Chandrasekhar Bavannakule
Chandrasekhar Bavannakule Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

राहुल गांधींची भारत जोडो यात्रा काँग्रेस नेते आणि त्यांची मुलांनीच हायजॅक केली : बावन्नकुळेंचा आरोप

Vijaykumar Dudhale

कोल्हापूर : काँग्रेसची (Congress) भारत जोडो यात्रा नेत्यांनी आणि त्यांच्या मुलांनी हायजॅक केली. त्यामुळे सामान्य कार्यकर्ता यात्रेपासून दूर आहे. मोठ्या प्रमाणात काँग्रेसचे नेते आणि कार्यकर्ते भाजपमध्ये (BJP) प्रवेश करत आहेत. काँग्रेस-राष्ट्रवादीचे मोठे नेते २०२४ मध्ये भाजपमध्ये येतील. त्यावेळी मोठे राजकीय स्फोट होतील. काँग्रेस, राष्ट्रवादीला उमेदवारही मिळणार नाही, असे प्रतिपादन भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावन्नकुळे (Chandrashekhar Bavannakule) यांनी आज कोल्हापूर येथे पत्रकार परिषदेत केले. (Rahul Gandhi's Bharat Jodo Yatra was hijacked by Congress leaders and their sons : Chandrasekhar Bawannakule)

ते म्हणाले, ‘‘काँग्रेस-राष्ट्रवादीच्या नेत्यांना स्थिरस्थावर करण्यासाठी महाविकास आघाडी सरकार बनवण्यात आले होते. त्यामुळे सत्तेत असूनही काँग्रेस-राष्ट्रवादीच्या सामान्य कार्यकर्त्याला काहीच मिळाले नाही. भारत जोडो यात्रा देखील नेत्यांनी हायजॅक केली. म्हणूनच काँग्रेस-राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड मोठी अस्वस्थता आहे. एका बाजूला राज्यात भारत जोडो यात्रा सुरू असताना मोठ्या प्रमाणात काँग्रेसचे कार्यकर्ते भाजपमध्ये प्रवेश करत आहेत.

सातारा जिल्ह्यात माझ्या उपस्थित बाराशे काँग्रेस कार्यकर्त्यांनी पक्षात प्रवेश केला. काँग्रेस राष्ट्रवादीचे काही मोठे नेते भाजपच्या संपर्कात आहेत. २०२४ मध्ये ते पक्ष प्रवेश करतील. त्यावेळी महाराष्ट्रात मोठा राजकीय बॉम्बस्फोट होईल. पुढील विधानसभा आणि लोकसभेला काँग्रेस, राष्ट्रवादी आणि उद्धव ठाकरे यांना उमेदवारही मिळणार नाही.’’

सत्ताबदलाच्या जयंत पाटील यांच्या विधानाचा समाचार घेताना बावन्नकुळे म्हणाले, ‘‘राष्ट्रवादी काँग्रेस आणि त्यांचे कार्यकर्ते सत्तेशिवाय राहू शकत नाहीत. पक्षातील राहिलेले जाऊ नयेत, यासाठी त्यांना सत्ताबदल होईल, असे कार्यकर्त्यांना सांगावेच लागते. माझी जयंत पाटील यांना विनंती आहे. त्यांनी बहुमत सिद्ध करण्याची मागणी करावी. पहा आम्ही १८४ पर्यंतचा आकडा गाठू.’’

उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांच्यावर टीका करताना ते म्हणाले, ‘‘उद्धव ठाकरे यांच्या गटातून कोणीही गेले तरी त्यांना फरक पडत नाही. कारण त्यांना आता राष्ट्रवादी आणि काँग्रेसची साथ आहे. उद्धव ठाकरेंनी आता फक्त काँग्रेसचे संविधान स्विकारायचे राहिले आहे. स्वार्थासाठी त्यांनी विचारधारेला तिलांजली दिली. आता गजानन किर्तीकरांसारखा निष्ठावान नेता बाहेर पडल्यावरही त्यांना काही फरक पडत नाही.’’

भाजपने राज्यात लोकसभेच्या ४५ पेक्षा जास्त आणि विधानसभेला २०० पेक्षा जास्त जागा जिंकण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. त्या दृष्टीने आम्ही प्रयत्न सुरू केले आहेत. जनतेच्या मनातील सरकार शिंदे-फडणवीस यांचेच आहे. माजी मंत्री जितेंद्र आव्हाड यांना झालेली अटक कायदेशीरच आहे, असही बावनकुळे यांनी स्पष्ट केले.

मविआच्या नाकर्तेपणानेच गेले उद्योग

उद्योगांबाबत बावन्नकुळे म्हणाले, ‘‘ज्या राज्याचे मुख्यमंत्री त्यांच्या प्रधान सचिवांना भेटण्यासाठी चार दिवस लावतात, त्या राज्यात उद्योग कसे येणार? माहिती अधिकारातून आपण माहिती घेतलीत तरी हे लक्षात येईल की महाविकास आघाडीच्या नाकर्तेपणामुळेच उद्योग परराज्यात गेले.’’

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT