Dhananjay Mahadik, Hasan Mushrif, Satej Patil sarkaranama
पश्चिम महाराष्ट्र

Vishalgad Encroachment : विशाळगडावरून महायुतीचा सतेज पाटलांना वेढा, 'त्या' वक्तव्यावरून कोल्हापुरातलं राजकारण तापलं

Rahul Gadkar

Kolhapur News, 20 July : विशाळगडाच्या पायथ्याला जमावाने केलेल्या हिंसाचारानंतर राज्यातील विरोधकांनी महायुती सरकारला लक्ष केलं आहे. या हिंसाचाराला भाजप जबाबदार असल्याचा आरोप महाविकास आघाडीतील नेत्यांकडून केला जात आहे.

मात्र त्याचं ताकतीने महायुतीच्या नेत्यांनी कोल्हापुरातील (Kolhapur) स्थानिक राजकारण लक्षात घालत विशाळगडाच्या घटनेवरून काँग्रेस आमदार सतेज पाटील यांना वेढा घातला आहे. घटनेनंतर तीन दिवसानंतर बोलताना पालकमंत्री हसन मुश्रीफ, राज्यसभेचे खासदार धनंजय महाडिक आणि खासदार धैर्यशील माने यांनी कोणताही मुलाहिजा न ठेवता थेट त्यांच्या चौकशीची मागणी केली आहे.

आमदार सतेज पाटील (Satej Patil) यांनी दीड महिन्यांपूर्वी कोल्हापुरात विधानसभेच्या आधी राज्यात दंगल घडविण्याचा डाव भाजपचा असू शकतो, असे विधान केले होते. त्या वक्तव्यावरून सध्या जिल्ह्यातील राजकारण पुन्हा एकदा तापले आहे. विशाळगडच्या घटनेवरून राज्यातील महायुती आणि महाविकास आघाडीमध्ये आरोप-प्रत्यारोपांचा खेळ सुरू आहे.

अशातच पाटील यांनी दीड महिन्यापूर्वी केलेल्या वक्तव्यानंतर महायुतीतील नेत्यांनी त्यांच्या चौकशीची मागणी केली आहे. प्रत्यक्ष-अप्रत्यक्षपणे त्यांच्यावर आरोप करत आणि स्थानिक राजकारण डोळ्यासमोर ठेवून त्यांनाच चौकशीच्या फेऱ्यात अडकवण्याची रणनीती आखली जात आहे. घटनेनंतर तीन दिवसानंतर एकापाठोपाठ एक अशा तीन पत्रकार परिषद घेत सतेज पाटील यांच्या चौकशीची मागणी केली आहे.

पालकमंत्री हसन मुश्रीफ (Hasan Mushrif) यांनी प्रतिक्रिया देताना म्हणाले, कोल्हापुरात वारंवार घडणाऱ्या दंगलीबाबत सर्वांच्याच चौकशीची गरज असल्याचं म्हटलं. त्यामुळे त्यांचा सतेज पाटील यांनी दंगलीबाबत केलेल्या वक्तव्यावकडे रोख असल्याचं स्पष्ट होत आहे. त्यामुळे सतेज पाटील चौकशीच्या फेऱ्यात येण्याची शक्यता आहे.

राज्यसभेचे खासदार धनंजय महाडिक (Dhananjay Mahadik) यांनी देखील पाटील यांच्यावर निशाणा साधला, माजी पालकमंत्री हे अतिक्रमण केलेल्या लोकांना मदत करायला गेल्याचं ढोंग करत आहेत. ते मागेच दंगल होणार दंगल होणार असल्याचं म्हणाले होते. या सगळ्या वक्तव्याची चौकशी झाली पाहिजे. अशी मागणी त्यांनी केली आहे.

तर खासदार धैर्यशील माने यांनी हल्लेखोर कुठून आले? ते कोण होते? याची चौकशी झाली पाहिजे. तसंच दंगल होणार असं वक्तव्य ज्यांनी केली त्यांची ही चौकशी झाली पाहिजे, अशी मागणी केली. वास्तविक पाहता महायुतीतील नेत्यांपेक्षा काँग्रेसचे नेते आमदार सतेज पाटील यांची राजकीय स्थिरता दिवसेंदिवस घट्ट व वरचढ ठरत आहे. त्याचा प्रत्यय लोकसभा निवडणुकीत पाहायला मिळाला. आगामी विधानसभा निवडणूक डोळ्यासमोर ठेवून त्यांनाच वेडा देण्याची रणनीती महायुतीतील नेत्यांनी आखल्याच दिसत आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT