Vrushali Kadalag
Vrushali Kadalag Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

'गुरुमाऊलीच्या नेत्यांनी व संचालकांनी बँकेची इभ्रत घालवली'

दौलत झावरे

अहमदनगर : अहमदनगर जिल्हा प्राथमिक शिक्षक बँकेतील अध्यक्ष, उपाध्यक्ष पदाची निडणूक झाली तरीही सत्ताधारी व विरोधकांतील आरोप-प्रत्यारोप सुरुच आहेत. गुरुकुल संघटना महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्षा वृषाली कडलग यांनी प्रसिद्धीपत्रक काढून विरोधकांवर आरोप केले आहेत. हे आरोप जिल्ह्यातील प्राथमिक शिक्षकांत राजकीय चर्चेचा विषय ठरत आहेत. 'Gurumauli leaders and directors discredit bank'

वृषाली कडलग यांनी प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे की, शिक्षक बँकेचे अध्यक्ष, उपाध्यक्षपद मिळवण्यासाठी संचालक मंडळाने अक्षराश: उच्छाद मांडला आहे. गुरुमाऊलीच्या संचालक मंडळाने व त्यांचे नेते म्हणवून घेणार्‍यांनी शिक्षक बँकेची इभ्रत घालवली आहे. असा आरोप गुरुकुल मंडळाचे अध्यक्ष सुदर्शन शिंदे, गुरुकुलचे संपर्कप्रमुख संतोष भोपे, सुखदेव मोहिते, शिवाजी रायकर यांनी केला आहे.

रोहकले गट, तांबे गट, आबा जगताप गट अशी गुरुमाऊलीची तीन शकले झाली आहेत. कुणाचा पायपोस कुणात राहिलेला नाही. पहिले साडेतीन वर्ष रोहकले यांनी अध्यक्षपद भोगल्याने पुढे सारी समीकरणे बदलली. तांबे गटाने पहिल्या साडेतीन वर्षांपेक्षा आमचा दीड वर्षाचा कारभार चांगला आहे असा दावाही कडलग यांनी केला.

त्यांनी पुढे म्हटलं आहे की, त्याउलट साडेतीन वर्ष आम्ही कारभार चांगला केल्याची आवई दुसर्‍या गटाने उठवली. आता या दीड वर्षाला नावे ठेवणार्‍या साडेतीन वर्षावाल्यांनी पुन्हा अध्यक्षपद ताब्यात घेतले आहे. दीड वर्षातील अनेक निर्णयाला बँकेच्या विद्यमान अध्यक्षांच्या नेत्यांनी कडाडून विरोध केला होता.

शिक्षकांच्या मयत निधीतून सात हजार रुपये कपात करू नयेत. त्याऐवजी संचालकांनी घेतलेला तीस लाख रुपये प्रवास भत्ता पुन्हा जमा करावा अशी आमच्या बरोबर रोहकले गटाचीही मागणी होती. आता त्यांच्याच गटाचा अध्यक्ष झाल्याने प्रत्येक शिक्षकाला कपात केलेले सात हजार परत मिळतील व संचालक प्रवास भत्ता पुन्हा जमा करून घेतला जाईल अशी सभासदांना आशा आहे.

भ्रष्टाचाराचे अनेक पुरावे असल्याचे दावे रोहकले गटाने केले आहेत. आता त्याची सखोल चौकशी होवून दोषी असलेल्या सर्व संचालकांवर त्याची जबाबदारी निश्चित होईल याची आम्हाला खात्री आहे. सभासदांच्या खिशाला कात्री लावणारे हे निर्णय फिरवण्यासाठी विशेष सर्वसाधारण सभा लावावी. अशी मागणी गुरुकुलच्या पदाधिकार्‍यांनी केली आहे.

महिलांविषयीचा भ्रम काढून टाका

जिल्ह्यातील महिलांना राजकारण कळत नाही हा भ्रम गुरुमाऊलीच्या गटांनी काढून टाकावा. नीतीमत्ता होती तर बँकेची मुदत संपली त्याचदिवशी संचालकांनी राजीनामे द्यायला हवे होते. कोविड संकटाचे रूपांतर संचालकांनी संधीत केले व संधीचे रूपांतर सोन्यात केले. भगिनींपुढे खोटे रडून सत्ता मिळवण्याचा काळ आता गेला आहे, असा टोलाही वृषाली कडलग यांनी लगावला आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT