Rajendra Anna Deshmukh and Amarsinh Deshmukh
Rajendra Anna Deshmukh and Amarsinh Deshmukh  Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

राष्ट्रवादीचा दे धक्का! भाजपमध्ये गेलेले पश्चिम महाराष्ट्रातील दोन बडे नेते स्वगृही परतणार

सरकारनामा ब्युरो

आटपाडी (सांगली) : राष्ट्रवादी काँग्रेसने (NCP) आता भाजपला (BJP) धक्का देण्याची तयारी केली आहे. लवकरच भाजपमध्ये गेलेले दोन नेते स्वगृही परतणार आहेत. आटपाडी (Atpadi) तालुक्यातून माजी आमदार राजेंद्रअण्णा देशमुख (Rajendra Anna Deshmukh) आणि त्यांचे बंधू जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष अमरसिंह देशमुख (Amarsinh Deshmukh) हे परतण्याच्या वाटेवर आहेत. देशमुख यांनी मागील जिल्हा परिषद निवडणुकाआधी पक्ष सोडल्याने जिल्ह्यात राष्ट्रवादीला मोठा धक्का बसला होता.

राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) यांच्यासोबत त्यांची चर्चा झाली आहे. शरद पवारांच्या दोन वर्षांपूर्वी झालेल्या आटपाडी दौऱ्यावेळीही अमरसिंह यांनी त्यांची भेट घेतली होती. नुकतीच उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांचीही अमरसिंह यांनी भेट घेतल्याचे समोर येत आहे. देशमुख बंधू हे जिल्हा परिषद निवडणुकीच्या आधी पुन्हा राष्ट्रवादीमध्ये परततील अशी चर्चा आहे. दरम्यान, शिराळाचे माजी मंत्री शिवाजीराव नाईक (Shivajirao Naik) यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमधील प्रवेशावरही शिक्कामोर्तब झाले आहे.

आटपाडीचे देशमुख आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांचे जुने राजकीय संबंध आहेत. माजी आमदार राजेंद्रअण्णा देशमुख यांनी १९९५ मध्ये विधानसभेची निवडणूक अपक्ष म्हणून जिंकली होती. तेव्हा युती सरकारला जिल्ह्यातील अन्य चार अपक्षांसोबत त्यांनीही पाठिंबा दिला होता. आता त्या पाच जणांपैकी नाईकांसोबत देशमुखही राष्ट्रवादीत परतण्याच्या वाटवेर आहेत. राष्ट्रवादीच्या स्थापनेनंतर जिल्ह्यातून पहिल्यांदा त्यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला होता. त्यामुळे पाच वर्षापूर्वी त्यांनी केलेले पक्षांतर राष्ट्रवादीला जिव्हारी लागले होते.

देशमुख गटाच्या अनेक संस्था आर्थिक अडचणीत आल्याने त्यांचे राजकारणही अडचणीत आले आहे. माणगंगा साखर कारखाना आणि सूतगिरणी थकित कर्जापोटी जिल्हा बँकेने ताब्यात घेतली होती. आता सूतगिरणी अमरसिंह देशमुख यांनी जिल्हा बँकेकडून परत विकत घेतली आहे. टेंभूच्या पाण्यामुळे तालुक्यात उसाचे क्षेत्र वाढले असले तरी बाहेरचे कारखाने ऊस घेऊन जाण्यास टाळाटाळ करीत आहेत. त्यामुळे कारखाना पुन्हा सुरू व्हावा, अशी लोकांची मागणी आहे. कारखाना पुन्हा ताब्यात घेण्याच्या दृष्टीने अमरसिंह देशमुख यांच्या हालचाली सुरु आहेत. जिल्हा बँकेतगी राष्ट्रवादी सत्तेत असल्याने आर्थिक अरिष्टातून बाहेर पडण्यासाठी हीच योग्य वेळ असल्याचे त्यांच्या कार्यकर्त्यांचे मत आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT