Balasaheb Patil, Makrand Patil
Balasaheb Patil, Makrand Patil sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

महाबळेश्वरातील निर्बंध हटवण्यासाठी पालकमंत्री, आमदारांची सचिवांकडे धाव

अभिजित खुरासणे

महाबळेश्वर : कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्य शासनाने पर्यटनस्थळांवर निर्बंध लावल्यामुळे महाबळेश्वर परिसरातील सर्वच पॉईंट हे पर्यटकांसाठी बंद करण्यात आले आहेत. पॉईंट पुन्हा सुरू करण्यासाठी येथील व्यावसायिकांच्या शिष्ठमंडळाने पालकमंत्री व जिल्हाधिकारी शेखर सिंह यांची भेट घेतली. मात्र, मागण्या मान्य करण्यासाठी जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी असमर्थता दर्शवल्यानंतर पालकमंत्री बाळासाहेब पाटील व आमदार मकरंद पाटील यांनी उद्या (बुधवारी) राज्याचे अतिरिक्त सचिव असीम गुप्ता यांची भेट घेऊन पॉईंटवरील निर्बंध शिथिल करण्यासाठी प्रयत्न करण्याचा निर्णय घेतल्याची माहिती माजी नगराध्यक्ष डी. एम. बावळेकर यांनी दिली.

महाबळेश्वर येथील पॉईंट बंद करण्यात आल्याने महाबळेश्वर हे पर्यटनस्थळ खुले असले तरी, पर्यटक या पर्यटन स्थळाकडे पाठ फिरविण्याचा धोका वाढला आहे. असे झाले तर महाबळेश्वर या थंड हवेचे ठिकाणी लॉकडाउनसारखी परिस्थिती ओढवणार आहे. असे झाले तर येथील सर्वच उद्योग व्यवसायावर विपरीत परिणाम होणार आहे म्हणून आमदार मकरंद पाटील यांच्या नेतृत्वाखाली महाबळेश्वर येथील विविध व्यावसायिकांचे एक शिष्टमंडळाने पालक मंत्री व जिल्हाधिकारी शेखरसिह यांची भेट घेतली व महाबळेश्वरकरांची कैफियत त्यांच्या समोर मांडली.

शिष्ठमंडळाच्या भेटीप्रसंगी खासदार श्रीनिवास पाटील, जिल्हा बॅंकेचे संचालक राजेंद्र राजपुरे, पंचायत समितीचे सभापती संजय गायकवाड, तौफिक पटवेकर, टॅक्सी संघटनेचे अध्यक्ष अंकुश बावळेकर, सी. डी. बावळेकर, रमेश चोरमले, अनिल केळगणे, अभय डोईफोडे आदी मान्यवर उपस्थित होते. पर्यटकांची गर्दी होणार नाही, याची प्रशासनाने जबाबदारी घ्यावी. ज्यांनी कोरोना लसीचे दोन डोस घेतले आहेत. अशाच पर्यटकांना महाबळेश्वर व पाचगणी या शहरात सोडावे, शहरातील हॉटेल ही ५० टक्के क्षमतेनेच भरली जातात.

त्याच प्रमाणे विविध पॉईंटवरदेखील ठराविक पर्यटकांनाच प्रवेश देण्यात यावा, नौका विहारासाठी देखील वेण्णालेक येथे पालिकेने २५ टक्केच बोटी सुरू ठेवाव्यात. म्हणजे कोणत्याही ठिकाणी गर्दी होणार नाही आणि कोरोनाचा प्रादुर्भाव वाढणार नाही. असे केले तरच पर्यटन स्थळावरील नागरीक जगेल अन्यथा पुन्हा महाबळेश्वरकरांवर उपासमारीची वेळ आल्या शिवाय राहणार नाही, अशी माहिती आमदार मकरंद पाटील यांनी जिल्हाधिकारी सिंह यांना दिली.

यापूर्वी महाबळेश्वर येथे दोन वेळा लॉकडाउन लावण्यात आला होता. त्यामुळे महाबळेश्वर येथील अनेक नागरिक कर्जबाजारी झाले आहेत. कर्ज देणाऱ्या बॅंकादेखिल थकीत कर्जदारांमुळे अडचणीत आल्या आहेत. अनेक बॅंकांनी कर्जदारांच्या मिळकतीचा लिलाव सुरू केले आहेत. या दृष्टचक्रातुन सर्वसामान्य व्यवसायिकांना वाचविण्यासाठी पॉईंटवरील निर्बंध शिथील करावे, अशी मागणी माजी नगराध्यक्ष डी. एम. बावळेकर यांनी केली. महाबळेश्वरकरांच्या मागण्या मान्य करण्यासाठी जिल्हाधिकारी सिंह यांनी असमर्थता दर्शवल्यानंतर पालकमंत्री बाळासाहेब पाटील व आमदार मकरंद पाटील हे अतिरिक्त सचिव गुप्ता यांची उद्या (बुधवारी) भेट घेऊन पॉईंटवरील निर्बंध शिथिल करण्यासाठी प्रयत्न करणार आहेत, अशी माहिती माजी नगराध्यक्ष बावळेकर यांनी दिली.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT