Pravin Darekar
Pravin Darekar sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

दोन्ही राजे आमचेच...सातारा पालिकेचा निर्णय फडणवीस घेतील...

सरकारनामा ब्युरो

सातारा : साताऱ्याचे दोन्ही राजे भाजपमध्ये असूनही पालिकेच्या निवडणुकीत दोघे आमने सामने आहेत, याविषयी विचारले असता विधान परिषदेचे विरोधीपक्ष नेते प्रवीण दरेकर म्हणाले, साताऱ्याचे दोन्ही राजे आमचेच आहेत. त्यामुळे पालिकेच्या निवडणुकीत ते आमने सामने असतीलच, असे नाही. त्याबाबत विधानसभेचे विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस निर्णय घेतील. दरम्यान, सातारा शहराची हद्दवाढ होऊनही अद्यापपर्यंत राज्य सरकारने एका दमडीचाही निधी दिलेला नाही, तसेच अवकाळीने उद्धवस्त शेतकऱ्यांनाही मदत दिलेली नाही, याबाबत तातडीने निर्णय घ्यावा, अन्यथा येणाऱ्या अधिवेशनात याचा पर्दाफाश करू, असा इशाराही त्यांनी दिला आहे.

जावळीतील एका मंदीराच्या कार्यक्रमानिमित्ताने श्री. दरेकर आज जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले होते. यावेळी त्यांनी शासकिय विश्रामगृहात पत्रकारांशी संवाद साधला. दरेकर म्हणाले, महाविकास आघाडीचे सरकार धनदांडगे, वाईन उद्योग, बारवाल्यांसाठी काम करत आहे. एका बाजूला मंदीरे, शाळा बंद तर दुसरीकडे मॉलमध्ये वाईन विक्री उद्योग हे सरकार करत आहे. याचा शेतकऱ्यांना काहीही फायदा नसून त्यांच्या खांद्यावर बंदूक ठेऊन हा उद्योग सुरू आहे. महाराष्ट्रातील तरुणाईस व्यसनाधिन करणार आहात काय, असा प्रश्न उपस्थित त्यांनी उपस्थित केला.

साखर कारखानदारीस राज्य सरकारकडून कोणतंही पॅकेज मिळालेले नाही, ही दुर्दैवी बाब असून केंद्रातील मोदी सरकारने साखर उद्योगांसाठी पाच हजार 361 कोटींच पॅकेज दिले होते. साखर निर्यातीसाठी प्रोत्साहन अनुदान दिले. इथेनॉल निर्मितीला प्राधान्य दिल्यामुळे 15 हजार कोटींचा महसूल मिळत आहे.ज्या साखर कारखानदारीवर राजकारण केलं आज त्याकडे हे सरकार दुर्लक्ष करत आहे, असा आरोप श्री. दरेकर यांनी केला आहे.

सातारा शहराची हद्दवाढीचा निर्णय राज्य सरकारने घेतला. पण, अजून एक दमडीचाही निधी दिलेला नाही. अवकाळीत उद्धवस्त झालेल्या शेतकऱ्यांनाही मदत मिळालेली नाही. केवळ हजारो कोटीच्या घोषणा होत आहेत. याकडे सरकारने तातडीने लक्ष द्यावे, अन्यथा येत्या अधिवेशनात याचा पर्दाफाश आम्ही करू, असा इशारा श्री. दरेकर यांनी दिला.

केंजळ येथे ग्रामस्थांनी बसवलेला छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा सरकार व जिल्हा प्रशासन हटवते. तर जिल्हाधिकारी कार्यालयाशेजारी असलेला दर्गा आणि प्रतापगडाच्या पायथ्याशी असलेलं थडग हटविले जात नाही. हे छत्रपतींच्या राज्यात घडत आहे, ही बाब दुर्दैवी आहे. यातून हे सरकार धार्मिक तेढ निर्माण करत आहे, अशी टीकाही त्यांनी केली.

साताऱ्याचे दोन्ही राजे भाजपमध्ये असूनही पालिकेच्या निवडणुकीत दोघे आमने सामने आहेत, याविषयी विचारले असता प्रवीण दरेकर म्हणाले, साताऱ्याचे दोन्ही राजे आमचेच आहेत. त्यामुळे पालिकेच्या निवडणुकीत ते आमने सामने असतीलच, असे नाही. त्याबाबत विधानसभेचे विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस निर्णय घेतील.

तर तो फुसका बार निघणार...

भाजपच्या साडेतीन नेत्यांना लवकरच जेलची हवा खावी लागणार आहे, असा गौप्यस्फोट खासदार संजय राऊत यांनी केला होता. याविषयी विचारले असता श्री. दरेकर म्हणाले, राऊत नेहमीच गौप्यस्फोट करत असतात. ते साडेतीन नेते कोण ते त्यांनाच विचारा. कारण, त्यांचा गौप्यस्फोट फुसका बार निघणार आहे, अशी खिल्ली त्यांनी उडवली.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT