Bacchu Kadu
Bacchu Kadu Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

बच्चू कडू म्हणाले, केंद्राच्या आयात निर्यात धोरणांमुळे शेतकरी उदध्वस्त

सरकारनामा ब्युरो

महेश माळवे

श्रीरामपूर ( जि. अहमदनगर ) - न्यायालयीन कामा निमित्त राज्यमंत्री बच्चू कडू ( Bachchu Kadu ) श्रीरामपूरमध्ये काल ( ता. 21 ) आले होते. त्यावेळी त्यांनी उपस्थित पत्रकारांशी संवाद साधताना देशातील शेतकऱ्यांच्या अवस्थेला केंद्र सरकार कारणीभूत असल्याचे सांगत टीका केली. ( Bachchu Kadu said farmers were devastated by the Centre's import-export policies )

श्रीरामपूरला न्यायालयीन कामकाजासाठी आले असता त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी अभिजित पोटे, आप्पासाहेब ढुस, विवेक माटा, बाळासाहेब पटारे, अहमद जहागिरदार, लकी सेठी आदी उपस्थित होते.

बच्चू कडू म्हणाले, केंद्राच्या आयात निर्यात धोरणांमुळे देशातील शेतकरी उदध्वस्त झाला आहे. जीवनाची लढाई मागे पडली असून जातीधर्माच्या लढाया मोठ्या झाल्या आहेत.

ते पुढे म्हणाले की, शेतमालाला हमीभाव देता येत नसेल तर 'पेरणी ते कापणी योजना' रोजगार हमी योजनेला जोडण्यात येणार आहे. यासाठी जिल्हा नियोजनात याची तरतूद करण्यात येणार असल्याचे सांगून कांद्याच्या भावासंदर्भात ते म्हणाले, कांदा खरेदी संदर्भात केंद्राची भूमिका गुलदस्त्यात आहे. तूर, सोयाबीन खरेदीसाठी ज्याप्रमाणे फेडरेशन समोर येते त्या धर्तीवर नाफेडने कांदा खरेदीसाठी स्वतःहून पुढाकार घेतला तर चांगले परिणाम दिसतील. सोयाबीनचे भाव तेल आयात केल्यामुळे कमी झाले. देशात तुरीचे 48 लाख क्विंटल उत्पादन झाले. 46 लाख टन देशाला लागते, असे असताना 10 लाख टन तूर आयात करून कोणाचे पोट भरायचे होते, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला.

कच्चे तेल आयात करून. त्याच्यावर अदानी, अंबानीच्या फॅक्टऱ्यांमध्ये प्रक्रिया केली. त्याचा नफा त्यांना देऊन मग लोकांना देत असाल तर कोणाचे हित सध्या झाले. कुठे आहे तुमचा 'मेक इन इंडिया', 'मेड इन इंडिया', असा टोलाही त्यांनी लगावला.

'गो-बॅक कंपनी, वेलकम शेतकरी' या योजनेअंतर्गत देशातील पहिला बियाणे महोत्सव आपल्या जिल्ह्यात घेणार आहे. यासाठी शेतकऱ्यांनी 4 लाख क्विंटल बियाणे साठवले आहे. त्यामुळे खरिपाच्या बियाण्यांसाठी कंपन्यांकडे जाण्याची गरज नसल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

भोंगा, हनुमान चालीसावरून केंद्रावर टीकास्त्र

भोंगा, हनुमान चालीसा, मंदिर, मस्जिद आणि ईडी सोडून केंद्राचा काही कार्यक्रम दिसत नाही. स्वतःला वाजवत येत नाही तर दुसऱ्याला वाजवायला लावायचे. हनुमान चालीसा आपल्याला म्हणता येत नाही तर दुसऱ्याला म्हणायला लावायचे, अशी बोचरी टीका त्यांनी केंद्रावर केली.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT