Anil Babar Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Anil Babar News : अनिल बाबर काँग्रेस, राष्ट्रवादीच्या आंदोलनांची हवाच काढतात? तसं असेल तर जरा 'जत'कडे पाहा....

Mayur Ratnaparkhe

राहुल गडकर

Sangli Politics News : मागील महिनाभरात राष्ट्रवादी काँग्रेसने आणि काँग्रेसने दोन आंदोलन केली. आमदार सुमनताई पाटील यांनी टेंभू योजनेवरून तर आमदार आण्णा लाड, आमदार मानसिंगभाऊ नाईक यांनी कृष्णा नदीत पाणी सोडण्यावरून आज आंदोलन केले. पण आंदोलन सुरू होण्याच्या आधीच आमदार अनिल बाबर यांनी या दोन्ही प्रश्नात पाठपुरावा करून सध्या तरी हे प्रश्न मार्ग काढलेत.

आमदार अनिल बाबर यांनी एक प्रकारे काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या आंदोलनाची हवाच काढून घेतली. अशी चर्चा सांगली जिल्ह्याच्या राजकारणात आहे, तर अनिल बाबर यांनी जतच्या प्रश्ना संदर्भात शिष्टाई करावी, अशी मागणी आता होऊ लागली आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

टेंभू पाणी योजनेवरून सांगली जिल्ह्यातील आमदार सुमनताई पाटील आणि भाजपचे खासदार संजय पाटील यांच्यात श्रेयवादाचे राजकारण सुरू असताना शिंदे गटाचे आमदार अनिल बाबर यांनी बाजी मारली.

तासगाव आणि कवठेमहांकाळ तालुक्यातील १८ गावांतील शेतकऱ्यांना टेंभू योजनेचे हक्काचे पाणी मिळण्यासाठी विस्तारित टेंभू योजनेच्या अहवालास तृतीय सुधारित प्रशासकीय मान्यता मिळावी, यासाठी आमदार सुमनताई पाटील व युवा नेते रोहित पाटील यांनी मागील महिन्यात सांगली जिल्हाधिकारी कार्यालयासमोर २ ऑक्टोबर उपोषण केले होते. मात्र, त्यापूर्वीच आमदार अनिल बाबर यांनी या आंदोलनाची हवा काढून घेतली होती.

आमरण उपोषणाचा इशारा देताच शासकीय यंत्रणा सकाळपासूनच कामाला लावून टेंभू योजनेवरून भाजपचे आमदार संजय पाटील आणि आमदार सुमनताई पाटील यांच्यात श्रेयवादाचा राजकारणाचा फायदा शिंदे गटाचे आमदार अनिल बाबर यांनी घेतला होता. विस्तारित टेंभू योजनेच्या आठ टीएमसी पाण्याला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून मंजुरीच पत्र अनिल बाबर यांनी घेऊन ते हिरो ठरले होते.

सांगलीत कृष्णा नदी कोरडी पडल्यानंतर आतापासूनच दुष्काळाची चटके सोसावे लागणार, यासाठी संघटना आणि राजकीय पक्षांनी आंदोलनाचा हत्यार उपसले. आज जिल्हाधिकारी कार्यालयासमोर राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेसच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन केले. मात्र, त्यापूर्वीच या आंदोलनाची हवा आमदार अनिल बाबर यांनी काढून घेतली.

काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या आंदोलनाची हवा काढली -

सांगलीतील पाणी संघर्ष टाळण्यासाठी आमदार बाबर यांनी साताऱ्याचे पालकमंत्री शंभूराजे देसाई यांच्याशी संपर्क साधला. सांगली जिल्ह्यातील वास्तविक परिस्थिती देसाई यांच्या कानावर घातली. त्यांनी ताबडतोब मागणी मान्य करत सद्यःस्थितीला १ टीएमसी पाणी सांगली जिल्ह्यासाठी सोडण्याचे आदेश पाटबंधारे विभागाला दिले आणि दुपारी एक वाजता कोयना धरणातून एक टीएमसी पाणी सोडण्याला सुरुवात झाली आहे.

सध्या तरी सांगलीवरचे पाणी संकट कमी झाले असले तरी पुढील काळात पुन्हा संघर्ष करावा लागणार आहे. पण काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या आंदोलनाची हवा पुन्हा बाबर यांनीच काढून घेतल्याची चर्चा सांगली जिल्ह्यात आहे.

अनिल बाबर यांनी सरकारसोबत शिष्टाई करावी -

यावर 'सरकारनामा'शी बोलताना विक्रम सावंत म्हणाले, ''जर अनिल बाबर सर्व प्रश्नात शिष्टाई करणार असतील, तर जत तालुक्याकडे लक्ष द्यावे. ज्या पद्धतीने कर्नाटकचे पाणी आमच्या उशाला आले आहे. तसे सायकॉन पद्धतीने महाराष्ट्राचे पाणी जतजवळ येऊ शकते. जत तालुक्याला एक टीएमसी पाण्याची गरज आहे.''

याशिवाय ''पावसाळ्यात वाहून जाणारे पाणी इकडे सोडल्यास त्याचा फायदा जत तालुक्याला होईल. शेतीचा आणि पिण्याचा पाण्याचा प्रश्न मार्गी लागेल. आमदार अनिल बाबर यांनी सरकारसोबत शिष्टाई करावी, वेळ पडली तर आम्ही त्यांचीही भेट घेऊ'' असंही सावंत म्हणाले.

(Edited by - Mayur Ratnaparkhe)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT