Nitin Gadkari
Nitin Gadkari Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Nitin Gadkari: माझे शब्द लिहून ठेवा, उसामुळे एकदिवस आत्महत्येची वेळ येईल..

सरकारनामा ब्यूरो

सोलापूर : दिवसेंदिवस वाढत्या ऊस (Cane) उत्पादनावर आणि सोलापूर जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात होणाऱ्या ऊसाच्या गाळपाबाबत भाजप (BJP) नेते आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांनी चिंता व्यक्त केली आहे. ऊसाचं क्षेत्र जर असेच दिवसेंदिवस वाढत राहिले आणि लोकही उसाच्याच पाठीमागे लागले, तर एकदिवस आत्महत्या करण्याची वेळ येईल, हा माझा शब्द लिहून ठेवा, असा इशारा गडकरी यांनी दिला आहे. आज (ता. 25 एप्रिल) सोलापूर येथे १० राष्ट्रीय महामार्ग प्रकल्पांचे उद्घाटन त्यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी त्यांनी उसाच्या वाढत्या उत्पादनाबाबत आपले मत व्यक्त केले.

गडकरी म्हणाले, सोलापूर जिल्हा हा एकेकाळी दुष्काळी जिल्हा होता. मला आता आमदार बबनदादा शिंदे सांगत होते, यंदा जिल्ह्यात २२ लाख टन उसाचे गाळप झाले आहे. इतक्या मोठ्या प्रमाणात उसाची लागवड होत राहिली तर एक दिवस आत्महत्या करण्याची वेळ येईल. माझ्याकडे दोन दिवसांपूर्वी ब्राझीलचे शिष्टमंडळ आले होते. तिथे दुष्काळ पडल्याचे ते सांगत होते. तिथे दुष्काळ म्हटल्याबरोबर बबनदादा शिंदे हसले खरे पण ब्राझीलमध्ये जर साखर वाढली तर २२ रुपये सारखेचा भाव होईल आणि तुम्हाला ऊसाचा भाव कमी करता येणार नाही. कारण तुम्हाला राजकारण करायचंय. तुम्हाला आता आहे तेवढाच भाव द्यावा लागणार. मग त्यावळी काय स्थिती होईल, ते बघा, असे मत गडकरींनी व्यक्त केले.

मागच्यावेळी सोलापूरला आल्यानंतर बऱ्याच घोषणा केल्या होत्या त्यातील बऱ्याच घोषणा आज पूर्ण झाल्या आहेत. मागच्या वेळी सोलापूर शहरामध्ये राष्ट्रीय महामार्गाची लांबी 1620 किमी होती आणि 2014 नंतर आता एकुण लांबी 1700 किमी झाली आहे. मागच्या सात वर्षांमध्ये सोलापूर जिल्ह्यातील राष्ट्रीय महामार्गाच्या लांबीत 173 टक्के वाढ झाली आहे. 37 हजार 25 कोटींची 32 काम मंजूर झाली असून 12 काम पूर्ण झाली आहेत. 2464 कोटींची प्रस्तापित कामांना पकडून 60 हजार कोटी रुपयांची काम जिल्ह्यात होणार आहेत. महाराष्ट्रात सर्वात जास्त काम सोलापूर जिल्ह्यामध्ये असतील तसेच अहमदपूर-सोलापूर - टेम्भूर्णी 60 किमीच्या राष्ट्रीय महामार्गची पुढल्या चार महिन्यात कामाला सुरुवात होईल, अशी घोषणाही गडकरींनी यावेळी केली.

दरम्यान, आज सोलापूर येथे ८,१८१ कोटी रुपये किंमतीच्या व २९२ किमी लांबीच्या १० राष्ट्रीय महामार्ग प्रकल्पांचे उद्घाटन गडकरींच्या हस्ते करण्यात आले. सोलापूरला देशाच्या मुख्य प्रवाहात आणण्याची क्षमता असलेले हे रस्तेप्रकल्प सोलापूरकरांचे जीवन सुखी-समृद्ध व विकसित करण्यासाठी महत्वाचे ठरतील तसेच या यामुळे शहरातील वाहतूक सुरळीत होऊन अपघातांचे प्रमाण आणि पर्यावरण प्रदूषण कमी होईल. याबरोबरच जिल्ह्यातील ग्रामीण भागांनाही शहराशी जोडणे सोपे होईल, असेही मत गडकरींनी यावेळी व्यक्त केले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT