अहमदनगर : स्वच्छ भारत अभियानात अहमदनगर महापालिकेला देशात 22 वा तर महाराष्ट्रात दुसरा क्रमांक मिळाला आहे. भाजपचे नेते तथा अहमदनगरचे माजी महापौर बाबासाहेब वाकळे व महापालिका आयुक्त शंकर गोरे यांनी हा सन्मान नुकताच दिल्लीत स्वीकारला. साडेचार महिन्यांपूर्वी अहमदनगर महापालिकेत सत्तांतर झाले. तत्पूर्वी शहरात स्वच्छते बाबत झालेल्या कामा बाबत हा पुरस्कार केंद्र सरकारकडून महापालिकेला मिळाला. बाबासाहेब वाकळे यांनी त्यांच्या कारकिर्दीत केलेल्या कामाची ही पावती समजली जात आहे. या संदर्भात त्यांच्याशी साधलेला संवाद... During the tenure of BJP, a lot of work was done in Ahmednagar city
बाबासाहेब वाकळे म्हणाले, माझ्या रुपाने अहमदनगर महापालिकेत भाजपला पहिल्यांदा महापौरपद मिळाले. तत्पूर्वी अहमदनगर शहर हे स्वच्छता मानांकनात देशात 274व्या क्रमांकावर होते. आम्ही शहरातील विविध सामाजिक, शैक्षणिक संस्था, महिला बचत गट आदींच्या महापालिकेत बैठका घेतल्या. या बैठकीतून शहराची स्थिती सुधारण्यासाठी काय करता येईल याचा विचार केला. त्यावेळी शहरात जागा जाग कचऱ्याचे ढीग असायचे. अस्वच्छता असायची.
वाकळे पुढे म्हणाले, शहराच्या नियोजनबद्ध विकासाचा आराखडा तयार करण्यासाठी पुणे शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयातील 20 विद्यार्थ्यांना 2 महिने अहमदनगरमध्ये आणले होते. या विद्यार्थ्यांकडून शहराच्या विकासाचा आराखडा तयार करून गेला. हा आराखडा तयार करत असताना या विद्यार्थ्यांना दोन दिवस इंदौर सहलीला नेले. कारण इंदौर देशात सलग पाच वर्षांपासून स्वच्छतेत प्रथम क्रमांकावर आहे. विद्यार्थ्यांनी मांडलेल्या अहवालानुसार शहरात बदल करण्याचा प्रयत्न केला. त्यासाठी तत्कालीन जिल्हाधिकारी तथा प्रभारी महापालिका आयुक्त राहुल द्विवेदी, सर्व पक्षीय नगरसेवक, महापालिका अधिकारी-कर्मचाऱ्यांनी साथ दिली. सर्वांनी दीड महिने मोहीम राबवत शहरात मोठा बदल केला. भाजप सत्तेत असताना शहर कचराकुंडी मुक्त झाले. स्वच्छतेसाठी 64 घंटागाड्या व दोन कंटेनरची खरेदी झाली. कोरोनामुळे दीड वर्षे कामाचा वेग मंदावला याची खंत वाटते.
महापौरपद कार्यकाळात काय राहून गेले असे विचारले असता वाकळेंनी सांगितले की, अहमदनगर शहरात एकच कचरा डेपो आहे. त्यामुळे नागरी समस्या निर्माण होतात. महापालिकेवरही आर्थिक ताण पडतो. शहरात किमान 7 ते 8 छोटे कचरा डेपो असायला हवेत. यासाठी मी प्रयत्न करत होतो. मात्र ते होऊ शकले नाही. प्रत्येकाला घराजवळ कचरा डेपो नको आहे. मात्र जेवढा कचरा डेपो छोटा तेवढ्या लवकर कचऱ्यावर प्रक्रिया होईल. त्यामुळे दुर्गंधी पसरणार नाही. तसेच महापालिकेचे इंधन, वेळ व पैसे वाचतील. घंटा गाड्यांच्या फेऱ्या वाढतील. कर्मचारीही कमी नेमावे लागतील. मात्र यासाठी राजकीय इच्छा शक्ती लागेल.
आमच्या काळात अमृत पाणी योजनेचे काम 95 टक्के पूर्ण झाले. उर्वरित काम अजूनही रेंगाळलेले आहे. या कामाला वेग येणे आवश्यक आहे. हे काम झाल्यास शहराचा पाणी प्रश्न मार्गी लागेल. भाजपच्या कार्यकाळात नगर शहरात मोठे भरीव काम झाले. त्या कामाचा वेग राखला जायला हवा, अशी अपेक्षाही बाबासाहेब वाकळे यांनी व्यक्त केली.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.