद मिळाले, त्या जिल्ह्यात लोकांच्या पिण्याच्या पाण्याची काय अवस्था आहे. तिथं शिक्के मारायला आम्ही आलो नव्हतो. तुम्हीच त्यांना निवडून दिले होते, अशा शब्दांत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी (Ajit Pawar) नाव न घेता माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे (Sushilkumar Shinde) आणि माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील (Vijay Singh Mohite Patil) यांना टोला लगावला. (Ajit Pawar's criticism of Sushilkumar Shinde and Vijay Singh Mohite Patil over drinking water)

बिल्डर्स असोसिएशन ऑफ इंडिया, बारामती शाखेच्या पदाधिकाऱ्यांचा पदग्रहण समारंभ उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत पार पडला. त्या कार्यक्रमात बोलताना अजित पवार यांनी सोलापूर जिल्ह्यातील नेत्यांना टोमणे लगावले.

पिण्याच्या पाण्यावरून सुशीलकुमार शिंदे आणि विजयसिंह मोहिते पाटील यांना लक्ष्य करणाऱ्या अजित पवारांनी सोलापूरचे भाजपचे विद्यमान खासदार जय सिद्धेश्वर महाराज यांचाही समाचार घेतला. ते म्हणाले की, सोलापुरातून लोकसभेत असा माणूस निवडून गेला आहे, तो ब्र शब्दही काढत नाही. तुम्ही भावनिक होऊन मतदान करता. मग तुमच्याकडे कसा विकास होईल?, असा सवालही उपमुख्यमंत्र्यांनी केला. दरम्यान, एका बांधकाम व्यावसायिकाने आमच्या सोलापूर जिल्ह्यात मोठ्या फॅक्टरी आणा, असे सांगितल्याची आठवण पवार यांनी यावेळी सांगितली.

बांधकाम व्यावसाय हा सर्वात जास्त रोजगार देणारा व्यवसाय आहे. अर्थसंकल्प सादर करताना इन्फ्रास्ट्रक्चरला जास्त निधी देण्याचा प्रयत्न आम्ही करतो. कोरोनाबाबत सर्वांनी काळजी घेतली पाहिजे. कोरोनाचा सगळ्यात जास्त फटका बांधकाम व्यावसायला बसला आहे. कोरोना काळात त्यावर अवलंबून असणाऱ्या कामगार वर्गाला मदत देण्याचं काम आम्ही केलं आहे. सिमेंट, खडी, स्टीलचे दर वाढले होते. या दरवाढीमुळे बांधकाम व्यावसायिकांचे नुकसान होणार नाही, यासाठी काही बदल करता येतात का, ते पाहत आहे, असेही अजित पवार यांनी स्पष्ट केले.

जलसंपदा विभाग असताना माझ्यावर देखील आरोप झाले होते. एखादा प्रकल्पाची किंमत २०१९ मध्ये ५०० कोटी असेल तर तो २०२४ पर्यत ९०० कोटींपर्यत जातो, असेही अजित पवार यांनी सांगितले. नवीन उद्योग करताना पोषक वातावरण असलं पाहिजे. काही ठिकाणी इतका विरोध होतो की तो गुंतवणूकदार म्हणतो कुठून औदसा सुचली आणि इथं गुंतवणूक करायला आलो, त्यामुळे ते माघार घेतात.

देशात आणि राज्यात कोरोना रुग्णांची संख्या वाढते आहे त्यामुळे आपण काळजी घेतली पाहिजे. जीएसटीबाबत केंद्र सरकार आग्रही आहे, त्यामुळे त्यांच्या नियमांचे तंतोतंत पालन करावंच लागेल.आरक्षण असेल तिथं बांधकाम करू नये. सगळ्यांनी नियमांचे पालन करावं. हे असं सांगताना आम्ही मत मिळतील का त्याचा विचार करत नाही. आम्ही सगळे परिवार म्हणून काम करतो; म्हणून आमचं बरं चाललं आहे, असेही अजित पवार यांनी नमूद केले.

देशात आता ३०० ते ४०० वर्षांपूर्वीचे जुने उकरून काढले जात आहे आणि म्हणतात की इथे हे होत आणि तिथं ते होत. अरे झाली ना त्याला बरीच वर्षे. आशा घटनांमुळे सामाजिक वातावरण खराब होत आहे, याकडे कोणाचेही लक्ष नाही, याकडे अजित पवारांनी अंगुलीनिर्देश केला.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT