<div class="paragraphs"><p>Ashutosh Kale</p></div>

Ashutosh Kale

 

Sarkarnama

पश्चिम महाराष्ट्र

आशुतोष काळेंनी वचन केले पूर्ण : कोपरगाव पाणी योजनेसाठी 123 कोटी मंजूर

सतीश वैजापूरकर

कोपरगाव ( जि. अहमदनगर ) : कोपरगाव शहरासाठी 123 कोटी रूपये खर्चाच्या पाणी योजनेला नगर विकास विभागाच्या प्रकल्प समितीने काल मान्यता दिली. राष्ट्रवादी काँग्रेसचे ( NCP ) आमदार आशुतोष काळे ( Ashutosh Kale ) यांनी विधानसभा निवडणुकीच्या वेळी दिलेल्या वचनांची पूर्ती केली आहे. कोपरगावात नगरपालिका निवडणुकीचे नगारे वाजू लागलेत आणि राजकारण नुकतेच कुठे रंगू लागलेय, अशा काळात मंत्रालयातून आलेल्या न्यू इयर गिफ्टने रंगात आलेल्या पालिका राजकारणात नवा रंग भरला नाही तरच नवल. Ashutosh Kale fulfilled his promise: 123 crore sanctioned for Kopargaon water scheme

2019च्या विधानसभा निवडणुकीच्या प्रचारसभेत आमदार आशुतोष काळेंनी कोपरगाव शहराचा पाणीप्रश्न सोडविण्याचे आश्वासन दिले. त्यावेळी ज्येष्ठ नेते खासदार शरद पवार हे स्वतः व्यासपीठावर उपस्थित होते. त्यांनी या प्रश्नात लक्ष घालण्याचे त्यावेळी जाहीर केले होते. निवडणूक जिंकून आमदार आशुतोष काळे यांनी विधानसभेत गेले आणि शरद पवार यांनी फोन करून समृध्दी महामार्गाच्या ठेकेदाराला सुचना दिली. पाच क्रमांकाच्या साठवण तलावाची खोदाई सुरू झाली, अशी चर्चा आहे. पंधरा कोटी रूपये खर्चाची खोदाई या ठेकेदाराने विनामुल्य करून दिली. आमदार आशुतोष काळे यांच्या पाठपुराव्यानंतर, आज 123 कोटी रूपये खर्चाच्या पाणी योजनेस महाविकास आघाडी सरकारने मान्यता दिली. या पाणी योजनेच्या निविदा जाहीर होण्याचा मार्ग मोकळा झाला.

योजनेला मिळालेल्या मान्यते संदर्भात आमदार आशुतोष काळे म्हणाले की, पाणी असूनही वर्षभर पाणीटंचाईच्या झळा सोसत असलेल्या कोपरगावकरांना आज 123 कोटी रूपये खर्चाच्या पाणीपुरवठा योजनेची अनोखी भेट मिळाली. पाणी टंचाईतून मुक्त होण्याचे शहरवासियांचे स्वप्न आणि वचनपूर्ती करण्याचे आपले स्वप्न, साकार होण्याचा मार्ग मोकळा झालाय. आज राज्य सरकारच्या प्रकल्प मान्यता समितीने या योजनेस मान्यता दिली.

काळे पुढे म्हणाले की, आज नगरविकास विभागाचे प्रधान सचिव महेश पाठक व सहसचिव पांडूरंग जाधव, पालिकेचे मुख्याधिकारी शांताराम जाधव व जीवन प्राधिकरण विभागाच्या अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत पार पडलेल्या प्रकल्प मान्यता समितीच्या बैठकीत या योजनेस मान्यता मिळाली. वितरण व्यवस्थेतील त्रुटी, साठवण क्षमतेच्या मर्यादा आदी अनेक अडचणींमुळे शहरवासियांना पाणी असूनही पाणी टंचाई सोसावी लागते. ती आता कायमची दूर होईल.

गेल्या विधानसभा निवडणुकीत आपण पाणीटंचाई दूर करण्याचे वचन दिले होते, त्याची पूर्तता सुरू झाली. आपण पुढाकार घेऊन, पाच क्रमांकाच्या साठवण तळ्याची समृध्दी महामार्गाच्या ठेकेदार कंपनीकडून खोदाई सुरू केली. त्यासाठी ज्येष्ठ नेते खासदार शरद पवार यांनी स्वतः पुढाकार घेतला. जवळपास पंधरा कोटी रूपये खर्चाच्या खोदाईचे काम यापूर्वीच पूर्ण झाले, असे आमदार काळे यांनी सांगितले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT