jaykumar gore | ramraje naik nimbalkar.jpg sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Jaykumar Gore : रामराजेंना नक्की कशाची भीती? जयाभाऊंनी सगळंच सांगितलं; मनोज वायपेयीचा डायलॉग मारत इशाराही दिला

Akshay Sabale

रामराजे नाईक-निंबाळकर हे एक नंबरचे गद्दार आहेत. लोकसभेला रामराजेंनी महायुतीच्या विरोधात काम केलं. तेव्हा ना मी रडलो किंवा रणजितसिंह नाईक-निंबाळकर रडले. आम्ही पराभव स्वीकारला. गद्दारी करून सरकारकडून अपेक्षा ठेवण्याचा अधिकार तुम्हाला कुणी दिला? असा सवाल आमदार जयकुमार गोरे यांनी उपस्थित केला आहे. राजनीती चित्रपटातील अभिनेता मनोज वायपेजीचा 'करारा जबाब मिलेगा', असा डायलॉग मारत गोरेंनी रामराजेंना इशाराही दिला आहे. ते प्रसारमाध्यमांशी संवाद साधत होते.

जयकुमार गोरे ( Jaykumar Gore ) म्हणाले, "रामराजे वीस वर्षे मंत्री, सात वर्षे सभापती, सत्तावीस वर्षे सत्तेत होते. आता रामराजेंना माझ्या नावानं रडण्याची वेळ आली आहे. सत्तेतून पाच महिने सुद्धा ते राहू शकत नाहीत. मी आमदार, मंत्रीपद किंवा सभापती नसताना रामजेंविरुद्ध लढाई लढली. जयकुमार गोरे सतरा वर्षात कधीही रडला नाही."

रामराजेंची दया येते...

"पाच महिने रामराजे ( Ramraje Naik Nimbalkar ) सत्तेशिवाय आमचा सामना करू शकत नाहीत. त्यामुळे लक्षात घ्या, रामराजे किती कमजोर आहेत. सत्तेची कवचकुंडलं निघाल्यानंतर रामराजेंची अवस्था आपण पाहिली, तर त्यांच्यावर दया येते," असा टोलाही जयकुमार गोरेंनी लगावला आहे.

रामराजे कार्यकर्त्यांच्या भावनेच्या आड लपत आहेत...

"रामराजेंनी चिंता करू नये. जयकुमार गोरे कधीही चुकीचं पाऊल उचलणार नाही. मात्र, रामराजेंनी आयुष्यभर दुसऱ्यांवर केसेस टाकण्याचा प्रयत्न केला. आता त्याच रामराजेंना त्यांच्यावर केसेस दाखल होण्याची आणि राजकारण संपवण्याची याची भीती वाटत आहे. त्यामुळे कार्यकर्त्यांच्या भावनेच्या आड लपून रामराजे 'तुतारी'कडे जाण्याचा प्रयत्न करत आहेत," असा दावा जयकुमार गोरेंनी केला.

जनता तुम्हाला माफ करणार नाही...

"रामराजे एक नंबरचे गद्दार आहेत. लोकसभेला महायुतीच्या विरोधात रामराजेंनी काम केलं. तेव्हा ना मी रडलो, ना रणजितसिंह नाईक-निंबाळकर रडले. आम्ही पराभव स्वीकारला. आता आपण युतीत गद्दारी करून सरकारडून काय अपेक्षा ठेवता? हा अधिकार आपल्याला कुणी दिला? तुम्हाला 'तुतारी'कडे जायचं आहे, तर जावा. तुम्हाला जो निर्णय घ्यायचा, तो घ्या. जनता तुम्हाला माफ करणार नाही. करारा जबाव मिलेगा. जो किया है, वो भुगतना तो पडेगा," असा इशारा जयकुमार गोरेंनी रामराजेंना दिला आहे.

रामराजे नेमकं काय म्हणाले होते?

"सभापती असताना मला तुरुंगात टाकण्याचे प्रयत्न दोघांनी केले", असा गंभीर आरोप रामराजे नाईक-निंबाळकर यांनी रणजितसिंह नाईक-निंबाळकर आणि माण-खटावचे आमदार जयकुमार गोरे यांचा उल्लेख न करता केला होता.

"अमित शहा यांना जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या कार्यक्रमाला येऊ दिले नाही. आमच्या कार्यकर्त्यांवर ईडी लावली जाते. खोट्या केसेसची भीती दाखवली जातेय. याबाबत अजितदादांना बोललो आहे. तरीही त्यात बदल झाला नाही. ज्या सत्तेत कार्यकर्ते सुरक्षित नाहीत, ती सत्ता काय कामाची? आम्ही काय करायचे, ते अजितदादांनी ठरवावे. अजितदादांनी मनावर न घेतल्यास आम्ही कार्यकर्त्यांना साक्षी ठेवून निर्णय घेऊ," असे राजकीय परिवर्तनाचे संकेत रामराजे नाईक-निंबाळकर यांनी दिले होते.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT