Rajan Patil
Rajan Patil Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

मी बाबूराव पाटलांचा मुलगा आहे, शेंडी तुटेल पण शब्द मोडणार नाही!

सरकारनामा ब्यूरो

मोहोळ : आम्हाला आमदारकी, खासदारकी नको. जिल्हा परिषद, पंचायत समितीची तिकिटेसुद्धा देऊ नका. काय कोणाला तिकिटं द्यायची आहेत, ती त्यांना देऊन टाका. मी बाबूराव पाटलांचा मुलगा आहे. मी एकदा शब्द दिला तर शेंडी तुटेल पण शब्द मोडत नसतो. त्यामुळे तुमच्याही डोक्याचे टेन्शन कमी होणार आहे. आमच्या दोन मागण्या तेवढ्या पूर्ण करा. त्यानंतर आम्ही रामकृष्ण हरी करत बसतो. नुसतेच बसतो असे नाही, तर तुमच्या घड्याळालाच सर्व मते देतो, असे मोहोळचे माजी आमदार राजन पाटील (rajan patil) यांनी राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (jayant patil) यांच्यापुढे सांगून टाकले. (I am the son of Baburao Patil and I keep my word: Rajan Patil)

राष्ट्रवादी परिसंवाद यात्रेनिमित्त राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील मोहोळ येथे आले होते. त्या कार्यक्रमात माजी आमदार पाटील बोलत होते. ते म्हणाले की, मोहोळ तालुक्यातील राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी गेली २५ वर्षांपासून एकमेकांची मने जुळविण्याचे काम केलेले आहे, त्यामुळेच कितीही वादळं आली, कितीही वारं आलं, कितीही डिजिटल बोर्ड लावले तरी मोहोळमधील कार्यकर्ता आपली निष्ठा ढळू देणार नाही. कार्यकर्त्यांमध्ये सुसंवाद असल्यामुळेच गेली २५ वर्षांपासून राष्ट्रवादीचा आमदार निवडून येत आहे. एकदा निष्ठा वाहिली तर येथील कार्यकर्ता स्वतःच्या प्रपंचाचे वाटोळे झाले तरी तो आपली निष्ठा बदलणार नाही. त्यातूनच शरद पवारांचा विचार तालुक्यात टिकून आहे. ऊन, वारा, पाऊस आणि देश, राज्यात वातावरण झाले किंवा तालुक्यात जरी वातावरण गढूळ करण्याचा कोणी तसा प्रयत्न केला तरी राष्ट्रवादीवरील निष्ठा ढळू देणार नाहीत. कारण तालुक्यातील राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांची नाळ मतदारांशी जोडलेली आहे.

मी सर्वांच्या साक्षीने आज सांगतो की, आम्ही समाधानी आहोत. पेपरला काहीही येईल, तुम्हाला कोणी काहीही सांगेल. पण शरद पवार, अजितदादा आणि राष्ट्रवादीने खूप काही आमच्या तालुक्याला दिले आहे. मला पक्षाने तीनवेळा आमदार केले आहे, यापेक्षा मला काय पाहिजे आहे. मागील दोन टर्म आपले बॅडलक होते, त्यामुळे आपण थोडे मागे पडलो. पण, आमदार यशवंत माने यांनी गेल्या दोन वर्षांतच ४७२ कोटींची केवळ रस्त्यांची कामे केली आहेत, असे पाटील यांनी नमूद केले.

राजन पाटील म्हणाले की, राष्ट्रवादी हा सत्तेतील भागीदारी असणारा पक्ष आहे. पण आम्हाला जेवढं कळतं त्यानुसार सर्वकाही राष्ट्रवादीच चालवते, असे वाटते. आम्ही प्रसिद्धी करणारी, इव्हेंट करून मते मागणारी माणसं नाही आहोत. इव्हेंट करून मते मागतली तर ती काही दिवसांपुरती असतात. आम्ही आमच्या परीने आमच्या हातून जेवढे होईल तेवढं काम करतो. लोकांना ते मान्य असेल तर ते आम्हाला देतात. मागच्या आमदारकीच्या निवडणुकीला मोहोळ तालुक्याची परिस्थिती वाईट होती. कार्यकर्ते आणि मतदारांशिवाय आमच्याकडे माणूसच नव्हता. मी आणि बळीराम साठे यांनी आपल्यावर आणि पक्षावर निष्ठा ठेवून यशवंत माने यांना २२ हजार मतांनी निवडून आणले. पुढच्या वेळी प्रचाराला जावे लागणार नाही, एवढी कामे आमदार माने यांनी केली आहेत.

मी आज तुमच्यापुढे तालुक्यातील प्रश्नांचा उलगडा करतो. तो जर मी केला नाही तर आता जे शिट्ट्या वाजवत आहेत, ते उद्या मला जाब विचारल्याशिवाय सोडत नाहीत. आम्हाला काहीही नको. आम्हाला एक आमदार पुरेसा झाला. आमदार यशवंत माने यांच्याजागीही दुसरा माणूस द्यायचा असेल तर तोही द्या. त्याबाबत आमची काहीही हरकत नाही. तुमच्या कानात कोणी काहीही येईन सांगेल पण आम्ही राष्ट्रवादीसोबतच कायम राहू. आम्ही एक टक्कासुद्धा दुसरीकडे जाणार नाही, त्यामुळे तुम्ही देईल तो उमेदवार आमचे कार्यकर्ते आणि मतदार निवडून देतील. आमच्या तालुक्यात विसंवाद वगैरे काही नाही. अगदी आबदीआबद असणारा बारामती, इस्लामपूरनंतर मोहोळ तालुका आहे. हे सर्व पालकमंत्री भरणेमामांना सर्वकाही माहीत आहे, असे सांगून राजन पाटील यांनी पालकमंत्र्यांवर सर्वकाही सोडून मोकळे झाले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT