Radhakrishna Vikhe Patil
Radhakrishna Vikhe Patil Paresh Kapase
पश्चिम महाराष्ट्र

नगर जिल्ह्यातून फक्त राधाकृष्ण विखेंनाच निरोप : पाचपुते, शिंदे गॅसवर!

अमित आवारी

अहमदनगर - राज्यात शिंदे गट व भाजप युती सरकारमधील मंत्रीमंडळ विस्ताराला अखेर मुहूर्त मिळाला आहे. उद्या ( मंगळवारी ) दुपारी 12 वाजता मुंबईत नवीन मंत्र्यांचा शपथ विधी होणार आहे. काही दिवसांपूर्वी भाजपचे ज्येष्ठ नेते शिवाजी कर्डिले ( Shivaji Kardile ) यांनी भाकीत वर्तविले होते की, अहमदनगर जिल्ह्यातील भाजपचे तीन आमदार मंत्री होतील. मात्र मंत्रिमंडळाच्या पहिल्या टप्प्यातील विस्तारासाठी जिल्ह्यातील केवळ एकाच आमदाराला निरोप आला आहे. ती संधी मिळाली कर्डिलेनी सांगितलेल्या तीन पैकी एक आमदार असलेल्या राधाकृष्ण विखे पाटील ( Radhakrishna Vikhe Patil ) यांनाच. त्यांना जिल्ह्याचे पालकमंत्रीपद मिळेल, अशी चर्चाही आता सुरू झाली आहे.

राज्यातील शिवसेनेत दोन गट पडल्याने महाविकास आघाडी सरकार अस्थिर झाले होते. त्यावेळी अहमदनगर शहरातील भाजपच्या एका कार्यक्रमात कर्डिले यांनी भाकीत वर्तविले होते. त्यानुसार राधाकृष्ण विखे पाटील, राम शिंदे व मोनिका राजळे या मंत्री होतील असे त्यांनी सांगितले होते. मुंबईमधील भाजपच्या एका बैठकीतही कर्डिले यांनी अहमदनगर जिल्ह्याला तीन मंत्रिपदे देण्याचा आग्रह धरला होता. कर्डिले यांनी श्रीगोंद्याचे आमदार बबनराव पाचपुते यांच्याविषयी बोलताना त्यांची तब्बेत ठिक झाल्यावर त्यांचाही विचार होऊ शकतो असे सांगितले होते. मात्र त्यांनी मंत्रिपदाच्या यादीत पाचपुते यांचे नाव घेतले नव्हते.

राज्यात सत्ता परिवर्तन होऊन एक महिना झाला तरी मंत्रिमंडळ विस्तार झालेला नाही. मंत्रिमंडळ विस्ताराचे दोन मुहूर्त टळल्याने विरोधकांकडून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका होत होती. या पार्श्वभूमीवर आज दुपारी अचानक मंत्रीमंडळाचा पहिल्या टप्प्यातील विस्ताराची घोषणा झाली. यात भाजपकडून राधाकृष्ण विखे पाटील, चंद्रकांत पाटील, सुधीर मुनगंटीवर व गिरीश महाजन यांना मंत्रिपदाची शपथ उद्या दिली जाणार असल्याचा निरोप पक्ष श्रेष्ठींकडून आला आहे. मात्र कर्डिले यांनी नाव सुचविलेल्या राम शिंदे व मोनिका राजळे यांना अजूनही निरोप आलेला नाही. त्यामुळे हे नेते प्रतीक्षा यादीत असल्याची चर्चा आहे.

राम शिंदे हे देवेंद्र फडणवीस यांचे निष्ठावान समर्थक मानले जातात. विधानसभा निवडणुकीत त्यांचा राष्ट्रवादीचे युवा नेते रोहित पवार यांनी पराभव केला. शिंदे यांना विधानपरिषदेत घेऊन जिल्ह्यातील भाजपची ताकद वाढवावी अशी मागणी भाजप नेते व कार्यकर्त्यांकडून होत होती. अखेर त्यांना विधानपरिषदेवर घेण्यात आले. ते आमदार होताच राज्यात सत्ता आली म्हणून त्यांचा पायगुण चांगला आहे. ते मंत्री होतील असे, त्यांचे समर्थक सांगत आहेत.

विखे पाटलांनी यापूर्वी कृषी, परिवहनसारख्या महत्त्वाच्या खात्यांचा पदभार पाहिला आहे. ते राज्याचे विरोधी पक्षनेतेही होते. त्यामुळे त्यांना प्रशासनाचा दीर्घ अनुभव आहे. सार्वजनिक बांधकाम, जलसंधारण अथवा पाटबंधारे विभागाचा पदभार त्यांच्यावर सोपविला जाऊ शकतो अशी चर्चा आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT