Samadhan Avtade
Samadhan Avtade  Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

‘सत्ताबदलाच्या काळात मी मुंबईत अडकलो अन्‌ विरोधकांनी ‘दामाजी’ जिंकला!’

हुकूम मुलाणी

मंगळवेढा (जि. सोलापूर) : श्री संत दामाजी सहकारी साखर कारखान्यावरील कर्जाच्या आकडेवारीचा अहवाल येत्या दोन महिन्यांत समोर येईल. चुकीची आकडेवारी मांडून सभासदांची दिशाभूल करत आमच्यावर चुकीचे आरोप केले. मात्र, सत्यता अहवालातून समोर येणार आहे. मात्र, आमचे सत्य त्यांचे असत्य खोडण्यात कमी पडले, अशी खंत आमदार समाधान आवताडे (Samadhan Avtade) यांनी दामाजी कारखाना निवडणुकीतील पराभवाबाबत बोलताना व्यक्त केली. तसेच, राज्यातील सत्ता बदलाच्या काळात आपण मुंबईत अडकल्यामुळे समविचारी गटाच्या नेत्यांनी आपल्या विरोधात रान उठवले, त्याचा फायदा त्यांना दामाजी कारखाना जिंकण्यासाठी झाला, असेही त्यांनी सांगितले. (During the change of power, I was stuck in Mumbai and opposition won Damaji factory)

आमदार आवताडे म्हणाले की, दामाजी कारखान्याचा कारभार हातात घेतल्यानंतर १३७ कोटी मुद्दल व त्यावरील व्याजासहित १४५ कोटी रुपये देण्याच्या अवस्थेत सभासदांनी कारभार दिला. कर्जापेक्षा व्याज जास्त असल्यामुळे बहुतांश बँकांनी कर्ज देण्यास टाळाटाळ केली. मात्र, संचालक मंडळाच्या नावे कर्ज घेऊन सहा वर्ष कारखाना चालवून दाखविला. कारखाना ताब्यात घेतल्यावर काहींनी एफआरपी दिल्यावर दामाजी चौकात सत्कार करू, असे आव्हान दिले होते. आम्ही ‘एफआरपी’प्रमाणे उसाला भाव देऊन दाखवला.

टेक्समो कंपनीच्या न्यायालयीन दाव्यासाठी २९ कोटींचा खर्च आला. आमच्या कार्यकाळात इतर प्रकल्प नसल्याने मंगळवेढा तालुक्यातील टंचाईची परिस्थिती, कोरोना आणि साखरेचे घसरलेले दर याचा सामना करावा लागला. सभासदांना सवलतीत साखर निर्णयही सत्ताधाऱ्यांकडून मागे घेण्याची शक्यता असून सहा वर्षांत एकाचाही धनादेश बाऊन्स होऊ दिला नाही, असा दावाही समाधान आवताडे यांनी केला.

नगरपालिकेच्या राजकारणाबद्दल बोलताना आमदार आवताडे म्हणाले की, ज्यांची करंगळी धरून नगरपालिकेत गेलेल्यांनी कारभाऱ्यालाच पालिकेतूनच बाहेर काढले. त्यांच्या भ्रष्टाचाराचे उत्तर जनताच पालिका निवडणुकीत देईल. नगराध्यक्षांवर गुन्हा दाखल करण्यासाठी गेलेले आता चांगले काम केल्याबद्दल त्यांचे गोडवे गाऊ लागले आहेत. नगराध्यक्षांवर गुन्हा दाखल होऊ नये म्हणून मी मध्यस्थी केली. नगरपालिका निवडणूक पक्षीय चिन्हावर लढविली जाणार असून त्याबाबतचा निर्णय वरिष्ठ पातळीवरून होणार आहे, असेही आवताडे यांनी स्पष्ट केले.

प्रलंबित मंगळवेढा उपसा सिंचन योजनेमध्ये त्रुटी असून त्यामध्ये समावेश गावातील क्षेत्र कमी धरले आहे. त्या गावात असणाऱ्या पाझर तलावांचा समावेश व क्षेत्र वाढीच्या दृष्टीने प्रयत्न करणार असून बसवेश्वर व चोखामेळा स्मारकासाठी आमदार झाल्यावर पहिल्यांदा प्रश्न उपस्थित केला. आता सत्ता बदलामुळे हे प्रलंबित प्रश्न मार्गी लावणार असल्याचे त्यांनी या वेळी बोलताना स्पष्ट केले. या वेळी भाजपचे जिल्हा संघटन सरचिटणीस शशिकांत चव्हाण, माजी संचालक सुरेश भाकरे, भारत निकम, विनोद लटके, अविनाश मोरे आदी उपस्थित होते.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT