Union Minister Nitin Gadkari
Union Minister Nitin Gadkari  Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

अहमदनगर जिल्ह्यातून पेट्रोल-डिझेलला हद्दपार करा

सरकारनामा ब्युरो

अहमदनगर - भाजपचे ज्येष्ठ नेते, माजी मंत्री मधुकरराव पिचड ( Madhukarrao Pichad ) यांच्या अभिष्टचिंतन सोहळा आज अकोले तालुक्यात मोठ्या उत्साहात झाला. या कार्यक्रम प्रसंगी केंद्रीय रस्तेबांधणी मंत्री नितीन गडकरी ( Nitin Gadakari ) यांनी अहमदनगर जिल्ह्यातील साखर सम्राटांना, "अहमदनगर जिल्ह्यात पेट्रोल-डिझेलला हद्दपार करा, शेतकऱ्यांचा पेट्रोलचा खर्च वाचवा. शेतकरी फक्त अन्नदाता नाही तर ऊर्जा दाता बनला पाहिजे," असे आवाहन केले. ( Get rid of petrol-diesel from Ahmednagar district )

या अभिष्टचिंतन सोहळ्याला माजी मंत्री मधुकरराव पिचड, भाजपचे ज्येष्ठ नेते आमदार राधाकृष्ण विखे पाटील, खासदार डॉ. सुजय विखे पाटील, आमदार मोनिका राजळे, माजी आमदार स्नेहलता कोल्हे, बाळासाहेब मुरकुटे, वैभव पिचड, जिल्हा परिषद सदस्य जालिंदर वाकचौरे, अकोले नगरपंचायतच्या नगराध्यक्षा सोनाली नायकवाडी, शिर्डीचे माजी नगराध्यक्ष राजेंद्र गोंदकर, शिवाजीराव धुमाळ, भाऊसाहेब वाकचौरे आदी उपस्थित होते.

नितीन गडकरी म्हणाले, "देशात साखरेचे प्रमाणापेक्षा जास्त उत्पादन झाले आहे. ऊस हे हमखास नफा देणारे पीक आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचा या पिकाकडे कल वाढला आहे. त्यामुळे साखर कारखान्यांनी साखरेपासून इथेनॉल तयार करावे. इथेनॉल विकले तरच साखर कारखाने टिकतील. पुढच्या महिन्यापासून फ्लेक्स फ्युएल इंजिन असलेल्या स्कुटर, रिक्षा, ट्रक, कार, बस बाजारात येणार आहेत. या संपूर्ण इथेनॉलवर चालू शकतील अथवा इथेनॉल व पेट्रोलच्या मिश्रणावर चालतील. इथेनॉलची किंमत पेट्रोलच्या निम्मी आहे. शिवाय दोन्ही इंधनातून वाहनांना सारखेच अॅव्हरेज मिळेल. इथेनॉलमधून प्रदुषण होणार नाही. त्यामुळे इथेनॉलची मोठ्या प्रमाणात मागणी वाढणार आहे. त्यामुळे मी अहमदनगर जिल्ह्याला इथेनॉल पेट्रोल पंप मिळवून देतो. अहमदनगर जिल्ह्यातून पेट्रोल-डिझेल हद्दपार करा," असे आवाहन त्यांनी केले.

ते पुढे म्हणाले की, "भारतात शेतीसाठी पोटॅशियम खतांची मागणी आहे. त्यासाठी आवश्यक पोटॅश आपल्याला आयात करावे लागते. इथेनॉल तयार करताना स्पेंटवॉश हे बॉयलरमध्ये जाळल्यावर पोटॅश निघते. हे साखर कारखान्यांत तयार होणारे पोटॅशही सरकार 30 ते 32 रुपयांना विकत घेईल. त्यातून कारखान्यांचे उत्पन्न वाढेल," असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

"शेतकऱ्यांच्या इथेनॉलवर वाहने चालतील. इथेनॉल ग्रीन फ्युएल आहे. त्यामुळे प्रदुषणापासून मुक्ती मिळेल. शेतकरी अन्नदाता नाही तर ऊर्जादाता बनला पाहिजे. आदिवासी भागात तांदूळ पिकतो. त्यातून बायो सीएनजी, बायो एलएनजी तयार करता येतो. माझा ट्रॅक्टर बायो सीएनजीवर चालतो. आता भविष्यातील बदलानुसार आपला दृष्टिकोन बदलावा लागेल. वैभव पिचड व डॉ. सुजय विखे पाटील यांच्या सारख्या युवा नेत्यांनी आदिवासी, शेतकऱ्यांना संपन्न करण्याचे मिशन हाती घ्यावे. नवीन व्हिजन घेऊन चालले तर महाराष्ट्र सुखी, समृद्ध होईल," असे मत त्यांनी व्यक्त केले.

नगर-शिर्डी रस्त्याच्या बंद कामावर उपाय

"पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाला मी 36 तलाव फुकट बांधून दिले. रस्त्यांचे काम करताना माती लागते. तलाव खोदले, माती रस्त्यासाठी वापरली. यातून 36 तलाव झाले. यातून 8 हजार एकर जमीन पाण्याखाली आली. तेथील शेतकरी समृद्ध झाला. नगर-शिर्डी रस्त्याचे काम बंद पडले कारण हरीत लवादाने सांगितले की माती मिळणार नाही. माती नाही मग रस्ता कसा तयार करायचा. माझी विनंती आहे की, तुम्ही अपिल करा आणि सांगा नितीन गडकरी व त्यांचे मंत्रालय फुकटात तलाव बांधून द्यायला तयार आहे. नदी नाल्यांचे खोलीकरण करायला तयार आहे. जर नगर जिल्ह्यात 85 टक्के सिंचन झाले तर तुमचे 90 टक्के प्रश्न सुटतील," असा विश्वासही मंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्त केला.

निळवंडेचे काम पाहून आनंद

"मी जलसंपदा मंत्री असताना निळवंडे धरणाच्या कामाला मान्यता दिली होती. आजच्या कार्यक्रमाला येताना मी हेलिकॉप्टरमधून पाहिले. कॅनॉलचे काम सुरू असल्याचे पाहून आनंद वाटला. अनेक वर्षांपासून हे काम प्रलंबित होते. आता तुमच्या भागात पाणी येणार आहे," असे सांगत मंत्री गडकरी यांनी निळवंडेच्या कामाबाबत समाधान व्यक्त केले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT