Balasaheb Thorat
Balasaheb Thorat Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Balasaheb Thorat : भाजपची अशी ही बनवाबनवी सुरूच

अमित आवारी

Balasaheb Thorat : काँग्रेस पक्षातर्फे अहमदनगर शहरात काल ( ता. 15 ) आझादी गौरव यात्रेचा समारोप कार्यक्रम झाला. या प्रसंगी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते तथा विधानसभेतील काँग्रेसचे गटनेते बाळासाहेब थोरात ( Balasaheb Thorat ) यांनी शिंदे गट व भाजपवर जोरदार टीका केली.

या समारोप कार्यक्रमाला आमदार डॉ. सुधीर तांबे, आमदार लहू कानडे, प्रदेश सरचिटणीस उत्कर्षा रुपवते, संगमनेर नगरपालिकेच्या अध्यक्षा दुर्गा तांबे, जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष प्रतापराव शेळके, राजेंद्र नागवडे, करण ससाणे, जिल्हा सहकारी बँकेचे उपाध्यक्ष माधवराव कानवडे, जिल्हाध्यक्ष बाबासाहेब साळुंके, शहराध्यक्ष किरण काळे, सचिन गुजर आदी उपस्थित होते.

बाळासाहेब थोरात म्हणाले, भारतीय राज्यघटनेने सामान्य लोकांना मताचा अधिकार दिला. मनमोहन सिंग पंतप्रधान असताना काँग्रेसच्या दहा वर्षांच्या काळात अनेक मोठी कामे झाली. जगात एवढी मोठी कामे झाली नाहीत. मात्र खोटे बोलून भाजप सत्तेत आली. 2 कोटी नोकऱ्या देतो, विदेशातून काळेधन आणू त्यामुळे देशातील प्रत्येकाला 15 लाख रुपये देऊ अशी वाटेल ती आश्वासने दिली. सत्तेत आल्यावर आठ वर्षांत इंधन दरवाढ झाली. पैसे कुणालाही मिळाले नाही उलट खिशातून पैसे जाऊ लागले. भाजपचा अशी ही बनवाबनवीचा कार्यक्रम सुरूच आहे, असा टोलाही त्यांनी यावेळी लगावला.

ते पुढे म्हणाले की, देशात जाती-धर्मांच्या नावाखाली वाद लावायचे. महागाईवर चर्चा होऊ द्यायची नाही. सत्ता टिकविण्यासाठी काहीही करायचे. हे त्यांचे ठरलेले. जो विरोधात बोलतो त्याला ईडी, सीबीआयच्या नोटीसा येतात. देशात दहशतवाद निर्माण करण्याचा प्रयत्न सुरू आहे. देशात अनेक युवक बेरोजगार आहेत. जे कामाला होते तेही आता घरी बसले आहेत. अग्निपथ योजना काढली. चार वर्षांनी घरी येऊन युवकांनी काय करायचे, अशी टीका त्यांनी केली.

शिंदे गटातील आमदारांच्या स्थितीवर त्यांनी सांगितले की, राज्यात मंत्रीमंडळ तयार करायला 40 दिवस लागले. खाते वाटपाला 4 दिवस गेले. या सरकारचा दीड महिना असाच गेला. यात शिंदे गटातील लोकांना चूकल्यासारखे वाटू लागले आहे. काय झाडी, काय डोंगर, काय हॉटेल एवढच म्हणत बसण्याची वेळ त्यांच्यावर आली आहे. आता लवकरच सर्वोच्च न्यायालयाचा निकाल लागणार आहे. त्यांना काहीच दिवस मिळाले यात त्यांनी आनंद मानावा, अशी कोपरखळीही त्यांनी मारली.

काँग्रेसला नव्हेतर भारतीय राज्यघटनेला व लोकशाहीला वाईट दिवस आले आहेत. राज्यघटना व लोकशाही टिकवायची असेल तर राज्यघटना जपली पाहिजे. ही आपली सर्वांची जबाबदारी आहे. राज्यघटनेतील विचार हाच काँग्रेसचा विचार आहे. हा विचार प्राणपणाने जपण्याची आवश्यकता आहे, असे आवाहन त्यांनी काँग्रेसचे कार्यकर्ते व नेत्यांना केले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT