Leader of Mahavikas Aghadi
Leader of Mahavikas Aghadi Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

बाळासाहेब थोरात म्हणाले, केंद्रीय मंत्र्याच्या राजीनाम्यासाठी भाजपने आंदोलन केले पाहिजे...

सरकारनामा ब्युरो

संगमनेर ( जि. अहमदनगर ) - राज्याचे अल्पसंख्यांक विभागाचे मंत्री नवाब मलिक यांना अंलबजावणी संचालनालयाने ( ED ) अटक केली. यावरून राज्यात भाजप व महाविकास आघाडीच्या नेत्यांत आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. महसूल मंत्री तथा काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात ( Balasaheb Thorat ) यांनी मंत्री नवाब मलिक ( Nawab Malik ) यांची बाजू घेत भाजपवर टीका केली. ( Balasaheb Thorat said that BJP should agitate for the resignation of the Union Minister )

नवाब मलिक यांच्या अटेकच्या निषेधार्थ व केंद्र सरकारच्या दडपशाहीविरोधात काल ( गुरुवारी ) महाविकास आघाडीने मुंबईतील मंत्रालयाजवळच्या राष्ट्रपिता महात्मा गांधी पुतळ्यासमोर आंदोलन करून केंद्र सरकारचा निषेध केला. या प्रसंगी थोरात बोलत होते. या वेळी उपमुख्यमंत्री अजित पवार, शिवसेना नेते व उद्योगमंत्री सुभाष देसाई, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष व जलसंपदा मंत्री जयंत पाटील, अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ, गृहमंत्री दिलीप वळसे पाटील, ऊर्जामंत्री नितीन राऊत, मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार, मत्स्यसंवर्धन मंत्री अस्लम शेख, पशुसंवर्धन मंत्री सुनिल केदार, गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड, सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे, ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ, आरोग्य मंत्री राजेश टोपे, महिला काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्ष संध्या सव्वालाखे, राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर, खासदार सुप्रिया सुळे, मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष भाई जगताप, माजी खासदार हुसेन दलवाई, प्रदेश काँग्रेसचे सरचिटणीस देवानंद पवार आदी उपस्थित होते.

बाळासाहेब थोरात म्हणाले की, केंद्रीय तपास यंत्रणांचा गैरवापर करून महाविकास आघाडी सरकार अस्थिर करण्यासाठी केंद्र सरकारने अल्पसंख्याक विकास मंत्री नवाब मलिक यांच्यावर ईडीची कारवाई केली आहे. केंद्र सरकारच्या या दडपशाहीविरोधात आघाडी एकत्र लढा देत असून, भाजपला नवाब मलिक यांचा राजीनामा मागण्याचा आणि आंदोलन करण्याचा नैतिक अधिकार नाही. ज्याच्या मुलाने शेतकऱ्यांना गाडीखाली चिरडले त्या केंद्रीय मंत्र्याच्या राजीनाम्यासाठी भाजपाने आंदोलन केले पाहिजे, असे प्रतिपादन विधिमंडळ पक्षनेते तथा महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी केले.

थोरात पुढे म्हणाले की, 20 वर्षांपूर्वीच्या एका प्रकरणाशी नाहक धागेदारे जुळवण्याचा प्रयत्न करुन नवाब मलिक यांच्यावर कारवाई करण्यात आली आहे. केंद्र सरकारच्या दडपशाही विरोधातील लढ्यात काँग्रेस पक्ष महाविकास आघाडीसोबत खंबीरपणे उभा आहे. नवाब मलिक यांचा राजीनामा मागणाऱ्यांनी त्यांच्या पक्षाच्या मंत्र्यावर कारवाई झाली तेव्हा त्यांनी राजीनामे दिले होते का याचे आधी उत्तर द्यावे.

सार्वजिनक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण म्हणाले, नवाब मलिक यांच्यावर राजकीय सुडबुद्धीने केलेल्या कारवाईमुळे देशात अत्यंत खालच्या पातळीवरचे राजकारण सुरु झाले आहे. केवळ संशयाच्या आधारावर मंत्र्याला अशा पद्धतीने अटक करणे लोकशाहीला मारक असून चुकीचा पायंडा पाडला जात आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT