Solapur Sugar Sector Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Solapur Sugar Sector : भाजप नेत्यांच्या तीन, तर काँग्रेसच्या माजी मंत्र्याच्या एका कारखान्याला साखर आयुक्तांचा दणका; विनापरवाना गाळप भोवले

sugar commissioner Action : विना परवाना गाळप हंगाम सुरू करण्याचे धाडस राज्यात केवळ सोलापूर जिल्ह्यातील साखर काखान्यांनीच दाखवले आहे. शेतकऱ्यांबरोबरच शासकीय देणी थकविण्यात भाजपचेच कारखानदार आघाडीवर असल्याचे दिसून येते.

Vijaykumar Dudhale

Solapur, 07 February : विना परवानगी गाळप हंगाम सुरू केल्याने सोलापूर जिल्ह्यातील चार साखर कारखान्यांना तब्बल २० कोटी ३२ लाख २५ हजार रुपयांच्या दंडाची नोटीस साखर आयुक्त कार्यालयातून बजावण्यात आली आहे. यामध्ये भारतीय जनता पक्षाशी संबंधित तीन साखर कारखाने असून एक कारखाना काँग्रेसच्या माजी मंत्र्याशी संबंधित आहे. या कारवाईमुळे सोलापूर जिल्ह्यातील सहकार क्षेत्रात एकच खळबळ उडाली आहे.

दंडाची नोटीस बजावलेल्या साखर कारखान्यांमध्ये (Sugar Factory) मंगळवेढ्यातील संत दामाजी सहकारी साखर कारखाना, मोहोळ तालुक्यातील टाकळी सिकंदर येथील भीमा सहकारी साखर कारखाना, अक्कलकोट तालुक्यातील मातोश्री लक्ष्मी शुगर आणि गोकुळ शुगर यांचा समावेश आहे. यामध्ये सर्वाधिक दहा कोटी २२ लाख ५० हजार रुपये दंड हा संत दामाजी साखर कारखान्याला करण्यात आलेला आहे.

गोकुळ शुगर या कारखान्याला पाच कोटी ७० लाख ९७ हजार पाचशे रुपये, भीमा सहकारी साखर कारखान्याला (Bhima Sugar Factory) तीन कोटी १३ लाख ९७ हजार पाचशे रुपये, तर मातोश्री लक्ष्मी या साखर कारखान्याला एक कोटी २४ लाख ८० हजार रुपये दंड आकारण्यात आलेला आहे, त्यामुळे या कारखान्यांपुढे आता नवा पेच निर्माण झाला आहे.

विना परवाना गाळप हंगाम सुरू करण्याचे धाडस राज्यात केवळ सोलापूर जिल्ह्यातील साखर काखान्यांनीच दाखवले आहे. मंगळवेढ्यातील संत दामाजी कारखाना हा भाजपच्या माजी आमदाराच्या समर्थकांच्या ताब्यात आहे, तर पंढरपुरातील भीमा कारखाना हा भाजपच्या राज्यसभेच्या खासदाराचा आहे. अक्कलकोटमधील गोकुळ शुगर हा कारखाना भाजपच्या माजी जिल्हाध्यक्षाच्या मुलाच्या ताब्यात आहे, तर अक्कलकोटमधील मातोश्री लक्ष्मी शुगर हा काँग्रेसच्या माजी मंत्र्यांच्या नेतृत्वातील आहे, त्यामुळे शेतकऱ्यांबरोबरच शासकीय देणी थकविण्यात भाजपचेच कारखानदार आघाडीवर असल्याचे दिसून येते.

सोलापूर जिल्ह्यातील या चार साखर कारखान्यांनी गेल्या हंगामातील उसाची बिले दिली नाहीत, त्यातच आता साखर आयुक्तांनी दंड ठोठावला आहे, त्यामुळे नव्याने गाळप झालेल्या उसाचे बिल कधी मिळणार, असा सवाल निर्माण झाला आहे. त्यामुळे या हंगामात गाळप झालेल्या ऊस उत्पादक शेतकऱ्यांसमोर नवा पेच निर्माण झाला आहे.

शेतकऱ्यांच्या गाळप केलेल्या उसाचे बिल थकविणे, तोडणी-वाहतूक आणि शासकीय देणी न देणे या कारणांमुळे सोलापूर जिल्ह्यातील चार साखर कारखान्यांना साखर आयुक्तांनी गाळप परवाना नाकारला होता. त्यानंतरही संबंधित चार कारखान्यांनी साखर आयुक्तांची परवानगी नसतानाही गाळप हंगाम सुरू केला आहे. त्यामुळे संबंधित चार साखर कारखान्यांना आयुक्त कार्यालयाने दंडाची नोटीस बजावली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT