Madan Bhosale, Devendra Fadnavis
Madan Bhosale, Devendra Fadnavis sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

मदन भोसले भाजपत येतील, असं वाटलं नव्हतं; तरीही आम्ही ‘किसन वीर’ला मदत केली

सरकारनामा ब्यूरो

सातारा : किसन वीर (Kisan Veer) कारखान्याला राजकीय हेतूने अडचणीत आणण्याचा प्रयत्न केला जात आहे. स्वत:च्या मर्जीतील कारखान्यांना पात्रता नसतानाही अडीचशे, तीनशे कोटी दिले. सहकारात राजकारण असू नये, हा संकेत राष्ट्रवादी काँग्रेसकडून (NCP) डावलला जात असून त्यातून सहकारातील कारखाने खासगी करण्याचा सपाटा लावला आहे. किसन वीर कारखान्यात जर वेगळा निकाल लागला तर राष्ट्रवादीचे लोक हा कारखाना पाव किमतीत खासगी करुन घेतील. किसन वीर कारखान्याला केंद्र शासनाच्या सहकार विभागाकडून मदत मिळवून देण्याची जबाबदारी माझी असून कारखान्यावरील शेतकर्‍यांची मालकी टिकवी, असे आवाहन विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी केले.

भुईंज, ता. वाई येथील किसन वीर सातारा सहकारी साखर कारखान्याची निवडणूक होत आहे. त्या पार्श्‍वभूमीवर फडणवीस यांनी माध्यमांसमोर हे आवाहन केले. ते म्हणाले, सध्या सहकारातील कारखाने स्वत:च्या खासगी मालकीचे कोण करत आहे हे, जनता ओळखून आहे. त्यासाठी जाणीवपूर्वक काही कारखाने अडचणीत आणले जात आहेत, असा आरोप त्यांनी केला. सहकारात राजकारण असता कामा नये, असेही ते म्हणाले.

मी मुख्यमंत्री होतो तेव्हा मदन भोसले (Madan Bhosale) काँग्रेसमध्ये (Congress) होते. तरीही राजकारण न पाहता मी किसन वीर कारखान्याला मदत केली होती. त्यावेळी मदन भोसले भाजपत येतील, असे वाटलेही नव्हते. सहकारातून शेतकर्‍यांची मालकी निर्माण झाली आहे. ती टिकली पाहिजे. हा संकेत या राज्यात पाळला जात होता. मात्र, मदनदादा भाजपत (Bjp) आल्यानंतर त्यांना राष्ट्रवादीने जाणीवपूर्वक अडचणीत आणले. राज्य सहकारी बँकेतून 125 कोटी रुपये मंजूरही केले होते. देतो देतो म्हणून सांगितले जात होते. मात्र, अचानकपणे एक दिवस बँकेचे धोरण बदलल्याचे सांगून त्यांना पैसे नाकारले. त्याचवेळी मर्जीतल्या कारखान्यांना मदत केली. ती करायला हरकतही नाही. पण किसन वीर कारखान्याला जाणीवपूर्वक डावलले. याबाबत मी विधानसभेच्या सभागृहात आवाज उठवला, असेही फडणवीस यांनी सांगितले.

सभासदांची, कामगारांची व इतर देणी, पुढील हंगाम सुरु करण्यासाठी आता केंद्र सरकारच्या सहकार विभागाकडून मदत मिळणार आहे. याबाबत निवडणुकीच्या तोंडावर हा प्रयत्न सुरु नाही. तर यापूर्वीच केंद्र सरकारकडे प्रस्ताव सादर केला आहे. आताच्या केंद्रीय अर्थसंकल्पात एनसीडीसीसाठी तशी तरतूद करण्यात आली आहे. त्यामुळे सर्व प्रस्तावाची पुर्तता करुन तो नुकताच केंद्रीय मंत्री अमित शहा यांच्याकडे सादर केला. त्यांनी कार्यवाहीचे आदेश दिले आहे. याबाबत आम्ही सर्वांनी किसन वीर कारखान्याला मदत झाली, पाहिजे हा आग्रह धरला. आमचा शब्द डावलला जाणार नाही. त्यामुळेच किसन वीर कारखान्याला मदतीची मी स्वत: खात्री देत आहे, असेही फडणवीस म्हणाले. याच प्रकारे आम्ही केंद्रातून विनय कोरे यांच्या वारणा कारखान्याला मदत केली. त्यातून तो कारखाना सावरुन उत्तम प्रकारे चालला आहे. किसन वीरला याच प्रकारे मदत मिळेल आणि अडचणी दूर होतील, असेही त्यांनी सांगितले.

किसन वीर कारखान्याने शक्य होते तेव्हा एसएमपी, एफआरपीपेक्षा 400 कोटीहून अधिकची रक्कम शेतकर्‍यांना दिली. प्रतापगड कारखाना शेतकर्‍यांच्या मालकीचा ठेवताना तसेच शेतकर्‍यांच्या मालकीचा खंडाळा कारखाना, सहवीज निर्मिती प्रकल्प, डिस्टिलरीज, इथेनॉल असे विविध प्रकल्प उभारताना नाही म्हटले तरी ताण आलाच. पण त्यांनी हे सारे उभारले व शेतकर्‍यांच्या मालकीचे उभारले हे लक्षात घ्यायला हवे. शेतकर्‍यांची ही मालकी टिकवण्यासाठी सर्वपक्षीय शेतकरी पॅनेलला विजयी करा, असेही आवाहन फडणवीस यांनी केले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT