भिलार : सगळेच बोलतात पण, राष्ट्रवादीचे मंत्री मोठ्या आवाजात बोलतात म्हणून त्यांच्यावर भाजप आकसाने ईडीच्या कारवाई करत आहेत, असा आरोप राज्याचे सहकार आणि पणन मंत्री बाळासाहेब पाटील यांनी केला आहे.
भिलार (ता. महाबळेश्वर) येथे एका कार्यक्रमानिमित्त श्री. पाटील आले असताना त्यांच्याशी पत्रकारांनी संवाद साधला. यावेळी जिल्हा बँकेचे संचालक राजेंद्र शेठ राजपुरे, स्ट्रॉबेरी ग्रोव्हर्स असोसिएशनचे अध्यक्ष नितीन दादा भिलारे, समन्वय समितीचे माजी अध्यक्ष प्रवीण भिलारे, बाजार समितीचे माजी सभापती राजेंद्र भिलारे उपस्थित होते.
यावेळी मंत्री बाळासाहेब पाटील यांना मंत्री नवाब मलिक यांच्यावरील ईडीच्या कारवाईबाबत छेडले असता ते म्हणाले, जे लोक अडचणीत आहेत, त्यांना पूर्णपणे टार्गेट केले जात आहे. ड्रॅग प्रकरणाच्या बाबतीत हे कसं चुकीचं आहे, हे दाखवण्यासाठी नवाब मलिक यांनी आवाज उठवल्याने त्यांना अडकविण्यासाठी ही कारवाई केली आहे.
ते म्हणाले, ''२२ ते २३ वर्षापूर्वी संबंधित जमिनी घेतलेल्या आहेत. मग याअगोदर देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होते. त्यावेळी त्यांनी का कारवाई केली नाही, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. फक्त आणि फक्त राष्ट्रवादीला अडचणीत आणण्याचा भाजपचा डाव असून तो आम्ही कदापी यशस्वी होवू देणार नाही. त्यामुळे आता नेत्यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही आंदोलन करून निषेध नोंदवला आहे, असे त्यांनी शेवटी सांगितले.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.