भाजपने माजी मंत्री अण्णासाहेब डांगे, त्यांच्या दोन मुलांसह आणि कार्यकर्त्यांना आपल्या पक्षात सामील करून राष्ट्रवादी काँग्रेसला मोठा धक्का दिला.
हा राजकीय धक्का जयंत पाटील यांच्यासाठी महत्त्वाचा मानला जात असून, त्यांनी स्पष्ट शब्दांत प्रतिक्रिया दिली – “थोडं थांबा आणि बघा पुढे काय होतंय”.
पक्ष फोडणाऱ्यांना इशारा देत जयंत पाटील यांनी पक्षात राहणाऱ्यांना पाठिंबा देण्याचे आवाहन केले.
Sangli News : भाजपने काँग्रेसपाठोपाठ राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाला मोठा धक्का दिला. माजी मंत्री अण्णासाहेब डांगे यांच्यासह त्यांच्या दोन्ही मुलांचा आणि कार्यकर्त्यांचा मुंबईत भाजप प्रवेश झाला. हा प्रवेश जयंत पाटील यांच्यासाठी धक्का मानला जात आहे. अशातच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना जयंत पाटील यांच्या प्रवेशावरून छेडण्यात आल्यावरून जयंत पाटील यांनी थेट हल्लाबोल केला आहे. यावरून जयंत पाटील यांनी, ज्यांना सोबत थांबायचे आहे ते थांबतील बाकीचे जातील. पण ‘थोडं थांबा आणि बघा पुढे काय होतंय’, असा इशाराच त्यांनी पक्ष फोडणाऱ्यांसह जाणाऱ्यांना दिला आहे.
जयंत पाटील आयर्विन पुलाला समांतर नवीन पुलाच्या कामाची पाहणी केल्यानंतर पत्रकारांशी संवाद साधत बोलत होते. यावेळी माजी मंत्री अण्णासाहेब डांगे यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यावरून त्यांनी प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले, विरोधकांकडून ऑफर येत असतात, जे फुटणार ते फुटत राहतात. पण राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात माझ्याबरोबर ज्यांना थांबायचे आहे ते थांबतील बाकीचे जातील. यावर आता काय बोलू. पण, माझा एक प्रॉब्लेम आहे, समोरून विरोध होत नाही, तोपर्यंत मी शांत असतो. जेव्हा विरोध सुरू होतो, त्यावेळी माझ्यातला ‘ओरिजनल’ माणूस जागा होतो. त्यामुळे ‘थोडं थांबा आणि बघा पुढे काय होतंय ते’, असा इशाराच विरोधकांना त्यांनी दिला आहे.
यावेळी त्यांनी माणिकराव कोकाटे यांच्यासह इतर वादग्रस्त मंत्र्यांच्या राजीनाम्यावरून मुख्यमंत्र्यांवर देखील निशाना साधला. मुख्यमंत्री वादग्रस्त मंत्र्यांची पाठराखण करत आहेत. सरकारमधील कोणताही मंत्री काहीही बोलू देत, करू देत, मुख्यमंत्र्यांना हे मान्य आहे, असेच आता वाटत आहे. त्यामुळे मंत्री माणिकराव कोकाटे यांच्यासह इतरांच्या राजीनाम्याचा विषय येत नाही. मात्र मुख्यमंत्र्यांना आपले सरकार जनतेसमोर कसे हवे? हे कळायला हवे होते, असाही टोला त्यांनी लगावला आहे.
त्यांनी, राज्यातील ठेकेदारांवर शासनाची दहशत आहे. पाच लाख ठेकेदारांची 90 हजार कोटींची बिले थकली आहेत. हर्षल पाटील या ठेकेदाराने बिले रखडली आणि आर्थिक परिस्थिती कोलमडली म्हणून आत्महत्या केली. इतरांवर तशी वेळ येऊ नये, याची खबरदारी आता शासनाने घ्यायला हवी असेही मत जयंत पाटील यांनी व्यक्त केले.
यावेळी त्यांनी आगामी जिल्हा परिषद, पंचायत समिती, महापालिका, नगरपालिकांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पक्षातील पदाधिकाऱ्यांना चांगलाच दम भरला. ते म्हणाले, अनेक जण सत्ताधाऱ्यांच्या संपर्कात आहेत. त्यामुळे ज्यांना जायचे त्यांनी आताच पक्ष सोडून जावे. मी आता मोकळाच आहे. महापालिका निवडणुकीवेळी जर कोणी पक्ष सोडला तर त्यांचा कार्यक्रम करू.
1. अण्णासाहेब डांगे कोणत्या पक्षात सामील झाले?
माजी मंत्री अण्णासाहेब डांगे, त्यांच्या मुलांसह आणि समर्थकांसह भाजपमध्ये प्रवेश केला.
2. जयंत पाटील यांनी या प्रवेशावर काय प्रतिक्रिया दिली?
जयंत पाटील यांनी पक्ष फोडणाऱ्यांना उद्देशून “थोडं थांबा आणि बघा पुढे काय होतंय” असा इशारा दिला.
3. हा राजकीय प्रवेश कोणासाठी मोठा धक्का मानला जातोय?
हा प्रवेश जयंत पाटील यांच्यासाठी आणि राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) साठी मोठा धक्का मानला जातो आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.