Ram Shinde
Ram Shinde Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

देवेंद्र फडणवीसांमुळे नगर जिल्ह्यातील महाविकास आघाडीच्या नेत्यांचे धाबे दणाणले

अमित आवारी

अहमदनगर - राज्यात सध्या केतकी चितळे, राणा दाम्पत्य, अॅड. गुणरत्न सदावर्ते आदींवर कारवाई करण्यात येत आहे. या संदर्भात भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष तथा माजी मंत्री राम शिंदे ( Ram Shinde ) यांनी अहमदनगरमध्ये पत्रकार परिषद घेऊन महाविकास आघाडीवर जोरदार टीका केली. या प्रसंगी बोलताना राम शिंदे यांनी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना भाजपने अहमदनगर जिल्हा प्रभारी नियुक्त केल्या बद्दल महत्त्वपूर्ण वक्तव्य केले. ( An atmosphere of fear among the leaders of Mahavikas Aghadi in Nagar district due to Fadnavis )

या प्रसंगी प्रा राम शिंदे म्हणाले की, शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी 25 वर्षे शिवसेनेचे सरकार राहील असे सांगितल्याने राष्ट्रवादी काँग्रेस विचलित झाली आहे. त्यातून राष्ट्रवादी काँग्रेसचे लोक भाजपच्या लोकांवर हल्ले करत आहे. जनमत डावलून राज्यात तीन पक्षांचे सरकार तयार केले आहे. जनमत पाठीशी नसल्याने लोकांची दिशाभूल करून मते मिळविण्याचा प्रयत्न केला जात आहे.

ते पुढे म्हणाले की, दहशतवाद व दबाव कर्जत-जामखेडची जनता मागील अडीच वर्षांपासून पाहत आहे. कामापेक्षा दबावाला महत्त्व आहे. एखाद्याने ऐकले नाही तर त्याला ऐकायला कसे लावायचे अशा प्रकारचे दबावतंत्र सुरू आहे. तीन वर्षांत कुकडी पाण्याच्या आवर्तनाचा पूर्ण बोजवारा उडाला आहे. विजेचा खेळखंडोबा झाला आहे. ऊस उत्पादक शेतकऱ्याचा ऊस कारखान्याला गेला नाही. ऊस उत्पादक शेतकऱ्यांना वाटले होते की, कारखानदार निवडून दिल्यावर आपला ऊस जाईल. परंतु उसाने तुराही टाकला. उसाचे वजन घटले. शेवटच्या टप्प्यात 12 महिने उसाला पाणी देऊन त्यांनी एक नवे पर्व योजना आणली. ती योजना अशी होती की 12 महिने उसाला पाणी द्यायचे त्यानंतर ऊस जाळायचा आणि त्यानंतर तो ऊस कारखान्याला जायचा, असा टोलाही त्यांनी आमदार रोहित पवार यांचे नाव न घेता लगावला.

माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना भाजपचे जिल्हा प्रभारी करण्यात आले आहे. त्यामुळे भाजपच्या जिल्हातील कार्यकर्त्यांत उत्साहाचे वातावरण आहे. फडणवीस प्रभारी झाल्यावर जिल्ह्यातील महाविकास आघाडीच्या नेत्यांचे धाबेदणाणले आहेत. फडणवीसांना घाबरूनच तीन पक्षांनी महाविकास आघाडी सरकार स्थापन केले. आता जिल्ह्यात नवे प्रयोग होतील. फडणवीसांनी बिहार, गोव्यात सरकार आणले. ते पक्षाचे प्रभारी लाभले हे भाग्य आहे, असे त्यांनी अभिमानाने सांगितले.

केतकीच्या वक्तव्याचे समर्थन नाही

काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस कधी सत्तेत येणार नव्हती. अनैसर्गिक पद्धतीने ते सत्तेत आले. त्यांना लोकांचे काम करण्यापेक्षा लोकांना त्रास देण्यात स्वारस्य वाटते. आम्ही अभिनेत्री केतकी चितळेचे समर्थन करणार नाही. भाजप तिच्या वक्तव्याचे समर्थन करत नाही. ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या बदनामी बाबत जशी तातडीने दखल घेतली तशी दखल इतरांच्या बाबत घेणार आहेत का?, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT