Amol Kolhe VS Ajit Pawar Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Amol Kolhe vs Ajit Pawar : अजितदादांच्या बालेकिल्ल्यात येऊन कोल्हे गरजले; बारामतीत बरेच काही बोलले

सरकारनामा ब्यूरो

Maharashtra Politics Latest News : आमच्या शेतकरी आक्रोश मोर्चावर अनेक मंत्री अचानकच टीका करू लागले आहेत, कारण अनेक वतनदारांना वतने वाचवायची आहेत, रयतेच्या कल्याणाचे कोणाला देणे घेणे नाही असा ऐतिहासिक संदर्भ देत खासदार अमोल कोल्हे यांनी टीकाकारांचा समाचार घेतला. उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा नामोल्लेख टाळत अमोल कोल्हेंनी त्यांचाही समाचार घेतला.

शेतकरी आक्रोश मोर्चा शुक्रवारी (ता. 29) रात्री बारामतीत आला, त्यानंतर झालेल्या सभेत कोल्हे यांनी पाच मिनिटांच्या भाषणात टीकाकारांचा नामोल्लेख टाळून समाचार घेतला. रात्री दहाची मर्यादा असल्याने पाच मिनिटांत कोल्हे यांना भाषण आटोपते घ्यावे लागले, मात्र या पाच मिनिटात त्यांनी Ajit Pawar व देवेंद्र फडणवीस यांना जोरदार चिमटे काढले.

वाघ आपल्याला खूप आवडतो, जेव्हा तो जंगलात वावरतो तेव्हा तो जंगलचा राजा असतो. जेव्हा सर्कशीत तोच वाघ जेव्हा रिंगमास्टरच्या इशाऱ्यावर कसरती करतो, तेव्हा काळजाला घरे पडतात, की ज्या वाघावर प्रेम केले, त्याला आज रिंगमास्टरच्या इशाऱ्यावर चालावं लागतं. जेव्हा हाच वाघ पिंजऱ्यात बघायला मिळतो, तेव्हा काळजाला घरे पडतात की याच्या डरकाळीने भल्या भल्यांचा थरकाप उडत होता, त्याला पिंजऱ्याच्या आडून फक्त गुरगुराव लागतं. कुणीही येणार जाणार त्याला दगड मारू शकतं...ही भावना जेव्हा वाघाची होते, असंच महाराष्ट्राच्या हितासाठी डरकाळी फोडणारे जेव्हा दिल्लीच्या इशाऱ्यावर तोंडातून शब्द काढत नाहीत, तेव्हा ही भावना मनात जागी होते, असे अमोल कोल्हे म्हणाले.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

वतन वाचवायचं असल्याने मांडलिकत्वाची भावना स्वीकारून दिल्लीश्वराच्या नजरेला नजर भिडवून माझ्या महाराष्ट्राचे नुकसान का करताय हे विचारण्याची हिंमत राहिली नाही, असा घणाघाती आरोप करत वतन वाचवायची तर ही धडपड नाही ना अशी शंका येते, असे ते म्हणाले.

आमचे सरकार सत्तेवर आल्यानंतर राज्यातील सर्व शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी दिली जाईल, अशी घोषणा खासदार सुप्रिया सुळे यांनी केली.

संघर्षाचा पर्याय निवडला

मधल्या काळात दोन पर्याय होते. दडपशाहीपुढे गुडघे टेकले असते तर नक्की फायदा झाला असता, स्वार्थ साधला गेला असता. दुसरा पर्याय ताठ मानेनं उभे राहून संघर्ष करून सवाल विचारण्याचा मार्ग मी व सुप्रिया सुळे यांनी स्वीकारल्याचे डॉ. कोल्हे यांनी सांगितले.

- मिलिंद संगई,बारामती

edited by sachin fulpagare

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT