Solapur, 13 March : करमाळा तालुक्यातील श्री आदिनाथ सहकारी साखर कारखान्याचे रणशिंग फुंकले असून तालुक्यातील सर्वच राजकीय गट हे बाह्य मागे सावरून निवडणुकीच्या मैदानात उतरण्याची भाषा करत आहेत. गेल्या वर्षभरापासून बंद असलेल्या काखान्यासाठी सर्व राजकीय नेतेमंडळींना निवडणूक लढविण्याची तयारी चालवली आहे. बागल गटानेही आपल्या कार्यकर्त्यांना अर्ज दाखल करण्याचे आदेश दिले असून रश्मी बागल आणि विलास घुमरे हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी चर्चा करून बागल गट निर्णय घेणार आहे, अशी माहिती बागल गटाचे युवा नेते दिग्विजय बागल यांनी दिली.
दिग्विजय बागल (Digvijay Bagal) म्हणाले, श्री आदिनाथ सहकारी साखर कारखान्याची पंचवार्षिक निवडणूक जाहीर झाली आहे. गेल्या वीस वर्षांपासून बागल गटाच्याच ताब्यात हा कारखाना आहे. आदिनाथ कारखान्याला लोकनेते (कै). दिगंबरराव बागल यांनी कर्जमुक्त केले होते. माजी आमदार श्यामल बागल, रश्मी बागल यांच्या नेतृत्वाखाली आणि विलास घुमरे यांच्या मार्गदर्शनाखाली आदिनाथ कारखाना सहकार क्षेत्रात अग्रेसर राहावा, यासाठी सर्व संचालक मंडळाने अथक प्रयत्न केलेले आहेत.
मागील सात ते आठ वर्षांपासून सहकारी साखर कारखाने चालवणे, टिकवणे अवघड झाले आहे. तसेच साखर कारखान्यांमधील वाढती स्पर्धा आणि आर्थिक पाठबळ नसल्याने कारखाने चालवणे कठीण होऊन बसले आहे. पण, आदिनाथ सहकारी साखर कारखान्याच्या (Adinath Sugar Factory) सभासदांचा बागल गटावर विश्वास आहे, त्यामुळे बागल गटाकडून निवडणूक लढविण्यासाठी इच्छुक असलेल्यांनी उमेदवारी अर्ज भरावेत, असे आवाहन दिग्विजय बागल यांनी केले.
आदिनाथ कारखाना बिनविरोध व्हावा : जयवंतराव जगताप
आदिनाथ सहकारी साखर कारखान्याची सध्याची परिस्थिती पाहता तो चालू होणे अवघड आहे, त्यामुळे तालुक्यातील सर्व गटांनी एकत्र येऊन कारखाना बिनविरोध करावा, अशी भूमिका जयवंतराव जगताप यांनी मांडली. तालुक्यातील सर्व गट हे ज्येष्ठ नेते शरद पवार, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील यांचे नेतृत्व मानणारे आहेत. या सर्वांनी एकत्र येऊन त्यांच्याकडे जावे आणि संचालक मंडळ निवडीचे सर्वाधिकार या तिघांना देण्यात यावेत. त्यातून कारखाना बिनविरोध करावा, असा बिनविरोध निवडीचा फॉर्म्युलाही जगताप यांनी सांगितला.
'आदिनाथ'चा असा आहे निवडणूक कार्यक्रम
आदिनाथ सहकारी साखर कारखान्याचे २१ संचालक निवडण्यासाठी १७ एप्रिल रोजी मतदान होणार असून १९ एप्रिल रोजी मतमोजणी होणार आहे. तत्पूर्वी दहा मार्चपासून म्हणजे सोमवारपासून १७ मार्चपर्यत उमेदवारी अर्ज भरता येणार आहेत. दाखल अर्जाची १८ मार्च रोजी छाननी होणार असून १९ मार्च रोजी पात्र उमेदवारी अर्जांची यादी जाहीर होईल. ता. १९ मार्च ते ०२ एप्रिलपर्यत उमेदवारी अर्ज मागे घेता येणार आहे. त्यानंतर ता. ३ एप्रिल रोजी उमेदवारांची अंतिम यादी व चिन्हवाटप केले जाणार आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.