Deepak Kesarkar
Deepak Kesarkar Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

दीपक केसरकर म्हणाले, शिवसैनिकांना काँग्रेस, राष्ट्रवादी बरोबर जायचे नाही

सरकारनामा ब्युरो

अहमदनगर - राज्यातील शिवसेना खरी कोणती यावर आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होती. आजची सुनावणी सुरू असताना बंडखोर आमदार दीपक केसरकर ( Deepak Kesarkar ) शिर्डीत आले. त्यांनी साईबाबांची आरती केली. त्यानंतर त्यांनी उपस्थित पत्रकारांशी संवाद साधला. ( Deepak Kesarkar said, Shiv Sainiks do not want to go with Congress, NCP )

दीपक केसरकर म्हणाले, मी शिर्डी आल्यावर व साईबाबांचे दर्शन घेतल्यावर शिर्डी नगरपंचायतचे अभिनंदन करतो कारण माझी वसुंधरा कार्यक्रमात त्यांनी पहिला क्रमांक मिळविला. पंतप्रधानांनी सर्व नागरिकांना आवाहन केले आहे की, भारताच्या स्वातंत्र्याला 75 वर्षे झाल्याबद्दल प्रत्येक घरावर तिरंगाध्वज लावावा, असे आवाहन त्यांनी केले.

ते पुढे म्हणाले की, न्यायालयात जेव्हा सुनावणी असते तेव्हा त्यावर कुठल्याही प्रकारचे भाष्य करायचे नसते. आज आम्हाला प्रतिज्ञापत्र सादर करायला सांगितली आहेत. ही एक प्रक्रिया आहे. त्या प्रक्रियेतून सर्वांना जावे लागते. अंतिम विजय हा सत्याचा होत असतो. सत्याचा विजय होईल याची मला खात्री आहे. आजच आमचा अर्ज निवडणूक आयोगाला गेला. आमचा दावा खरा असल्यामुळे संपूर्ण भारताने पाहिले आहे की, किती खासदार, किती आमदार कुठे आहेत. आपण प्रत्येक गावात गेला तर प्रत्येक शिवसैनिकाचा हाच विचार आहे की, आम्हाला हिंदुत्त्वा बरोबर जायचे आहे. शिवसैनिकांना काँग्रेस, राष्ट्रवादी बरोबर जायचे नाही.

त्यांच्याकडून कितीही प्रतिक्षापत्रे लिहून घेतली तरी शिवसैनिक हा शिवसैनिक असतो. ज्यावेळी बाळासाहेबांचा विचार व हिंदुत्त्वाचा विचार येईल त्यावेळी तो पेटून उठेल. अखंड शिवसेना पुन्हा जगाला दिसेल. या वाटचालीत छोटे मोठे अडथळे साईबाबांच्या कृपेने दूर होतील.

100 वर्षांनंतर पहिल्यांदा साईबाबांच्या पादुका बाहेर पडल्या. मला तीव्रपणे साईबाबांची आठवण झाली. साईबाबांच्या शक्तीचा प्रत्यय मला वेळोवेळी येतो. मी बोलतो म्हणजे मीच मंत्री होणार असे काही नसते. एकनाथ शिंदे व देवेंद्र फडणवीस यांच्या मनात जे असतील ते सर्व मंत्री होणार आहेत. दोनच जणांचे मंत्रिमंडळ असू शकते. माजी दिवंगत पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांनी नियम घातला होता की, 15 टक्क्यांपेक्षा जास्त मंत्री करता येणार नाहीत. जिथे 40 आमदार असतील तिथे केवळ सहाच मंत्रपदे मिळतील. त्यामुळे कमीत कमी 12 व जास्तीत जास्त 15 मंत्रीपदे असा नियम आहे. याचा अर्थ त्यापेक्षा कमी असले तर चालत नाही असे नाही. विरोधकांच्या दिशाभूलीला जनतेने बळी पडू नये, असे त्यांनी सांगितले.

तेलंगणा की आंध्रप्रदेशमध्ये तीन महिने केवळ मुख्यमंत्री होते. तीन महिन्यानंतर मंत्रिमंडळाचा विस्तार करण्यात आला. त्यांना कोणी विचारले नाही. हेच विरोधक काहीतरी काढत असतात. मंत्रिमंडळात प्रत्येक विभागाला प्रतिनिधीत्व द्यावे लागते. हे निर्णय काळजीपूर्वक घ्यायला हवेत, असे त्यांनी स्पष्ट केले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT