Satara, 26 July : विधान परिषदेचे माजी सभापती रामराजे नाईक निंबाळकर आणि ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांच्यातील विळ्या भोपळ्याचे नाते संपूर्ण महाराष्ट्राला सर्वश्रूत आहे. एकमेकांवर कुरघोडी करायची एकही संधी हे दोन्ही नेते सोडत नाहीत. दोघांमधील संघर्ष अत्यंत टोकाला पोचला होता. मात्र, सध्या दोघांनीही तलवारी म्यान केल्याचे दिसून येत आहे. रामराजेंनी ‘मी माझ्या तोंडाला सेन्सॉरशीप लावली आहे, ती कधी उठेल सांगता येत नाही. पण, ती जेव्हा उठेल, तेव्हा मी सर्व काही बोलेन’ असे स्पष्ट केले होते. त्याबाबत गोरेंनी मवाळ भूमिका घेत, ‘मी महाराजसाहेबांना सर्व अधिकार दिले आहेत,’ असे सांगून दोघांमधील वितुष्ट संपल्याचे स्पष्ट केले आहे.
सातारा जिल्ह्यातील रामराजे नाईक निंबाळकर (Ramraje Naik Nimbalkar) आणि जयकुमार गोरे हे एकमेकांचे कट्टर राजकीय विरोधक आहेत. दोघेही एकमेकांवर अत्यंत जहाल शब्दांत टीका करताना संपूर्ण सातारा जिल्ह्याने पाहिले आहे. मध्यंतरी जयकुमार गोरे खंडणी प्रकरणात निंबाळकर यांना चौकशीसाठी नोटीस पाठविण्यात आली होती. रामराजेंच्या घरी जाऊन पोलिसांनी चौकशी केली होती. याच प्रकरणातील महिला आरोपीशी त्यांच्या संभाषणाचा ऑडिओ व्हायरल झाला होता.
याच प्रकरणात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मध्यस्थी केल्याची चर्चा आहे. त्यानंतर गोरे आणि रामराजे या दोघांनी आपल्या तलवारी म्यान केल्याचे सांगितले जात आहे. तसे विधान खुद्द मंत्री गोरे यांनी केले होते. ‘ह्या जयकुमार गोरेंनं (Jaykumar Gore) आणि देवेंद्र फडणवीसांनी माफ केलं, नाही तर जेलमध्येच असता लक्षात राहू दे,’ असेही म्हटले होते. मात्र रामराजेंची भूमिका काहींशी मवाळच होती.
रामराजेंनी फलटणमधील एका कार्यक्रमात बोलताना ‘जयकुमार गोरेंचं आणि माझं काही वैयक्तीक भांडण नाही. मीच सगळं करतो, असे त्यांच्या मनात आहे. पण देव करो आणि त्यांना सदबुद्धी देवो. त्यांनी मंत्री व्हावं, गरिबांसाठी काम करावं. एवढंच माझं त्यांना सांगणं आहे. माझं वय वाढलेले आहे, त्यामुळे माझा तेवढं तर सांगण्याचा अधिकार आहे’ असेही स्पष्ट केले होते.
गोरे यांच्या मनात माझ्याविषयी जी अढी निर्माण झालेली आहे. त्या विषयी त्यांना सांगण्याचा प्रयत्न केला. ते योग्य वेळी सांगेन. पण सध्या मी माझ्या तोंडाला सेन्सॉरशिप लावलेली आहे. पण, ती कधी उठेल, सांगता येत नाही. योग्य वेळी ती सेन्सॉरशीप उठेल आणि त्या वेळी सगळं बोललं जाईल,’ असेही रामराजेंनी म्हटलं होतं. नेमकं ह्याच विधानावरून गोरेंना प्रश्न विचारला असता त्यांनी नरमाईची भूमिका घेतल्याचे दिसून आले.
गोरे यांनी, ‘आता महाराजसाहेबांना (रामराजे नाईक निंबाळकर) सगळे अधिकार मी बहाल केलेले आहेत. त्यांच्या वयाच्या हिशेबाने,या वयात त्यांना त्रास होऊ नये, अशी व्यवस्था आपण करूयात, असे म्हटले आहे. त्यामुळे सातारा जिल्ह्यातील रामराजे नाईक निंबाळकर आणि ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांच्यातील जानीदुश्मनी मिटल्याचे स्पष्ट संकेत मिळत आहेत.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.