nagawade karkhana.jpg
nagawade karkhana.jpg sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

सर्वांच्याच तोंडी बापूंचे नाव, मग बिनविरोधला कोण आडवा येतो राव?

संजय आ. काटे

श्रीगोंदे ( अहमदनगर ) : श्रीगोंद्यातील नागवडे सहकारी साखर कारखान्याची निवडणूक प्रक्रिया सुरू झाली आहे. सध्या वातावरणात थंडी वाढली असली, तरी या निवडणुकीची राजकीय हवा मात्र तापली आहे. Everyone's name is Bapu's word, then who opposes unopposed

शिवाजीराव बापू नागवडे यांच्या आठवणींवर सध्या दोन्ही बाजूंनी भर दिला जात आहे. बापू हयात नसले, तरी निवडणूक त्यांच्याच नावाभोवती फिरणार, हे नक्की. ज्यांच्या नावाचा वापर होतोय, त्यांचा त्याग, संघर्ष सध्याचे नेते विसरले असून, सभासद आणि बापूंसाठी तरी एवढी निवडणूक बिनविरोध व्हावी, या सामान्यांच्या इच्छेचा आदर सर्वांनीच ठेवायला हवा.

पन्नास वर्षांपूर्वी ज्या श्रीगोंदा सहकारी साखर कारखान्याची निर्मिती झाली, त्या कारखान्याच्या कारभाराची सध्या जोरात चर्चा सुरू आहे. (कै.) बाबूराव तनपुरे, माजी मंत्री (कै.) आबासाहेब निंबाळकर, शिवाजीराव नागवडे या नेत्यांची सोबत करणाऱ्या तत्कालीन कार्यकर्त्यांनी एकत्र येत हा कारखाना उभारला. गेली अनेक वर्षे श्रीगोंदा कारखाना हाच तालुक्यातील बागायती भागाची खरी कामधेनू ठरला. कुणी काहीही म्हणाले, तरी शिवाजीराव नागवडे यांनी दूरदृष्टी ठेवून कारखाना चालविला. पारदर्शी कारभार, काटकसर करताना स्वहितासाठी कधीच कारभारातील परखडपणा सोडला नाही. यातून शेतकऱ्यांचे प्रपंच उभे राहिले. कारखान्याच्या माध्यमातून शिक्षण संस्था उभी करून त्यांनी गावातील मुलांना शहरातील आलिशान जगाचे स्वप्न नुसते दाखविलेच नाही, तर ते खरेही केले.

याच बापूंच्या नावावर सध्या सत्ताधारी व विरोधक असे दोन्ही गट मते मागण्यासाठी सरसावले आहेत. बापूंचे चिरंजीव राजेंद्र नागवडे यांच्याकडे कारखान्याची सत्ता आहे, तर एके काळचे बापूंचे खंदे समर्थक केशवराव मगर त्यांच्या विरोधात दंड थोपटण्याच्या तयारीत आहेत. हे दोघेही अर्थात बापूंचा कारभार कसा चांगला होता व त्यांचेच आम्ही कारभारातील वारस कसे, हे सभासदांना पटवून देणार आहेत.

यात वावगे काही नाही. राजेंद्र तर पुत्रच असल्याने, खरे वारसदार तेच आहेत. केशवराव यांनी उभे आयुष्य बापूंसोबत घातल्याने त्यांचाही हक्क आहे. मात्र, ज्यांनी अनेक वर्षे बापूंना विरोध केला, तेही बापूंचेच नाव घेऊन निवडणुकीत उतरणार आहेत, ही वस्तुस्थिती सभासद जाणून आहेत.

बापूंच्या नावाचा निवडणुकीत वापर व्हावा, मात्र त्यांनी केलेला त्याग, संघर्ष यांची आठवण ठेवावी लागेल. देशाचे नेते शरद पवार, महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी दोनच दिवसांपूर्वी बापूंचा जीवनपट उलगडून सांगताना, बापू म्हणजे साखर कारखानदारीतील पुढाऱ्यांचे इंजिनिअर होते, असेच म्हटले आहे. दिवसभर कारखान्यात उभे राहून यंत्रांचा बिघाड दाखविणारे बापू आज नसले, तरी त्यांच्या आठवणी त्या प्रत्येक यंत्रात दडल्या आहेत याचे भान ठेवून, कारखान्यात राजकारण करणाऱ्या सगळ्यांनीच आत्मपरीक्षण करणे आवश्यक आहे.

एक पाऊल मागे कोण येणार? राजेंद्र नागवडे यांनी कसा कारभार केला, केशवराव मगर कुठे चुकले, ही गणिते निवडणूक लागल्यावर प्रचारसभेत काढावीत. त्यासाठी अजून वेळ आहे. त्या बापूंसाठी तरी सगळ्यांनी निवडणूक बिनविरोध करण्याचा प्रयत्न करायला काय हरकत आहे? बापू गेल्यानंतरची ही पहिली निवडणूक आहे. तालुक्यातील प्रमुखांनी यात पुढाकार घेऊन बिनविरोधचा प्रयत्न केला, तर यश येऊ शकते. त्यासाठी कोणी एक पाऊल मागे राहायचे, हा ज्याचा-त्याचा भाग असला, तरी बापूंसाठी ही निवडणूक बिनविरोध व्हावी, अशी अनेक सुज्ञ सभासदांची इच्छा आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT