BJP NCP Shivsena Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

MLC Election : सांगली-साताऱ्यात भाजपचा गेम होणार? शिवसेनेच्या तानाजी पाटलांचं बंड; बंडखोरीला राष्ट्रवादीच्या सदस्यांचीही साथ

BJP VS NCP Shivsena : महायुती जागा वाटपाची चर्चा अंतिम नसताना तानाजी पाटील यांनी दाखल केला उमेदवारी अर्ज यावरूनच त्याला जिल्हा परिषदेचा राजकीय वाद कारणीभूत असल्याचे सांगितले जाते.

Rahul Gadkar

BJP News : सांगली जिल्हा परिषदेच्या राजकारणात शिवसेनेचे नेते आणि जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक तानाजी पाटील यांनी भाजपला शह देत अप्रत्यक्षपणे महाविकास आघाडीला साथ दिली. आता तीच परिस्थिती सांगली सातारा स्थानिक स्वराज्य संस्थेच्या विधानपरिषद निवडणुकीत आहे.

महायुती म्हणून तिन्ही पक्षांनी एकत्र निवडणूक लढवण्याची घोषणा केली असली तरी तानाजी पाटील यांनी उमेदवारी अर्ज दाखल बंडाचे निशाण फडकावले आहे. त्यांच्या अर्जावर राष्ट्रवादी काँग्रेसच्या सदस्यांच्या सह्या असल्याने त्यामागे मोठे षडयंत्र रचले जात आहे की काय? अशी शंका उपस्थित होत आहे.तानाजी पाटील यांनी उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर ही शिवसेनेची भूमिका आहे की, व्यक्तिगत भूमिका आहे हे देखील गुलदस्त्यात आहे.

सांगली सातारा स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या विधान परिषद निवडणुकीत अर्ज छाननी झाली आहे. उद्या 4 जून हा अर्ज माघारीचा अंतिम दिवस आहे. हा मतदारसंघ महायुतीमध्ये भाजपला गेला असून भाजपकडून धैर्यशील कदम हे निवडणुकीच्या रिंगणात उतरले. मात्र शिंदेसेनेचे नेते, जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक तानाजी पाटील यांच्या उमेदवारीमुळे महायुतीमधील अंतर्गत वाद आणि गुंता अधिक वाढला आहे.

महायुती जागा वाटपाची चर्चा अंतिम नसताना तानाजी पाटील यांनी दाखल केला उमेदवारी अर्ज यावरूनच त्याला जिल्हा परिषदेचा राजकीय वाद कारणीभूत असल्याचे सांगितले जाते.

तानाजी पाटील आपला उमेदवारी अर्ज मागे घेतील असा दावा उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी केला असला तरी त्यांच्या अर्जावर राष्ट्रवादी काँग्रेसच्या काही सदस्यांनी केलेल्या सह्यांमुळे त्यामागे मोठी राजकीय गणिते असल्याची चर्चा आहे. विशेष म्हणजे काही दिवसांपूर्वी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, आमदार सुहास बाबर, मंत्री शंभूराज देसाई यांची भेट घेतली होती.

तानाजी पाटील यांच्या मागे कोणाची शक्ती उभी आहे. याबाबत तर्कवितर्क लढवले जात आहेत. तानाजी पाटील हे शिवसेनेचे नेते आहेत. राज्यात सर्व जागांवर महायुती म्हणून एकत्र निवडणूक लढवायचे ठरले असताना तानाजी पाटील हे उद्या काय भूमिका घेणार याकडे लक्ष आहे. पाटील यांनी माघार घेतली नाही, तर निवडणूक तिरंगी होण्याची शक्यता आहे.

तिरंगी लढतीमुळे ही निवडणूक महायुती विरुद्ध महाविकास आघाडी इतकीच मर्यादित राहणार नाही, तर स्थानिक स्वराज्य संस्थांमधील गटबाजी आणि वैयक्तिक राजकीय समीकरणांचा संघर्षही पेटणार आहे.

जिल्हा परिषदेच्या राजकारणात महाविकास आघाडीतील काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्ष, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे, यांच्यासोबत महायुती मधील राष्ट्रवादी काँग्रेस आणि त्याला अप्रत्यक्षपणे शिंदेच्या शिवसेनेने पाठिंबा दिल्यानंतर महाविकास आघाडीचा अध्यक्ष झाला. त्यामुळे तानाजी पाटील आणि महाविकास आघाडी मधील नेत्यांचे संबंध चांगले आहेत.

मतभेद आणखी वाढणार

निवडणुकीच्या रिंगणात राहिल्यास तानाजी पाटील यांना महाविकास आघाडीचा पाठिंबा मिळण्याची शक्यता नाकारता येत नाही. सांगली जिल्ह्यात भाजप आणि शिंदेसेनेतील स्थानिक मतभेद अनेकदा उघड झाले आहेत. हे मतभेद विधान परिषद निवडणुकीत बाहेर येण्याची शक्यता आहे.

त्यामुळे येत्या 24 तासात तानाजी पाटील काय निर्णय घेणार यावर महायुतीचे गणित अवलंबून आहे. शिवाय सांगली जिल्ह्यातील राजकारण देखील स्पष्टपणे उघड होणार आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT