Bharat Rashtra Samiti Politics: Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Bharat Rashtra Samiti Politics: महाराष्ट्रात पक्षविस्तारासाठी भारत राष्ट्र समितीचे मोठे पाऊल ऑगस्टमध्ये होणार मोठा मेळावा !

सरकारनामा ब्यूरो

के.चंद्रशेखर राव यांच्या बीआरएस अर्थात भारत राष्ट्र समिती पक्षाने गेल्या काही महिन्यांपासून महाराष्ट्रावर पक्ष विस्तारासाठी अधिक लक्ष केंद्रित केल्याचे दिसून येत आहे. राज्यातील बहुतांशी जिल्ह्यातून आता भारत राष्ट्र समिती पक्षाने आपले छोटे-मोठे नेत्यांना पक्ष प्रवेश देत बस्तान बसवण्यात सुरुवात केली आहे. अहमदनगर जिल्ह्यातही अनेक तालुक्यात भारत राष्ट्र समिती पक्षात स्थानिक नेत्यांनी प्रवेश करत पक्षाच्या ध्येयधोरणांचा प्रचार सोशल माध्यमातून सुरू केला आहे.

जिल्ह्यातील श्रीगोंद्याचे घनश्याम आण्णा शेलार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचा त्याग करत भारत राष्ट्र समिती पक्षात जाहीर पक्ष प्रवेश केल्याने पक्षाने आता बाळसे धरण्यास सुरुवात केली आहे. या पार्श्वभूमीवर आता शेलार सध्या अधिकाधिक जिल्ह्यातील मोठ्या नेत्यांना पक्षाकडे आणण्यासाठी प्रयत्नशील आहेत. शनिवारी (७ जुलै) श्रीरामपूरचे माजी आमदार भानुदास मुरकुटे यांनी शेलार यांच्यासह तेलंगणात हैद्राबाद इथे मुख्यमंत्री के.चंद्रशेखर राव यांची भेट घेतली.

या भेटी दरम्यान के.चंद्रशेखर राव यांच्यासोबत मुरकुटे यांनी जवळपास एक तास चर्चा केली. तेलंगणाच्या स्थापनेनंतर केवळ नऊ वर्षात मुख्यमंत्री के.चंद्रशेखर राव यांच्या नेतृत्वाखाली झालेला विकास पाहून नेते मंडळी आकर्षित होत आहेत. या पार्श्वभूमीवर अहमदनगर जिल्ह्यात लवकरच भारत राष्ट्र समिती पक्षाचा भव्य मेळाव्याचे आयोजन करण्याचे ठरवण्यात आले आहे.

येत्या ऑगस्ट महिन्यात भारत राष्ट्र समिती पक्षाचा जिल्ह्यात भव्य मेळाव्यासाठी मुख्यमंत्री के.चंद्रशेखर राव यांच्याकडे तारीख मागण्यात आली आहे. त्यांनी ऑगस्ट मधे तारीख देण्याचे कबूल केल्याची माहिती घनश्याम आण्णा शेलार यांनी दिली आहे. महाराष्ट्रातील हा सर्वात असा मोठा भव्यदिव्य मेळावा असेल, त्यासाठी लवकरच तयारी सुरू करण्यात येणार आहे.

मेळाव्याच्या निमित्ताने सहकारात मोठे नाव असलेले अनेक तालुक्यातील नेते यांचा पक्ष प्रवेश होण्याची शक्यता आहे. यात काही मोठ्या नेत्यांचा समावेश असेल असे बोलले जाते. 2019 पासून महाविकास आघाडी सरकारचा कारभार, पुढे शिवसेना आणि नुकतेच झालेले राष्ट्रवादी काँग्रेस मधील बंड, कांद्यासह इतर शेतमालाचे कोसळलेले भाव, हमीभाव, पीकविमा बाबत शेतकऱ्यांच्या अनेक तक्रारी या राजकीय पार्श्वभूमीवर गेल्या चार वर्षांत शेतकऱ्यांच्या पदरात सरकारने काय टाकले, असा प्रश्न शेतकऱ्यांसमोर आहे. शेतकरी वर्ग या सर्व पक्षांच्या राजकारणाला वैतागला आहे. त्यामुळे शेतकरीही पर्यायाच्या शोधात असल्याचा फायदा भारत राष्ट्र समिती पक्षाला होईल, असा विश्वास शेलार यांनी व्यक्त केला आहे.

Edited By- Anuradha Dhawade

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT