Patan, 21 July : साताऱ्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई आणि सत्यजित पाटणकर गटात पुन्हा एकदा राजकीय सामना रंगणार आहे. जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीत पाटणकर गटाची झालेली पीछेहाट, गावोगावी पाटणकरांच्या कार्यकर्त्यांचा देसाई गटात झालेल्या पक्षप्रवेश यामुळे सध्या गावपातळीवर देसाई गटाची ताकद वाढली आहे, त्या पार्श्वभूमीवर पालकमंत्री देसाईंच्या वाढलेल्या ताकदीसमोर भाजपचे पाटणकर कशी लढत देतात, याकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष असणार आहे.
राज्य निवडणूक आयोगाने राज्यातील १५ हजार ३०० ग्रामपंचायतींच्या निवडणुकांसाठी मतदार यादीचा कार्यक्रम जाहीर केला आहे. त्यानुसार प्रभागनिहाय प्रारूप मतदार याद्या २४ जुलै रोजी प्रसिद्ध होणार असून त्यावर हरकती व सूचना २४ ते २९ जुलैदरम्यान करता येणार आहेत. प्रभागनिहाय अंतिम मतदार यादी ता. ४ ऑगस्ट रोजी प्रसिद्ध होणार आहे.
अंतिम मतदार यादीवर शिक्कामोर्तब झाल्यानंतर सहा ऑगस्टनंतर निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर होण्याची शक्यता आहे. तालुक्यातील १०८ ग्रामपंचायतींच्या निवडणुका घेण्यात येणार आहेत. यात काही नव्याने अस्तित्वात आलेल्या ग्रामपंचायतींचा समावेश आहे. त्यामुळे गावपातळीवर ग्रामपंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कार्यकर्त्यांनी बैठकांचे सत्र सुरू केले आहे.
पाटण तालुक्यातील मणदुरे, तारळे, सुरूल, साखरी, मेंढोशी, नावडी, शिंगणवाडी, सोनईचीवाडी, मुंदुळ हवेली, पापोर्डे, सोनवडे, सांगवड, पेठशिवापूर, कोकिसरे, त्रिपुडी, मूळगाव, दिवशी बुद्रुक, कुंभारगाव, धामणी, काळगाव, गुढे, खळे, कुठरे या गावांत सत्तेसाठी चुरशीची लढत होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
पाटण तालुक्यात पारंपरिक प्रतिस्पर्धी असलेले देसाई आणि पाटणकर गटातच निवडणुकीत सत्ता संघर्ष पाहावयास मिळणार आहे. दोन्ही गटांसाठी ग्रामपंचायत निवडणुका महत्त्वाच्या मानल्या जातात. गावतळीवरील सत्तासंघर्षाचा फायदा विधानसभा निवडणुकात होतो. त्या दृष्टीने ग्रामपंचायत निवडणुकांत देसाई-पाटणकर गटांत चुरशी लढत होते.
पाटणकर गटाला गावपातळीवर संघटन मजबूत करून भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून कार्यकर्त्यांच्या मागे ताकद उभी करावी लागणार आहे. स्थानिक मुद्द्यावर होणाऱ्या ग्रामपंचायतीच्या निवडणुकांत गावात झालेली विकासकामे, तंटे, शासकीय योजनांचा वैयक्तिकरीत्या दिलेला लाभ, विकासकामांची आश्वासने अशा अनेक मुद्द्यांवर निवडणुका लढवल्या जातील. त्यामुळे तालुक्यातील दोन्ही गटांत ग्रामपंचायत निवडणुकांचा संघर्ष अटळ आहे.