Balasaheb Thorat
Balasaheb Thorat Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Balasaheb Thorat : 'मी 38 वर्षे आमदार आहे.. पण असला प्रकार कधी पाहिला नाही!'

आनंद गायकवाड

Balasaheb Thorat : राज्याच्या विधीमंडळाचे पावसाळी अधिवेशन सध्या सुरू आहे. राज्यातील शेतकऱ्यांच्या प्रश्नावरून विरोधी पक्षांनी आज सत्ताधाऱ्यांवर टीकेची झोड उठविली. काँग्रेस पक्षाचे विधीमंडळ नेते बाळासाहेब थोरात ( Balasaheb Thorat ) यांनी तर 'मी 38 वर्षे आमदार आहे.. पण असला प्रकार कधी पाहिला नाही!', असे म्हणत शिंदे गट व भाजपवर टीकेची तोफ डागली.

माजी मंत्री बाळासाहेब थोरात म्हणाले, राज्य सरकारच्या पावसाळी अधिवेशनातून आपल्यासाठी मदतीचा हात देणारा निर्णय होईल अशी आशा लावून बसलेल्या शेतकऱ्यांची घोर निराशा झाली आहे. शिंदे-फडणवीसांचे सरकार आल्यापासून 150 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या, दररोज 3 शेतकरी आत्महत्या करीत आहेत. मुख्यमंत्री शेतकऱ्यांना भावनिक आवाहन करीत आहेत. मात्र विधीमंडळाच्या पायऱ्यावर सत्ताधारी आमदार विरोधकांना धक्काबुक्की करतानाचे चित्र पाहिल्यानंतर शेतकरी व जनता आपल्याकडून काय अपेक्षा करणार ? त्यांचे नैराश्य वाढून अपेक्षाभंग होईल असे खडे बोल त्यांनी सुनावले.

ते म्हणाले, आंदोलन करणे हा विरोधी पक्षांचा अधिकार आहे, पण आता सत्ताधारीच आंदोलन करीत आहेत. सत्ताधारी पक्षाची जबाबदारी शेतकऱ्यांचे मनोबल वाढवण्याची असते. अधिवेशनात आपल्यासाठी आशादायक निर्णय होण्याची वाट पाहणाऱ्या शेतकऱ्याचा भ्रमनिरास झाला आहे. राज्यातील सत्ताधारी पक्ष विरोधी पक्षांच्या सदस्यांना धक्काबुक्की करीत अपशब्द वापरत आहेत. सत्ताधारी पक्षाने जबाबदारीने वागले पाहिजे, त्यांच्या वागण्यातून सत्ता व सरकार आमच्या पाठीशी आहे, विरोधी पक्ष आमच्या पाठीशी आहे असा संदेश गेला पाहिजे पण आजची घटना दुर्दैवी आहे, असे त्यांनी सांगितले.

सत्ताधारी पक्षाला त्यांच्यावर होणारी टीका सहन होत नाही ही गोष्ट योग्य नाही. कालच एका शेतकऱ्याने मंत्रालयासमोर पेटवून घेण्याचा प्रकार घडला तर दुसऱ्याने इमारतीवर चढून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला, शेतकऱ्यांची मानसिकता दाखवणाऱ्या या घटना आहेत पण सरकार त्यांच्यासाठी काही निर्णय घेत नाही, घोषणा करीत नाही. 38 वर्षे मी या सभागृहाचा सदस्य आहे. आंदोलने होतात, पायऱ्यांवरही बसतात पण अशा पद्धतीने धक्काबुक्की करणे, अपशब्द वापरणे असा प्रकार याआधी झाला नाही. सत्ताधारी पक्षाने केलेला प्रकार योग्य नाही, भविष्यात असे प्रकार होऊ नयेत म्हणून सर्व पक्षांनी याबाबत एकत्र बसून विचार केला पाहिजे असेही थोरात म्हणाले.

महाराष्ट्राच्या राजकीय परंपरेला बट्टा

आज झालेल्या प्रकाराबद्दल दिलगिरी व्यक्त करण्याऐवजी सत्ताधारी पक्षाचे काही आमदार आम्हीच धक्काबुक्की केली आणि पुढे देखील करू, अशी भाषा करतात, हे लोकशाहीला शोभणारे नाही. महाराष्ट्राने आजवर अनेक आंदोलने पाहिली, टोकाचा संघर्ष पाहिला. पण तो संघर्ष आजवर हाणामारीवर आला नाही, आज जे झाले त्याचा निषेधच करायला हवा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT